मुंबई : भारताने नेहमीच पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. अगदी अटलबिहारी वाजपेयी पॅलेस्टाईनसोबत होते. पंतप्रधानांनी इस्रायलला पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. असंही पवार म्हणाले. यासोबतच इस्रायल-हमास युद्धाबाबतही त्यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार म्हणाले, "इस्त्रायल - पॅलेस्टाईन वादाचा धोका जगाच्या शांततेला निर्माण झालाय. मूळ मालक,जमिन, घरं पॅलेस्टाईनची होती. त्यावर अतिक्रमण झालं आणि इस्त्राईल देश आला. जवाहरलाल नेहरु, इंदीरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांची भूमीका पॅलेस्टाईनला मदत करण्याची होती. हिंदुस्ताननं कधीही इतर कुणालाच मदत केली नाही. पण दूर्देवानं सध्याच्या पंतप्रधानांनी इस्त्रायलची भूमीका घेतलीय. आणि मूळ मालकांना विरोध केलाय." असं शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीतच राखी जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यापूर्वी मुंबई प्रदेशाध्यक्षपद नवाब मलिक यांच्याकडे होते.
शरद पवार म्हणाले, "आमच्या पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका स्वीकारली आणि त्यांनी आपला अध्यक्षही निवडला. सध्या जयंत पाटील राष्ट्रवादीतील काम पाहतात, खरी राष्ट्रवादी कोण, यावरून सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग या दोन्ही पक्षांना सामोरे जावे लागत आहे. मला खात्री आहे की निकाल आल्यावर खरी राष्ट्रवादी कोण हे सर्वसामान्यांना दिसेल." असंही शरद पवार म्हणाले.