मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे तिन्ही भाग कायम दुष्काळमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादाची गरज आहे. पुढच्या काळातही केंद्र सरकार मदत करेल. येणाऱ्या काळात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही. असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरच्या शिर्डी दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौऱ्यात निळवडे धरणाचं लोकार्पण केलं. या लोकार्पणानंतर आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं. फडणवीस म्हणाले, “साई भूमितील विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे याचा आनंद आहे. जगभरातून साईभक्त सातत्यानं या ठिकाणी येतात. याठिकाणी विविध उपक्रम येत आहेत. निळवंडे सारखा प्रकल्प सुरु होत आहे. माझ्या जन्माच्या पूर्वी हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. आज त्याचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होत आहे याचा आनंद आहे.”
“महाराष्ट्रातील ५० टक्के भाग हा दुष्काळग्रस्त आहे. या भागात जास्त प्रमाणात पाऊस पडत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होते. जोपर्यंत या ठिकाणी पाणी मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला मागच्या ५० वर्षात लागलेला आत्महत्येचा कलंक पुसू शकणार नाही. पश्चिमी वाहिनी असणाऱ्या नद्यांचे जे पाणी समुद्रात जात आहे, ते पाणी गोदावरी नदीत घेऊन अहमदनगर, नाशिकसह संपूर्ण मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करु शकतो.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.