कॉपीमुक्त परीक्षांची स्वप्नपूर्ती संभव!

    30-Jan-2023
Total Views |
परीक्षा = कॉपी, परीक्षा = गैरप्रकार यांचे नाते किती अतूट आहे, हे अनेकवेळा अधोरेखित झाले आहे. नुकतेच संपन्न झालेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून पंतप्रधानांनीदेखील परीक्षेतील ‘शॉर्टकट’ आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयोगी ठरत नाहीत, असे म्हटले. त्यानिमित्ताने एक सकारात्मक दृष्टिकोनातून एक पालक या नात्याने, गैरप्रकाराची कारणे आणि संभाव्य उपाययोजना यावर एक प्रकाशझोत टाकण्याचा केलेला हा प्रयत्न.
cheating in exams 

कॉपीमुक्त परीक्षा शक्य आहे का? 


‘कॉपी’ हा वर्तमान शिक्षण व्यवस्थेला लागलेला शापच म्हणावा लागेल. कुठलेही कष्ट, मेहनत न करता यश मिळवायचे अशी नीतिशून्य धारणा समाजात यानिमित्ताने दिसून येते. तिचे नितळ प्रतिबिंब म्हणजे परीक्षेतील ‘कॉपी’ होय. सामूहिक कॉपी व संबंधित यंत्रणेकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मिळणारे अभय, ही एक फक्त कृती नसून सामाजिक-नैतिक मूल्यांची घसरण दर्शवणारी प्रवृत्तीच म्हणावी लागेल. मूल्यरहित समाजव्यवस्थेचे बीजांकुर शिक्षणातील गैरप्रकारामुळे रुजले जाणे निश्चितच अधिक धोकादायक संभवते, याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे वाटते.

शिक्षणाचे बाजारीकरण, भूछत्राप्रमाणे गल्लोगल्ली बालवाडी ते अभियांत्रिकी-वैद्यकीय यांची थाटलेली दुकाने व त्यातून निर्माण झालेली अस्तित्वाची जीवघेणी स्पर्धा यामुळे कॉपी, मूल्यमापनातील गैरप्रकार, पेपरफुटी असे प्रकार शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनले आहेत, हे कोणीच नाकारू शकत नाही. १०० टक्के निकालाचे धनुष्य पेलण्यासाठी स्वतः शिक्षक-मुख्याध्यापक-संस्थाचालक यांनी कॉपीचा अंगीकार केला असल्यामुळे आणि शासनाला वाढत्या निकालाच्या आकडेवारीच्या आधाराने शिक्षणातील गुणवत्तेचा डांगोरा पीटत आपली पाठ थोपटता येत असल्यामुळे, परीक्षेतील गैरप्रकारांना अभय मिळताना दिसते. कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार असल्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा महाराष्ट्रासाठी दिवास्वप्न ठरत आहे.

काही वर्षांपूर्वी परीक्षातील गैरप्रकारांनी निर्लज्जपणाचे टोक गाठले होते आणि कॉपीचे प्रकार अतिशय उघडपणे होत होते. पालक-प्रसार माध्यमांनी ओरड केल्यावर बोर्डाने ’गैरमार्गाविरुद्ध लढा’ अभियान राबविले. अर्थातच, तेही सरकारी धोरणाप्रमाणे. निव्वळ धूळफेक. केवळ भोभाटा. प्रत्यक्ष कारवाई शून्य! या अभियानचे एकमात्र यश ते हे की जे अगदीच उघडपणे घडत होते ते आता पडद्याआड घडते आहे.


दृष्टिपथातील उपाय : शिक्षण विभाग आणि बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षांसाठी उपायांचा विचार करावा. ‘झूममीट’द्वारे तटस्थ पर्यवेक्षण : ज्या ज्या वर्गात परीक्षा सुरू आहे, त्या त्या वर्गाचे चित्रीकरण पालकांसाठी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, शिक्षण विभागातील अधिकार्‍यांसाठी ‘झूम मीट’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यास हे सर्व घटक तटस्थ पर्यवेक्षकांची भूमिका बजावू शकतात. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येऊ शकते. ‘सीसीटीव्ही’ अनिवार्यच असावेत : परीक्षा हॉलमध्ये ‘सीसीटीव्ही’ अनिवार्य असावेत. कॉपी नियंत्रणासाठी कमी खर्चिक सूचना हव्यात, अशी बोर्डाची भूमिका असली तरी वर्तमानकाळाचा विचार करता, ज्या ज्या शाळेत दहावी-बारावीचे परीक्षा केंद्र आहे, त्या त्या शाळेत ‘सीसीटीव्ही’ असणे अनिवार्य असावे. तसे तर शिक्षण विभागाने यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘सीसीटीव्ही’ अनिवार्यच केलेले आहेत.

सामूहिक कॉपीला आळा घालण्यासाठी : सामूहिक कॉपीला आळा घालण्यासाठी स्वाध्यायातील प्रश्न जसेच्या तसे देण्याऐवजी धड्यावर आधारित रिकाम्या जागा, जोड्या जुळवा, एका वाक्यात उत्तरे अशा प्रकारचे स्वाध्यायाव्यतिरिक्त देखील प्रश्न विचारावेत.
विषय शिक्षकांना मज्जाव असावा : आपल्या विषयाच्या निकालाची टक्केवारी वाढवण्यासाठी शिक्षक प्रत्यक्ष कॉपीस प्रोत्साहन देत असल्याने विषय शिक्षकांना त्या त्या पेपरच्या दिवशी परीक्षा केंद्रावर येण्यास पूर्णपणे मज्जाव असावा. याची अंमलबाजावणी करण्यासाठी ज्या विषयाचा पेपर आहे, त्या सर्व शिक्षकांना तहसील कार्यालयात उपस्थित असणे अनिवार्य असावे.


प्रश्नपत्रिकांचे स्वरूप कॉपीस पूरक नसावे : वर्तमानातील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप हे कॉपीस पूरक आहे. केवळ स्वाध्यायातील प्रश्न जसेच्या तसे देण्याच्या पद्धतीमुळे नवनीत अपेक्षित/गाईडच्या माध्यमातून कॉपीला बळ मिळते. गणित-विज्ञान प्रश्नपत्रिकेत बदल करावेत. गणिताच्या प्रश्नपत्रिकेत स्वाध्यायातील प्रश्नांचे स्वरूप तेच ठेवत गणितातील आकडे बदलल्यास सामूहिक कॉपीला मोठ्या प्रमाणावर आळा बसू शकतो. विज्ञानातदेखील जे ‘प्रॉब्लेम्स’ असतात, त्यात देखील आकडे बदलावेत. त्याचप्रमाणे गाळलेल्या जागा, जोड्या जुळवा, एका वाक्यातील उत्तरे यांसारखे प्रश्न केवळ स्वाध्यायातीलच विचारायचे धोरण सोडून त्या धड्यातील आशयावर आधारित कुठलेही प्रश्न विचारण्याचे धोरण अवलंबावे. यामुळे विद्यार्थी धडे वाचण्यास प्राधान्य देतील आणि शिक्षणाचा दर्जादेखील वृद्धिंगत होऊ शकेल. सध्या विद्यार्थी धडे न वाचता केवळ गाईडमधील प्रश्नच पाठ करताना दिसतात. धडे वाचतच नाहीत.


केंद्रप्रमुख तटस्थ हवेत : त्या शाळेतील/कॉलेजमधील शिक्षक/प्राध्यापकांची नियुक्ती केंद्रप्रमुख न करता त्या गावातील शाळा/कॉलेजव्यतिरिक्त अन्य ठिकाणावरील शिक्षक/प्राध्यापकांची नियुक्ती केंद्रप्रमुख म्हणून करावी. रोटेशन/लॉटरी पद्धतीचा वापर करावा : गावातील/परिसरातील विशिष्ट विद्यार्थ्यांना साहाय्य व्हावे याकरिता विशिष्ट शिक्षकांना/प्राध्यापकांनाच त्या त्या वर्गावर पर्यवेक्षक म्हणून टाकले जाते, अशा प्रकारचे लागेबांधे टाळण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती लॉटरी पद्धतीने करावयाचा नियम करावा.


तटस्थ बैठे पथक नेमावे : समाजात अनेक व्यक्ती, शिक्षणप्रेमी कॉपीमुक्त परीक्षांसाठी निशुल्क मोबदल्यात मोलाची भूमिका बजावू शकतात. बोर्डाने इच्छुकांना आवाहन केल्यास अनेक निवृत्त शासकीय अधिकारी, सजग नागरिक आपले नावे बोर्डाकडे नोंदवू शकतात. अशा पाच लोकांचे एक बैठे पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर नेमावे. कॉपी कारवाई प्रक्रिया सुलभ असावी : वर्तमानातील कॉपी कारवाई प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि विद्यार्थ्यांकडे झुकलेली अशी आहे. पर्यवेक्षकाने कॉपी पकडल्यानंतर आजूबाजूच्या चार विद्यार्थ्यांच्या सह्या घेणे, केंद्रावरील पोलिसांची साक्षीदार म्हणून सही घेणे, विद्यार्थ्याने जीवाचे काही बरे-वाईट करू नये यासाठी पालकांना शाळेत बोलावणे, कारवाई सुरू झाल्यावर वारंवार बोर्डाच्या कार्यालयात हजर होणे अशा क्लिष्ट प्रक्रियेमुळे ‘भीक नको पण कुत्रे आवर’ अशा मानसिकतेततून पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख, शाळा प्रशासन कॉपी करणार्‍या विद्यार्थ्याला केवळ पोकळ धमक्या देत प्रकरण मिटवण्यात धन्यता मानताना दिसतात. वर्गात ‘सीसीटीव्ही’ असतील, तर कॉपी पकडणार्‍या शिक्षकाची बाजू अधिक मजबूत होऊ शकते. कारण, ‘सीसीटीव्ही’ फुटेज पुरावा म्हणून उपयोगात येऊ शकते. शिक्षकांना विश्वास देण्यासाठी कॉपी कारवाई प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करणे आवश्यक आहे.


क्लिष्ट डॉक्युमेंटेशन प्रक्रिया टाळावी : प्रत्यक्ष पेपर सुरू झाल्यानंतर पर्यवेक्षकांना पर्यवेक्षण करण्याबरोबरच ‘एबी फॉर्म्स’, ‘अटेन्डन्स फॉर्म’अशा प्रकारचे विविध ‘फॉर्म्स’ भरण्यासाठी ४०-४५ मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे पर्यवेक्षणाच्या दर्जावर नकारात्मक परिणाम होतो. यावरील उपाय म्हणजे एका वर्गावर एक शिक्षक पर्यवेक्षक आणि दुसरी शिक्षकेत्तर कर्मचारी अशा दोन व्यक्तींची नेमणूक करावी. शिक्षकेत्तर कर्मचार्‍याकडे ‘डॉक्युमेंटेशन’ प्रक्रिया सोपवावी. शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अन्य शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी किंवा निवडणूक मतदान प्रक्रियेत केली जाते, त्याप्रमाणे राज्य सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी. परीक्षा ही शिक्षणातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, हे ध्यानात घेत अन्य शाळेतील शिक्षकांनादेखील पर्यवेक्षणात समाविष्ट करावे.

परीक्षा केंद्रातील घटकांची मानसिकता कॉपीला पूरकच : आज परिस्थिती अशी आहे की, ‘फ्लायिंग स्कॉड’ आल्याची वर्दी देण्यासाठी शाळेकडे येणार्‍या रस्त्यांवर माणूस बसवला जातो. ‘स्कॉड’ आल्याची वार्ता मोबाईलद्वारे केंद्र प्रमुखाला दिली जाते.हा प्रकार म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार आहे, असे कृष्णकृत्य करणार्‍या घटकांवर बोर्डाने कडक कार्यवाही करायला हवी, अशा घटकांचे समुपदेशन करणे निकडीचे आहे.

परीक्षा केंद्राची मान्यता काढण्याचा नियम असावा : दक्षता पथक, फ्लाईंग स्कॉडला जर एखाद्या केंद्रावर पाचपेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी, अन्य तत्सम गैरप्रकार करताना आढळले, तर त्या केंद्राची मान्यता पाच वर्षांसाठी रद्द करण्याचा नियम असावा.
ज्यांचे पाल्य परीक्षार्थी आहेत, अशा शिक्षकांना कोणत्याही सबबीखाली (पर्यवेक्षकांचा तुटवडा, पाल्य असल्याची माहिती नव्हती) पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती देऊ नये. अनेक पालक, शिक्षणप्रेमी ’व्हिसल स्लोअर’चे काम करू इच्छितात. केंद्रातील गैरप्रकारासंदर्भात त्वरित माहिती देण्यासाठी बोर्डाचा स्वतंत्र कक्ष असावा. अशा केंद्राचा पत्ता, दूरध्वनी, फॅक्स क्रमांक जाहीर करावा. ’मदर सेंटर’ ही संकल्पना हद्दपार करत विद्यार्थ्यांना अन्य शाळा /महाविद्यालय केंद्र म्हणून द्यावीत. बोर्डाच्या परीक्षेसाठी केवळ स्वाध्यायाखालील जसेच्या तसे प्रश्न ही संकल्पना बाद करत अभ्यासक्रमावर आधारित अन्य प्रश्न विचारले जावेत. स्वाध्यायातील प्रश्नातील आकडेवारी बदलून प्रश्न विचारावेत. कडक पर्यवेक्षण करणार्‍या पर्यवेक्षकांना जाणीवपूर्वक परीक्षेत समाविष्ट केले जात नाही. पर्यवेक्षण सर्वांना अनिवार्य असावे, ते रोटेशनल पद्धतीने द्यावे. (विषय शिक्षक वगळता)


बोर्डाच्या परीक्षेचे ’वास्तव’ समाजासमोर येण्यासाठी प्रसारमाध्यमांना परीक्षा केंद्राचे छायाचित्रण करण्याची परवानगी असायला हवी. ज्या परीक्षा केंद्रावर ‘सीसीटीव्ही’ची सुविधा आहे, त्या ठिकाणी ज्यांना त्रयस्थ पंच म्हणून भूमिका निभावयाची आहे त्यांच्यासाठी सर्व वर्गाचे चित्रण परीक्षाकेंद्रातील एका रूममध्ये उपलब्ध असावे. विद्यार्थ्यांचा रोष टाळण्यासाठी कॉपी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करताना भेदाभेद टाळावा. पर्यवेक्षण करताना कर्तव्यात कसूर करणार्‍या पर्यवेक्षकाची वेतनवाढ रोखण्याचा अधिकार थेट बोर्डाकडेच असावा. संस्थाचालकाकडे तो असल्यास ते पाठीशी घालण्याची शक्यता वाढते. ’शिक्षा सूचीची’ प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी तसेच भरारी पथकांची संख्या वाढवावी. परीक्षा केंद्रात विद्यार्थी व शिक्षकांसाठी मोबाईला पूर्णपणे बंदी असावी. दहावीच्या परीक्षेत प्राथमिक शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करावी, तर बारावीच्या परीक्षेसाठी शाळेतील व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक यांना पर्यवेक्षण दयावे.


व्हॉट्सअ‍ॅप नंबरची सुविधा : एखाद्या ठिकाणी परीक्षेत गैरप्रकार घडत असेन, सर्रासपणे कॉपी चालत असेल, तर अशा केंद्राची तक्रार करण्यासाठी शिक्षण विभागाने व्हॉट्सअ‍ॅप नंबर जाहीर करावा. अनुदानासाठी किमान निकालाचे बंधन नसावे: अनुदानासाठी निकाल कमी लागणार्‍या शाळांवर विविध बंधने लादले जात असल्याने कृत्रिम पद्धतीने निकाल वाढवण्यासाठी स्वतः शिक्षक, संस्थाचालक कॉपीसारख्या गैरप्रकारांना प्रोत्साहन, अभय देत असतात. याकरिता किमान निकालाची अट शैक्षणिक संस्थांवर लादू नये. कॉपीचे उच्चाटन होण्यासाठी संबंधित घटकांची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. याकरिता आगामी तीन वर्षांकरिता शाळा /महाविद्यालयावर किमान निकालाचे बंधन नसावे. 


कॉपीमुक्त परीक्षा धोरण प्रामाणिक हवे : गैरप्रकारांनी मुक्त, कॉपीमुक्त परीक्षांसाठी सर्वांत महत्त्वाचा उपाय हा की कॉपीमुक्त परीक्षांबाबत बोर्डाचे धोरण प्रामाणिक हवे आणि ते प्रत्यक्ष कृतीत प्रामाणिकपणे उतरवणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीने शिक्षक-पर्यवेक्षक-संस्थाचालकांचे समुपदेशन निकडीचे ठरते. परीक्षार्थी विद्यार्थी / पालकांचा फीड बॉक घेणे, प्रसारमाध्यमांना केंद्राला भेट देण्याची परवानगी देणे, संस्थाचालकांना परीक्षेच्या काळात प्रवेशबंदी, कॉपीची तक्रार करण्यासाठी तक्रार कक्ष, जे विद्यार्थी -शिक्षक-पालक ‘व्हिसलब्लोअर’ची भूमिका निभाऊ इच्छितात त्यांना आपले मत निनावी किंवा नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पाठवण्याची व्यवस्था निर्माण करणे उपायांचादेखील विचार करावा.


असे खरंतर उपाय अनेक आहेत. परंतु, जोपर्यंत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनिक-राजकीय व सामाजिक इच्छाशक्ती प्रबळ होत नाही, तोपर्यंत सर्व उपाय वांझोटे ठरत राहणार, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्याची अर्थातच गरज असत नाही. बोर्डाच्या परीक्षांच्या निकालात कॉपीचा सिंहाचा वाटा आहे, हे बोर्ड-शिक्षण खाते नाकारत असले तरी असरचा रिपोर्ट त्याला छेद देतो हे डोळ्याआड करता येणार नाही. याविषयीचे मत शिक्षणमंत्र्यांनी सार्वजनिक मंचावरून व्यक्त करावेत, म्हणजे कॉपीमुक्त परीक्षांचे ‘अच्छे दिन’ कधी येणार की येणारच नाहीत, याविषयीचा संभ्रम दूर होईल.
- सुधीर दाणी

(लेखक शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवरील भाष्यकार आहेत.)








आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.