विवेकाने अहंकारावर विजय...

11 Oct 2023 21:20:24
Victory over arrogance


 अहंकार पोसणारा हा वादाचा प्रकार फार जपून वापरावा, शक्यतो त्यापासून दूर राहावे. ‘मी अतिशय विद्वान,‘ मी ज्ञानी’, ‘मी सर्वज्ञ’ असा अहंकार बाळगून कोणीही भ्रमात राहू नये. असा अहंकार नाहीसा झाल्यावाचून संवाद होत नाही आणि संवाद साधल्यावाचून वाद मिटत नाही. वादाने अशांती निर्माण होते.

गील श्लोक क्र. 109 मध्ये स्वामींनी लोकांना कळकळीने सांगितले आहे की, तुम्ही निरर्थक वाद करणे सोडून द्या. कुठलाही प्रश्न वादाने सुटत नसतो. समस्या सामंजस्याने सोडवता येते. वादविवाद टाळायचा असेल, तर दोन्ही पक्षांनी आपल्या अहंकाराला मुरड घातली पाहिजे. अहंकार कमी केला, तर प्रतिपक्षाची बाजू, त्याचे म्हणणे समजून घेता येते, त्यावर विचार करता येतो. असे केल्याने वादविवाद प्रसंगात वेळेचा अपव्यय होतो, तो वाचवता येतोे आणि दोघांनाही मान्य होईल, अशा निष्कर्षाप्रत पोहोचता येते. अति वादविवादाचे पर्यवसान प्रसंगी भांडणतंट्यात, हमरीतुमरीवर येण्यात आल्याने त्यातून कटुता निर्माण होते. त्यामुळे शोक, संताप, मनस्ताप होतो. यासाठी सुखसंवाद व सकारात्मक चर्चा हवी. त्या चर्चेलासमर्थांनी मागील श्लोकात ’शोकसंतापहारी’ असे म्हटले आहे. वादाचे मूळ शोधून ते काढून टाकले, तर सुखसंवाद साधता येतो आणि वादाचे दुष्परिणाम टाळता येतात, असे स्वामींचे सांगणे आहे.
 
वादविवाद करण्याऐवजी ज्या प्रश्नावर वाद उत्पन्न झाला, त्या मुद्द्यावर चर्चा करावी. त्यातील बारकावे समजून घ्यावे. आपल्या वैयक्तिक हेतूंना दूर ठेवावे, कोणत्याही वेळी चर्चा व्यक्तिकेंद्रित न होता ती समस्यापूर्तीसाठी झाली, तर त्यातून मार्ग सापडतो आणि सुसंवाद, साधता येतो. हा सुसंवाद सर्वांच्या हिताचा असतो, असे स्वामी पुन्हा पुन्हा सांगत आहेत. परस्पर दोन विरोधी मतप्रवाह असतील, तर त्यांच्यातील वाद निकालात काढता येतील का? वर वर पाहताना असे वाटते की, विरोधी मताचे हटवादी समोरासमोर वादासाठी आले, तर वाद संपवता येणे कठीण आहे. तरीही वाद संपवता येतो. वाद संपला असे केव्हा समजावेयासंबंधीची कारणमीमांसा समर्थांनी पुढील श्लोकात सांगितली आहे-

तुटे वाद संवाद त्यातें म्हणावें।
विवेकें अभाव यातें जिणावें।
अहंतागुणे वाद नाना विकारी।
तुहेे वाद संवाद तो हीतकारी ॥110॥

स्वामींनी या श्लोकात वाद, संवाद, त्यामागचीकारणे, त्याचे दुष्परिणाम इत्यादी विषयांवर मार्गदर्शनकेले आहे. प्रथम वाद का, कसा निर्माण होतो हे समजल्यावर त्यांच्या निवारणाचे मार्ग शोधता येतात. भिन्न मते असली तरी आपल्याच मताला चिकटून राहाण्याचा हटवादी स्वभाव वाद उत्पन्न करतो. हा झाला संघर्ष निर्माण करणारा वादविवाद. वादाचा आणखी एक प्रकार आहे. त्याची चर्चा पुढे येईल. तूर्तास मतभिन्नतेतून निर्माण होणार्‍या वादाचा विचार करू. या वादाचे निमित्त कारण अहंभाव असते. अहंकार निर्माण झाला की, माणसाचाअसा समज होतो की, मलाच सर्वकाही समजते. समोरच्या वाद घालणार्‍याला अक्कल कमी असून तो चुकीची विधाने करीत आहे, असे गृहीत धरले जाते.... समोरच्याचाही असाच समज असल्याने वाद विकोपाला जातात. तेथे संवाद होत नाही, चर्चा करून समस्या येते सोडवण्यासाठी मार्ग निघाला, तर त्याला संवाद म्हणता येते.


तथापि, अहंकाराचे निवारण झाल्याशिवाय वादाचे निर्मूलन होत नाही. दोन विरोधी मते असणार्‍या पक्षात चर्चा व्हावी, असे वाटत असेल तर ती अहंकार वाढवण्यासाठी न होता ती समस्या निवारणासाठी झाली पाहिजे. अहंकार विरहित चर्चाच समस्या सोडवू शकते. परंतु, आजकाल समाजातील, कुटुंबातील, मंडळातील चर्चांचे स्वरूप पाहिले, तर असे दिसून येते की, या चर्चा नसून एकाधिकाराने मतप्रदर्शन असते. ज्याचा आवाज मोठा, जो ठासून बोलतो तो खरा. इतरांनी तेच मान्य करायचे. अशाने समस्या सुटत नाही, तर तात्पुरती दबली जाते. हा समस्या सोडवण्याचा उचित मार्ग नाही. कोणत्याही प्रश्नाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते. सर्व बाजूंचा विचार होऊन त्या प्रश्नावर मान्य तोडगा निघाला, तर त्या चर्चेला सुखसंवाद म्हणता येते. सुखसंवादाने दुःख-क्लेश नाहीसे होतात. समर्थांच्या अंगी संघटनाचातुर्य होते. संघटन टिकवायचे तर तेथे शुपकवादाला स्थान नसते. लोकांना वाद सोडून संवादाची सवय लावली, तर अनेक प्रश्न सामंजस्याने सोडवता येतील. वादातून निर्माण होणारे दुःख, शोक, संताप टाळता येतील.

सर्व वाद अहंकारातून निर्माण होतात. अहंकाराला रोखण्यासाठी विवेकाचा वापर करावा, असे समर्थ सुचवतात. विवेक बाळगला, तर सारासार विचार उत्पन्न होऊन प्रश्नाच्या दोन्ही बाजू समजून घेता येतात. विवेकाने, अहंकाराला जिंकता येते, असे समर्थ म्हणतात. ’विवेकें अहंभाव यातें जिणावें.’अतिअहंकारातून अनेक विकारांची निर्मिती होते. प्रतिपक्षाला चुकीचे ठरवण्यासाठी अहंकारामुळे क्रोध, मत्सर, गर्वताठा, प्रतिपक्षाची निंदानालस्ती, अपशब्दांचा वापर इत्यादी विकार निर्माण होतात. याच अहंकारातून प्रतिपक्षाची अवहेलना, त्यांच्यावर खोटे आरोप इत्यादी हीन प्रवृत्तीचा जन्म होतो. आपण बडेजाव वाढवून प्रतिपक्षाला मूर्ख, क्षूद्र ठरवणे, प्रतिपक्षाचे हसे करणे हे करण्याकडे अहंकारामुळे बुद्धीचा गैरवापर होतो. वातावरण गलिच्छ होऊन चिखलफेककरण्यात आनंद मानला जातो. समस्या अधिक गुंतागुंतीच्या होऊन त्याने कुणाचेही हित होत नाही. वाद सोडून संवाद साधण्यात हित आहे. वादाचा आणखी एक प्रकार म्हणजे आपले ज्ञान जगाला दाखवून प्रतिपक्षाचा वादात पराजय करणे.

समर्थांच्या काळी आणि तत्पूर्वी, आपल्या ज्ञानाचा दिमाख दाखवून, वादविवादात हरवून लोकांकडून जयपत्रेे लिहून घेणारे घमेंडखोर, ज्ञानी पंडित होते. नृसिंह सरस्वतींकडे वादासाठी आलेल्या दोन पंडितांची वादाची हौस एका क्षुद्राकडून भागवून त्या वादासाठी आलेल्या ब्राह्मणांना अखेरीस 12 वर्षे ब्रह्मराक्षस होऊन राहण्याची शिक्षा नृसिंहसरस्वतींनी दिल्याची कथा ’गुरुचरित्र’ या ग्रंथात दिली आहे. वादविवाद करून जयपत्रे गोळा करून दिमाखात नृसिंह सरस्वती या दत्तावतारास वादास बोलावण्याचे औद्धत्य दाखवल्याबद्दल त्या पंडित ब्राह्मणांना झालेली 12 वर्षांची शिक्षा सौम्यच वाटते. म्हणून अहंकार पोसणारा हा वादाचा प्रकार फार जपून वापरावा, शक्यतो त्यापासून दूर राहावे. ’मी अतिशय विद्वान, ’मी ज्ञानी’, ‘मी सर्वज्ञ’ असा अहंकार बाळगून कोणीही भ्रमात राहू नये. असा अहंकार नाहीसा झाल्यावाचून संवाद होत नाही आणि संवाद साधल्यावाचून वाद मिटत नाही. वादाने अशांती निर्माण होते. संवादाने सुख-शांती मिळते. सर्वांचे हित होते. म्हणून वाद टाकून संवाद करावा. ज्या अहंकाराने वाद निर्माण होतात, त्या अहंकाराला जिंकण्यासाठी विवेकावाचून दुसरा मार्ग नाही.



-सुरेश जाखडी
Powered By Sangraha 9.0