मुंबई (प्रतिनिधी) : जागतिक पाणथळभूमी दिन दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. यंदा , पर्यावरण दक्षता मंडळामार्फत पाणथळभूमी संवर्धन या विषयावर , २ फेब्रुवारी रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय वाशी सकाळी ११ वाजता येथे परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
पर्यावरण दक्षता मंडळ गेली २३ वर्षे ठाणे आणि आसपासच्या परिसरात पर्यावरण जागरूकता तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. २ फेब्रुवारी रोजी असलेल्या जागतिक पाणथळभूमी दिनानिमित्त पर्यावरण दक्षता मंडळाच्या समवेत असोसिएशन ऑफ टिचर्स इन बायोलॉजीकल सायन्सेस , केबीपी कॉलेज , राईज अँड समिट फौंडेशन आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या सहयोगाने 'पाणथळभूमी संवर्धन' या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे.
या परिसंवादाचा उद्देश संशोधक , शिक्षणतज्ञ , विद्यार्थी आणि समाजातील इतर भागधारकांमध्ये पाणथळभूमी आणि जैवविधतेच्या ऱ्हासाच्या गंभीर समस्यांबाबत जागरूकता पसरवणे हा आहे. यामध्ये परिसंवादासाठी पर्यावरण दक्षता मंडळाकडून स्वयंसेवी संस्थेची भूमिका मांडण्यात येईल. या विषयावरील कायद्याची भूमिका उदय वारुंजीकर मांडतील , महापालिका प्राधिकरणाची भूमिका , तसेच संशोधकांची भूमिका आणि भागधारकांची भूमिका मांडण्यात येणार आहे. या परिसंवादात प्रत्येक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यात येईल अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळाचे प्रकल्प समन्वयक शुभम निकम यांनी दिली आहे.