नवी दिल्ली : विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी केली. आंध्र प्रदेशच्या राजधानीबाबत मोठा निर्णय जगन मोहन रेड्डी सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल. रेड्डी हे मंगळवारी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या पूर्वतयारी बैठकीत बोलत होते.
रेड्डी म्हणाले, "मी तुम्हा सर्व गुंतवणूकदारांना विशाखापट्टणम येथे आमंत्रित करू इच्छितो. जी येत्या काही दिवसांत आपल्या राज्याची राजधानी असणार आहे. काही महिन्यांनी मी स्वतः विशाखापट्टणमला रहायला जाणार आहे. सध्या आंध्रप्रदेशची राजधानी अमरावती आहे. यापूर्वी, जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने गतवर्षात नोव्हेंबरमध्ये आंध्र प्रदेश
वादग्रस्त आंध्र प्रदेश विकेंद्रीकरण आणि सर्व क्षेत्रांचा समावेशी विकास कायदा २०२० रद्द केला होता. राज्यात तीन राजधानी बनवण्याचा त्याचा उद्देश होता. त्यानंतर राज्य सरकारने विशाखापट्टणम (कार्यकारी राजधानी), अमरावती (विधानिक राजधानी) आणि कुर्नूल (न्यायिक राजधानी) प्रस्तावित केले.