‘मेरी आवाज ही पेहचान है’ हे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे गाणे आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आवाज ही निसर्गाची देणगी असली तरी त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची देखभाल आणि निगा राखणे काळाची गरज आहे. त्यासाठी स्वरगंगेचा वारसा सांभाळणार्या आजच्या नवदुर्गा डॉ. सोनाली लोहार.
सोनाली लोहार. या व्यवसायाने व्हॉईस थेरपिस्ट म्हणजेच आवाजाच्या चिकित्सक असून त्या तब्बल दोन तपांपासून त्या आवाजाची निगा राखणे, देखभाल करणे व आवाजात सुधारणा कशी करता येईल, यासाठी जनजागृती करत आहेत. आवाज ही निसर्गाने प्रत्येकाला दिलेली अनमोल देणगी. आवाजाच्या जोरावरच माणसाला सर्वांशी बोलणं, संवाद साधणं शक्य होतं. एवढ अनन्यसाधारण महत्त्व आवाजाला आहे. परंतु, तरीही त्याची दैनंदिन काळजीही नीट घेतली जात नाही. आवाजाला गृहीत धरण्याची आपली सवय किंवा रेटून नेण्याची वृत्ती यामुळे आपण बहुतांश सर्वच जण आयुष्यभर आवाजावर अन्याय करतो, असे डॉ. सोनाली म्हणतात. हल्लीच्या काळात अनेक ठिकाणी व्हॉईस कल्चर सर्वत्र शिकवले जात असले, तरी त्याचा मूलभूत घटक असलेला ‘व्हॉईस थेरपी’ हा भाग आजही दुर्लक्षित आहे. नेमकी हीच गरज ओळखून डॉक्टर सोनाली लोहार गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ व्हॉईस थेरपी अर्थात आवाज चिकित्सा क्षेत्रात काम करत आहेत. ठाणे शहरात त्यांचे व्हॉईस क्लिनिक असून त्या त्या राज्याच्या विविध भागांत जाऊन या विषयाबाबत सातत्याने जनजागृती करत असतात.
डॉ. लोहार एकदा एका हॉटेलमध्ये गेल्या. त्यांना एका वेटरने मेनू कार्ड देऊन काय आणू? असं विचारलं. त्याचा आवाज अत्यंत खराब असल्यानं, त्यांनी त्याला आवाजाबद्दल विचारलं. यावर तो घाबरून किचनमध्ये पळून गेला. मग त्याही त्याच्या पाठोपाठ किचनमध्ये शिरल्या. त्यांनी त्या मुलाला आपल्या क्लिनिकमध्ये आणून त्याच्यावर मोफत उपचार केले. थोडक्यात कोणाशी बोलताना जराही समोरच्या व्यक्तीच्या आवाजात गडबड वाटली, तर डॉ. सोनाली यांच्यातील व्हॉईस थेरपिस्ट त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
व्यक्तिमत्व, संभाषण तसेच पोटापाण्याच्या व्यवसायासाठी आवाज महत्त्वाचा असतो. मानसिक व शारीरिक स्वास्थ्याचा बॅरोमिटर म्हणूनही आवाज महत्त्वाचा आहे. शरीरातील कोणतीही गडबड अथवा व्याधी याचा पहिला बदल आवाजावर दिसून येतो. त्यामुळे कोणीही आवाजाकडे दुर्लक्ष करू नये, असे त्या कळकळीने सांगतात.
डॉ. सोनाली लोहार यांनी १९९३ मध्ये ‘ऑडियोलॉजी अॅण्ड स्पीच थेरपी’ची पदवी घेतली. त्यानंतर त्या तब्बल २९ वर्षे ऑडियोलॉजीस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत. यातील १९ वर्षे मात्र त्या फक्त आणि फक्त आवाजासंबंधित व्याधींवर काम करत आहेत. आवाजासंदर्भातील तक्रारींवर उत्तमातले उत्तम आणि योग्य उपचार गरजूंना मिळावेत या भावनेतून त्यांनी व्हॉईस क्लिनिक, ठाणे येथे सुरू केले.
घसा खराब झाल्यास एखादा रुग्ण ईएनटी ओपीडीमध्ये आला. ईएनटी स्पेशलिस्टने त्याला तपासल्यावर जाणवते की त्या रुग्णाच्या घशात स्वरयंत्राला इजा झालेली आहे. तेथे कॅन्सरही असू शकतो. या आजारांशी संबंधित केसेसवर उपचार करण्यासाठी जगभरात एक आदर्श प्रोटोकॉल आहे. अशा आवाजाच्या किंवा घशाच्या संबंधित केसेस एका टिमने हँडल करायच्या असतात. ज्यात व्हॉईस क्लिनिशन असणं हे अपरिहार्य असतं. व्याधीचे निदान करतानाही व्हॉईस क्लिनिशन्सचा तितकाच महत्त्वाचासहभाग असतो. ती टिम निश्चित करते की, रुग्णाची पुढची ट्रिटमेन्ट काय असावी. सर्वसाधारणपणे, गायक, अभिनेते, राजकारणी, शिक्षक, वकील, डबिंग व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट, कॉल सेंटर कर्मचारी, निवेदक इ. मंडळी या रुग्णवर्गात विशेषतः मोडतात.
या उपचारात तज्ज्ञ व्हॉईस क्लिनिशन्स/ थेरपिस्ट हे रुग्णाच्या आवाजाची तंत्रशुद्ध तपासणी करतात. प्रशिक्षण घेतलेले व्हॉईस थेरपिस्ट एडोस्कॉपी एग्झामिनेशनही करतात. आवाजाच्या चाचण्यांबरोबरच इतरही बर्याच तपासण्या केल्या जातात. छातीची, घशाची तपासणी केली जाते. समस्येचे मूळ हे शरीराच्या कुठल्याही भागात असू शकतं. या तपासण्या ते मूळ शोधण्यासाठी केल्या जातात. इव्हॅलुएशननंतर सर्जरीची, औषधांची, थेरपीची आवश्यकता लक्षात येते. ईएनटी मॅनेजमेन्ट बरोबरच रुग्णाला व्हॉईस थेरपीहीसुरू केली जाते. काही वेळा रुग्णावर शस्त्रक्रियाही केली जाते.
मुंबई, ठाण्यात व्हॉईस क्लिनिक फार कमी आहेत. ठाणे जिल्ह्यात डॉ. सोनाली यांचेच पहिले व्हॉईस क्लिनिक आहे. मुंबईत काही मोठ्या हॉस्पिटलमध्ये व्हॉईस थेरपीची सुविधा आहे. यात बॉम्बे, नायर हॉस्पिटलमध्ये तसेच पुण्यात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि भारती विद्यापीठातही अशी सुविधा आहे.दर १५ मिनिटांनी घोटभर पाणी घ्यावे. घसा कोरडा ठेवू नये. दररोज तीन मिनिटे नाकातोंडाने वाफ घ्यावी. घसा खराब असल्यास त्याला अधिक ताण न देता अपेक्षित आराम द्यावा. आपल्या स्वरतारांवर ताण येऊ नये. दर सहा महिन्यांनी आवाजाचे व घशाचे रुटिन चेकअप करा, असा सल्ला डॉ. लोहार देतात. बारावी सायन्सनंतर ऑडियोलॉजी अॅण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी या विषयात डिग्री व मास्टर करावे लागते. यात पुढे अनेक विभाग असून त्यातून स्पेशलायझेशनही करता येते. या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा असल्याने प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा असते. त्यामुळे ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांनी भरपूर तयारी करावी असे डॉ. सोनाली सांगतात. आवाजाच्या दुनियेतील या स्वरगंगाला शुभेच्छा।