१४ मिनिटांत वंदे भारत एक्सप्रेस चकाचक! भारतीय रेल्वेचा नवा उपक्रम

02 Oct 2023 18:43:26

Vande Bharat Express


मुंबई :
महात्मा गांधींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यातच आता भारतीय रेल्वेने आपल्या नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या केवळ १४ मिनिटांत स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. '१४ मिनिटांत चमत्कार' असे या योजनेला नाव देण्यात आले आहे.
 
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी १ ऑक्टोबरपासून या कामाची सुरुवात केली आहे. रविवारी केवळ १४ मिनिटांत वंदे भारत एक्स्प्रेस आतून बाहेरून स्वच्छ करण्यात आली. यावेळी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वंदे भारत गाड्या एकाच वेळी १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छ करण्यात आल्या.
 
रेल्वेकडून प्रथमच अशा प्रकारची मोहिम हाती घेण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने यासंबंधीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या मोहिमेअंतर्गत देशातील ३४ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना त्यांचा प्रवास संपल्यानंतर केवळ १४ मिनिटांत स्वच्छ करण्यात येणार आहे.
 
सध्या या कामाला जवळपास ४५ मिनिटांचा वेळ लागतो. परंतू, आता हेच काम केवळ १४ मिनिटांत केले जाणार आहे. या योजनेमुळे वेळेची बचत करणे शक्य होणार आहे. देशभरातील २९ रेल्वे स्थानकांवर ही योजना लागू करण्यात येणार आहे. तसेच लवकरत इतर गाड्यांमध्येदेखील ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.



Powered By Sangraha 9.0