
आपल्या शरीरात अनेक पेशी असतात. त्यात वास्तव्य करणारे गुणाणू त्यांच्या मूळ रचनेला सोडून गुणपरिवर्तनाकरिता आवश्यक ती गुणाणुरचना करतात. यालाच ‘कुंडलिनी जागृती’ असे म्हटले आहे. कुंडलिनी जागृतीच्या असल्या गुणाणुबदलाचे ज्ञान होण्याकरिता आपल्याला लोखंडी तुकड्याचे चुंबकीकरण कसे केले जाते व ते होताना लोखंडी पट्टीत आतून काय फरक होतो, याचे विज्ञान पाहावे लागेल. कोणत्याही लोखंडात मुळचेच चुंबकत्व असते. त्यातील कणांच्या त्रिकोणीरचनेमुळे ते चुंबकत्व त्यात असूनसुद्धा बाहेर पडत नाही. चुंबकत्वाच्या प्रयोगात त्या लोखंडी तुकड्यात बाहेरून चुंबकीय शक्ती ओतली जात नसून त्यातील त्रिकोणात्मक अणुरचना बदलून ती चुंबकनिर्मितीकरिता आवश्यक अशा सरळ रेषेत होत असते. हा सिद्धांत विज्ञानात रूढ झालेला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनासुद्धा हे तत्त्व माहीत आहे. लोहातील प्रत्येक कणात असले लोहचुंबकत्व मूलत:च असते, पण त्यातील कणांची रचना एकमेकांच्या ध्रुवांना आकर्षित करुन त्रिकोणात्मक झाल्याकारणाने प्रत्येक लोखंडात चुंबकशक्ती असून ती बाहेर दिसत नाही. चुंबकशास्त्रात एक सिध्दांत असतो. विजातीय चुंबक एकमेकांचे कर्षण करतात, तर सजातीय चुंबक एकमेकांना दूर ढकलतात. लोहकणांच्या एका टोकाला उत्तर ध्रुव असल्याने जवळच्या दुसर्याक लोहकणांतील दक्षिण ध्रुवाला तो आकर्षित करतो. दुसरी दक्षिण व उत्तर ध्रुवांची टोके अन्य लोहकणांशी आकर्षित केली जातात.
अशा तर्हेतने कणाकणातील उत्तर-दक्षिण ध्रुवांच्या कर्षणामुळे लोखंडात मूळची चुंबकशक्ती असूनही ती बाहेर दिसू शकत नाही. ती ध्रुवशक्ती एकमेकांनी कर्षण केल्यामुळे त्यांची कर्षणशक्ती बाहेर दिसू शकत नाही. त्रिकोणात्मक गुंफली असल्यामुळे तो लोहखंड त्यातील चुंबकत्व असून दाखवू शकत नाही. त्या लोहखंडावर अन्य चुंबकाचे एक ध्रुव टोक सतत एकाच दिशेने गतिमान करून वर उचलावे लागते व पुन्हा तसेच करावे लागते. असे बरेच वेळा केल्यानंतर त्या लोहखंडातील बहुतेक कणांची मूळ रचना बदलून त्या कणांची रचना एकाच दिशेने होत असते. मग ते कण तसेच राहतात आणि लोहखंडाच्या दोन्ही बाजूंना ज्या ध्रुव गुणांचे कण रचित झाले असतील, त्या-त्या ध्रुव गुणांचे ते टोक बनते. अशा तर्हे्ने त्या लोहखंडात त्यातील आंतरकण रचना बदलून त्यातीलच चुंबकत्व दिसू लागते. हे प्राप्त झालेले चुंबकत्व त्या लोहखंडाच्या बाहेरून आले नसून त्यातीलच एक असते. त्यातील चुंबकत्व जागृतीमुळे त्या लोहखंडाला चुंबकत्व प्राप्त होत असते.
याच न्यायाला धरून आपल्यातील कुंडलिनी जागृती होत असते. कुंडलिनी जागृती म्हणजे कुठली बाहेरील शक्ती नसून आपल्या शरीरांतील गुणकणांची नूतन अवस्थेतील रचना होय, ज्यामुळे कुंडलिनी जागृत झाली, असे आपल्याला वाटते. कोणी कोणाची कुंडलिनी जागृत करीत नसून साधकाच्या साधना प्रयत्नानेच त्याच्या पेशी-पेशीतील मूल गुणाणुरचना बदलून ती उन्नत उत्क्रांत अशा दिव्य अवस्थेत येत असते. त्याकरिता आपल्याला आपल्या शरीरातील पेशीरचना पाहावी लागेल.
आपल्या शरीरात सर्वत्र इंद्रियांच्या कार्याला धरून निरनिराळ्या आकाराच्या पेशी असतात. त्या पेशीला एक आवरण असून त्याच्या मध्यभागी थोडा घनपदार्थ असतो, त्याला पेशीकेंद्र म्हणतात. या पेशीत सर्वत्र पेशीद्रव भरलेले असते. ते एकसारखे पेशीत सर्वत्र संचार करीत असते. पेशीकेंद्रात अनेक रचना भरल्या असून त्यांचे परस्पर व्यवहार एकसारखे चालू असतात. पेशीकेंद्रात निर्धारित संख्येत गुणसूत्र असतात. प्रत्येक योनिगणिक हे गुणसूत्र निर्धारित संख्येत असतात. या गुणसूत्रात आणखी ‘डंबेल’च्या आकारांच्या रचना असतात, त्यांना संस्कारकेंद्रे अथवा ‘जीन’ असे म्हणतात. संस्कार केंद्रे प्रत्येक योनीतील पूर्व संस्कार व स्वभावगुण आपल्या सूक्ष्मकणात साठवून ठेवीत असतात. प्राणियोनीनिहाय या संस्कार केंद्रातील गुणरचना उत्क्रांतीद्वारे बदलत असते. मातापित्यांचे सर्व संस्कार याच संस्कार केंद्रातून ग्रहण केले जातात व वितरित केले जातात. त्या संस्कार केंद्रातही आणखी कुंडल स्वरूपाची एक सूक्ष्मरचना असते. ही कुंडलरचना म्हणजे आपल्या कुंडलिनीचे मुख्य स्थान होय. प्राणिमात्रांतील स्वभावाची मूलरचना म्हणजे ही कुंडलरचना होय. आपल्या ऋषिमुनींना ही कुंडलरचना माहीत असावी म्हणून त्यांनी त्या अवस्थेला ‘कुंडलिनी’ असे नाव दिले असावे. अतिशय शक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय ही सूक्ष्म कुंडलरचना आज दिसू शकत नाही. ती कुंडलरचना ऋषींनी केवळ ध्यानाद्वारे पाहिली असावी, असे वाटते.
या कुंडलरचनेत काही कण असतात. त्यावर एक आवरण असते. प्राण्यांच्या स्वभाव अथवा गुणांना धरून या कणांची सापेक्ष रचना असते. हे गुणकण एका विशिष्ट सापेक्ष रचनेत एकमेकांना तोलून असले म्हणजे त्या विशिष्ट रचनेतून तसाच गुण उत्पन्न होतो. गुणकणांची ही सापेक्ष रचना अन्य कारणास्तव बदललेली असल्यास व्यक्तीचा गुणही बदलतो. असला गुणबदल उत्क्रांतीत क्रमागत बर्यानच दीर्घ कालांतून होत असतो आणि त्याद्वारे प्राणियोनीच्या गुणांत व त्याला धरून शरीर रचनेतही फरक पडत जातो. असल्या गुणबदलामुळेच योनीपरिवर्तन होत असते. अमिबापासून मत्स्य व मत्स्यापासून मानव याच दीर्घ गुणबदलाच्या क्रमातून तयार झाला आहे. मानव ही उत्क्रांतीतील शेवटची अवस्था मानली गेली आहे. पण, साधारण मानव ही उत्क्रांतीतील शेवटची अवस्था नसून परम योग्याचे नवशरीर उत्क्रांतीतील शेवटची अवस्था होय. ही परमोच्च उत्क्रांत अवस्था मानव साधना करून कुंडलिनी जागृतीद्वारे प्रयत्नाने आणू शकतो. यालाच कुंडलिनी जागृती असे म्हणतात. साधकाच्या जन्माच्या वेळेस असले उच्च उत्क्रांत शरीर नसते. ते साधना पराक्रमाने साधक बदलू शकतो. असले पूर्णतया बदललेले शरीर त्या साधकाच्या जीवनात अगदी नवीन असते. म्हणजे शरीरातील पूर्वीच्या सामान्य ‘शक्तिधारा’ आता पूर्ण बदलून साधकाच्या शरीरात त्या एकदम नवीन म्हणजे ‘राधा’ होतात. ही ‘राधा’ शरीररचना उच्च साधकरूप श्रीकृष्णाला अधिक प्रिय असते. यालाच श्रीकृष्णाचे एका परक्या विवाहित स्त्रीवर प्रेम असे भगवान वेदव्यास आपल्या साहित्यिक भाषेत वर्णन करतात. कुंडलिनी जागृत झालेले शरीर साधकालाही नवीन व परके असते. राधा-कृष्णाचे असे अमर प्रेम असते जो आदर्श साधना क्षेत्रातील आहे, समाजक्षेत्रातील नाही. राधाकृष्णाच्या असल्या अमर प्रेमाचा खरा यौगिक आशय न समजून काही तथाकथित भोंदू महाराज आपल्या स्त्री साधकांना राधा बनवून गैर प्रकार करताना दिसतात आणि वरून त्याला शास्त्राचा आधार देतात. हा अध्यात्म शास्त्राचा अपमान होय, असे म्हणावे लागेल. खरा योगी सर्व मोहमायेच्या वर असतो.योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357