मुंबई : संघटनेत काम करत असताना छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी निलेश राणे यांनी ही भूमिका घेतली. एक कार्यकर्तादेखील पक्षातून बाहेर जाणे पक्षासाठी योग्य नाही. सांगायला आनंद होत आहे की, हा झुंझार नेता कोकणात असाच दिसेल. असं रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी २४ ऑक्टो. रोजी ट्विट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
यानंतर मंत्री रविंद्र चव्हाणांनी निलेश राणेंच्या निवासस्थानी भेट घेतली. रविंद्र चव्हाणां या भेटीत त्यांनी राणेंची समजुत काढली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविंद्र चव्हाण आणि निलेश राणे यांना भेटायला बोलावले. यानंतर रविंद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "खरंतर काल निलेश राणे यांनी ट्वीट केल्यानंतर काय घडलं कळालं नव्हतं. आताच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर काही गोष्टी कळाल्या आहेत. संघटनेत काम करत असताना छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी निलेश राणे यांनी ही भूमिका घेतली. या सर्व गोष्टींचा आम्ही सर्वांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचा आम्ही विचार करत असतो. पण अनेक छोट्या निवडणुका या कार्यकर्त्यांना लढायच्या असतात. ते आम्ही जाणून न घेतल्याने कार्यकर्त्यांवरील प्रेमापोटी निलेश राणे यांनी हा निर्णय घेतला."
एक कार्यकर्तादेखील पक्षातून बाहेर जाणे पक्षासाठी योग्य नाही. सांगायला आनंद होत आहे की हा झुंझार नेता कोकणात असाच दिसेल. सर्व छोट्या कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेणे गरजेचे असते आणि हीच भूमिका निलेश राणे यांची होती, असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं.