मुंबई : चीनमधील हांगझाऊ येथे सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताची पदकांची घोडदौड कायम असून महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. अविनाश साबळेच्या सुवर्ण कामगिरीनंतर भारताच्या खात्यात सुवर्ण पदकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
२०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अविनाश साबळेने ८ मिनिटे ११.२० सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम केला आहे. या कामगिरीमुळे अविनाश साबळे जपानच्या मिउरा रयुजीच्यानंतर आशियाई खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या यशस्वी कामगिरीवर अविनाश म्हणाला, "मला स्टीपलचेसबद्दल आत्मविश्वास आहे आणि त्या स्पर्धेत सुवर्ण जिंकणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे, परंतु मी ५००० मीटरवर देखील लक्ष केंद्रित करत आहे," असेही तो म्हणाला.
दरम्यान, एथलेटिक्स स्पर्धांमधलं भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. चीनमध्ये सुरु असेलल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. सातव्या दिवसाअखेर भारताची पदक संख्या ३८ पर्यंत पोहचली आहे. भारत गुणतालिकेत चौथ्या स्थानी असून यजमान चीन अव्वल स्थानावर आहे.