पितृपक्षात भाजीपाला कडाडला तर फुलांना स्वस्ताईचा दरवळ

02 Oct 2023 16:34:50
vegetable

ठाणे : अनंत चतुर्दशीनंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे गेले दोन दिवस ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी वाढल्याने भेंडी, गवार, हिरवी मिरची, शिमला मिरची, फ्लॉवर, वांगी आणि घेवड्याच्या दरांत वाढ झाली आहे. पितृपंधरवडा सुरू झाल्याने मागणीत भर पडून दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये रविवारी १५० ते २०० ट्रक फळ - भाज्यांची आवक झाली. गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची आठ ते १० टेम्पो, मध्य प्रदेश तसेच बेंगळुरू येथून लसूण आणि आले, कर्नाटक, गुजरात येथून कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा, इंदूर येथून गाजर, कर्नाटक येथून घेवड्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली.
 
स्थानिक भागातून सहाशे ते सातशे गोण्या सातारी आले, भेंडी आणि गवार प्रत्येकी सहा ते सात टेम्पो, टोमॅटो आठ ते १० हजार क्रेट्स, काकडी, फ्लॉवर, कोबी, शिमला मिरची प्रत्येकी आठ ते १० टेम्पो अशी चांगली आवक झाली. भाजी मुबलक असतानाही त्यामानाने भाजपाल्याचे दर मात्र वाढले आहेत. हिरवा वाटाणा १८० ते २०० रुपये किलोवर पोहोचला आहे तर भेंडी, गवार ८० ते १०० रुपये किलो, कोबी १२० रुपये, फ्लॉवर १४० रुपये, शिमला मिर्चीसुद्धा त ते १०० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. वांगी १२० रुपये किलो, घेवडाही १४० रुपये किलो दर आहे. पितृपक्षात पितरांना नैवेद्य ठेवण्यासाठी तसेच घरोघरी महालयात भाज्यांचा सर्रास वापर होत असतो. मात्र, भाजीपाला कडाडल्याने चढ्या भावाने भाज्या घेताना ग्राहक हात आखडता घेत आहेत.
 
मासळीच्या दरातही वाढ
नुकताच श्रावण संपल्याने दोन महिने अधिक श्रावण आणि गणेशोत्सव संपवून पुन्हा एकदा खवय्यांनी चिकन - मटण आणि मासळीकडे मोर्चा वळविला आहे. मात्र मागणी वाढल्यामुळे मासळीच्या दरात दहा ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. खोल समुद्रातील मासळीची १५ ते २० टन, खाडीतील मासळी, नदीच्या माश्यांचीही आवक झाली आहे. आंध्र प्रदेशातुन रोहू, कटला आणि सिलनचीही १५ ते २० टन इतकी आवक झाली होती. इंग्लिश अंडीही शेकड्यामागे ५० रुपयांनी महागली असून, मटण, चिकन आणि गावरान अंड्यांचे दर मात्र स्थिर आहेत़.

पितृपक्षामुळे फुलांना मागणी घटली
पितृपक्षामुळे फुलांची मागणी घटली आहे़ परिणामी, दरात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे. घाऊक बाजारात एक किलो झेंडूसाठी १० ते ३० रुपये दर होता. गुलछडी ३० ते ५० रुपये, सुट्टा ५० ते ६० रुपये, कापरी २० ते ४० रुपये, शेवंती २० ते ४० रुपये दर होता. याबरोबरच गुलाब जुडी १० ते २० रुपये, आष्टर जुडी १० ते १२ रुपये, गुलछडी काडी १० ते ३० रुपये, डच गुलाब (२० नग) ४० ते ८० रुपये, जरबेरा १० ते ३० रुपये, कार्नेशियन ५० ते ८० रुपये, शेवंती काडी ८० ते १२० रुपये, लिलियम (१० काड्या) आठशे ते हजार रुपये, ऑर्चिड चारशे ते पाचशे रुपये किलो असा दर होता.

"भाजीपाला खरेदीकडे त्यांचा ओढा असला तरी लहरी हवामानामुळे माल कमी येत आहे. त्यात ट्रान्सपोर्टचा खर्च अधिक असल्याने परिणामी भाज्यांच्या दरात वाढ करावी लागली आहे. भाजीपाला हा नाशिवंत असल्याने तो जास्त काळ टिकवणे कठीण असते. म्हणून ग्राहकांच्या मागणीनुसारच पुरवठा करून विक्री करतो."
- श्यामसुंदर गोरे, भाजी विक्रेते
 
Powered By Sangraha 9.0