मुंबई (प्रतिनीधी) : सोलापुरमधील केगाव ते विजापुर रोड या राष्ट्रीय महामार्गावरील पुल ओलांडताना काळविटांचा एक कळप पुलावरून खाली पडल्याची घटना घडली आहे. या कळपामध्ये १५ काळविटे असुन १३ काळविटे मृत्युमुखी पडली. तर, दोन काळविटांवर उपचार सुरु आहेत.
सोलापुरमधील राष्ट्रीय महामार्गाच्या देशमुख वस्ती परिसरात (शनिवारी) दि. २८ जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास १५ काळविटांचा कळप फिरत असताना पुलावरुन खाली पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. . पुलावरुन खाली पडल्यानंतर कळपातील १२ काळविटांचा जागीच मृत्यु झाला. तर, ३ काळविटे पाय मोडलेल्या गंभीरपणे जखमी अवस्थेत आढळली असुन त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान एका काळविटाचा मृत्यु झाला असुन इतर दोघांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती सुत्रांकडुन देण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील हा पुल टेकडी पोखरुण बनवण्यात आला असुन तो काळविटे चरतात त्या गवताळ प्रदेशातून जातो. चार महिन्यांपुर्वी या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभारताना वन्यजीव परिसंस्था धोक्यात येतेय का याचा विचार केला जात नाही हे वारंवार अधोरेखीत होत आहे. वन्यजीव परिसंस्थेला धोका पोहोचु नये म्हणुन शमन उपायांची (मिटीगेशन मेजर्स) योजना केलेली आहे. त्या न पाळल्यामुळे परिसंस्थेला धक्का लागुन अशा घटना घडत आहेत.
काळविट म्हणजे काय ?
काळविट हे हरणांच्या कुरंग हरीण कुळातील एक प्रमुख हरीण आहे. मुख्यत्वे भारतातील शुष्क प्रदेशातील ओसाड माळरानांवर काळविटांचा अधिवास आढळुन येतो. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेतील प्रदेशात यांचे वास्तव्य आहे. नर काळवीट हा काळ्या रंगाचा असून मादी ही भुऱ्या रंगाची असते. नरांना प्रामुख्याने शिंगे असतात. माद्यांना शिंगे नसतात.