ब्राह्मण समाजानेही उगारले उपोषणाचे हत्यार!

19 Oct 2023 16:13:20
hunger strike

मुंबई :
राज्यातील विविध समाजांनी आरक्षणासह विविध प्रश्नांवर प्रभावीपणे भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. मराठा-ओबीसी- धनगर समाजाने केलेल्या आऱक्षणाच्या मागणीसोबत आता ब्राह्मण समाजानेही आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. ब्राह्मण समाजातील तरुणांच्या उज्जवल भवितव्यासाठी आणि उन्नतीसाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी समाजातील प्रतिनिधींनी केली आहे. या मागण्यांसाठी आझाद मैदानावर तीन दिवसांपासून आमरण उपोषणाचे हत्यारदेखील समाजाकडून उपसण्यात आले आहे. त्यामुळे आता आणखी एका समाजाच्या मागण्या सरकार दरबारी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

लोकसंख्येच्या तुलनेत अल्प प्रमाणात असलेल्या ब्राह्मण समाजाने गेल्या काही वर्षात आपल्या मागण्यांसाठी आंदोलने आणि शासन दरबारी निवेदनेदेखील सादर केली आहेत. काही वर्षांपूर्वी ब्राह्मण समाजाच्यावतीने आझाद मैदानावर मोर्चा देखील काढण्यात आला होता. मात्र, त्याला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रहिवाशी असलेल्या पदुदेव जोशी आणि अविनाश जोशी यांनी मागील तीन दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

सर्वांगीण विकासासाठी आर्थिक महामंडळ गरजेचेच!

ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतरित झालेला, अल्पभूधारक, सुशिक्षित पण बेरोजगार, व्यवसायासाठी कुठलेही भांडवल नसलेल्या ब्राह्मण समाजाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महामंडळ असणे आवश्यक आहे. तीन दिवसांहून अधिक काळ लोटला तरी, शासनाकडून उपोषणाची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. सकल ब्राह्मण समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणे गरजेचे आहे. शासनाने त्यावर तत्काळ सकारात्मक कारवाई करावी ही विनंती!
- अनंत देविदास जोशी, उपोषणकर्ते, ब्राह्मण समाज

शासनाने त्वरित निर्णय घ्यावा!

राज्यातील सकल ब्राह्मण समाजाच्या वर्षानुवर्षे अनेक मागण्या शासन दरबारी आहेत. त्यात भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी अग्रक्रमाने मांडण्यात आली. ग्रामीण भागातील तरुणांची स्थिती, लग्नाचे प्रश्न, आर्थिक विवंचना, पिढीजात जमिनींचे विषय, होणारे स्थलांतरण हे समाजाचे प्रमुख मुद्दे आहेत. पौरोहित्य करून उपजीविका भागविणार्‍या समाजातील वर्गाची स्थितीही बिकट आहे. हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणे अत्यावश्यक असून राज्य सरकारने यावर त्वरित निर्णय घेण्याची आमची विनंती आहे.
- पदुदेव जोशी, उपोषणकर्ते, ब्राह्मण समाज

Powered By Sangraha 9.0