सन 1983 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने महाराष्ट्रातील स्वयंसेवकांच्या त्रिदिवसीय भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या घटनेला आज चार दशके पूर्ण होत असल्याने हे विशेष संस्मरण...
मारे 40 वर्षांपूर्वी 1982-1983 मध्ये महाराष्ट्र प्रांतात ’हिंदू सारा एक...’ ही ओळ जणू एक घोषणा झाली होती. ज्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या लढ्यात ’वंदे मातरम्’ या घोषणेने सर्व लहान-थोर स्वातंत्र्यसैनिकांना, क्रांतिकारकांना, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश राजसत्तेविरूद्ध लढण्याची प्रेरणा दिली होती, तशीच प्रेरणा ’हिंदू सारा एक’ या ओळीने सर्व संघ स्वयंसेवकांना दिली होती आणि याचे यथार्थ दर्शन स्वयंसेवकांनी जीवापाड मेहनत, खेडोपाडी प्रवास, संपर्क करून पुण्यात तळजाईच्या टेकडीवरील विस्तीर्ण पठारावर 35 हजार) स्वयंसेवकांचे एक भव्य शिबीर यशस्वीरित्या घेऊन समाजाला घडविले.
दि. 14, 15, 16 जानेवारी, 1983 या कालावधीत हे शिबीर पार पडले. इतक्या मोठ्या संख्येने तीन दिवस एकत्र राहण्याची, भोजनाची, पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था, प्रकाशयोजना, ध्वनी व्यवस्था, कार्यक्रमांची रचना, पृथ्वीच्या आकाराचे भव्य व्यासपीठ, संघकार्याचा परिचय करून देणारी आकर्षक प्रदर्शनी, कल्पक व विशाल प्रवेशद्वार, या सर्व गोष्टी आजही स्मरणात आहेत. मागे वळून पाहताना हे कसे घडवले गेले, असा स्वतःलाच प्रश्न पडतो. परंतु, जेव्हा हे प्रत्यक्षात येत होते, तेव्हा मात्र एक विलक्षण धुंदी चढल्याप्रमाणे संघ कार्यकर्ते काम करत होते. त्यावेळी गावोगावच्या कार्यकर्त्यांना या भव्यदिव्य कार्यक्रमाची कल्पना डोळ्यांसमोर आणता आली असेलच, असे नाही.
परंतु, आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त स्वयंसेवक उपस्थित करावयाचे आहेत, याच एका उद्देशाने सर्वच जिल्ह्यांतील कार्यकर्ते प्रयत्न करीत होते. नांदेडपासून गोव्यापर्यंत आणि जळगावपासून कोल्हापूरपर्यंतच्या उभ्याआडव्या महाराष्ट्र प्रांतातून 35 हजारांच्या संख्येत स्वयंसेवक एकत्र आले आणि संघावरील सर्व पारंपरिक आरोपांना म्हणजे संघ ब्राह्मणांचा आहे, संघ शहरी उच्चभ्रू लोकांचा आहे, व्यापार्यांचा धनिकांचा आहे इ. परस्पर उत्तरे मिळून गेली आणि तळजाई शिबिरानंतर महाराष्ट्रात संघ विरोधकांकडून वरील सारखे आरोप केले जाणे कायमचे थांबले. दुसरे नवीन आरोप करून आपला संघविरोधाचा कंडू हे विरोधक आजतागायत शमवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हा भाग वेगळा. परंतु, पूर्वीच्या पारंपरिक आरोपांना संघकार्याच्या भव्य दर्शनाने विराम मिळाला, ही मोठी उपलब्धी होती. या शिबिराचे वर्णन एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने महाराष्ट्रातील संघकामात ’हे शिबीर म्हणजे एक मैलाचा दगड’ ठरले आहे, असे केले होते, ते अगदी यथार्थ होते.
शक्तिप्रदर्शन व पूर्वतयारी
इतके भव्य नियोजनबद्ध, आयोजन आपोआप केवळ कोणाच्या तरी आदेशाने, एखाद् दोन दिवसात करता येणे शक्य नसतेच, हे कोणीही समजू शकतो. 1967 मध्ये पुण्याजवळच चिंचवड येथे दहा हजार स्वयंसेवकांचे असेच तीन दिवसांचे शिबीर झाले होते. त्यावेळी सरसंघचालक असणारे प.पू.श्री गुरूजी गोळवलकर पूर्णवेळ उपस्थित होते. त्यानंतर संघाने आणीबाणीच्या संकटाचा यशस्वी सामना करून सर्व समाज व राजकीय पक्ष यांच्या सहकार्याने देशात पुन्हा एकदा लोकशाहीची पुनर्स्थापना केली होती. त्यामुळे संघ हा त्यानंतर समाजाच्या व विशेषतः राजकीय क्षेत्रात चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता आणि संघ ही एक सामाजिक शक्ती आहे, हे समाजाला जाणवू लागले व एक प्रकारची मान्यताही मिळू लागली होती. अशा स्थितीत संघाचे काम भौगोलिक क्षेत्र व विविध सामाजिक स्तरात किती वाढले आहे, याचे दर्शन म्हणा, चाचपणी म्हणा किंवा परीक्षण म्हणा करून पाहणे आवश्यक वाटल्याने तत्कालीन प्रांत संघचालक बाबाराव भिडे असे प्रांताचे एक शिबीर घ्यावे, अशी कल्पना शिबिरापूर्वी तीन-चार वर्षांपासून कार्यकर्त्यांसमोर मांडत होते आणि संघात सर्व निर्णय सहमतीने होत असल्याने याही विषयावर झालेल्या चर्चेअंती 1983च्या जानेवरीमध्ये असे शिबीर घ्यावे, असे ठरले.
महाराष्ट्र प्रांतात बाबाराव भिडे यांचे संघकार्यात स्थान असे होते की, त्यांची इच्छा हीच आज्ञा मानली जात असे. असे भव्य शिबीर घ्यावे, असे ठरल्यानंतर सर्व जिल्ह्यांत प्रयत्न सुरू झाले. जिल्हा कार्यकर्ते, प्रांत कार्यकर्ते यांचे प्रवास सुरू झाले. निरनिराळे कार्यक्रम- उपक्रम सुरू झाले. संघाचे सर्व उत्सव, बैठका यात प्रांत शिबीर हाच मुख्य विषय असे. जिथे शिबीर घ्यायचे, त्या पुण्यात प्रत्यक्ष शिबीर उभारणी, इतर व्यवस्थांसाठी लागणारी साधनसामग्रीची जुळवाजुळव, पाणी, वीज, स्वच्छता, निवास इत्यादीचा बारकाईने विचार व जबाबदार्यांचे नियोजन, अशी लगबग सुरू झाली. येणार्या शिबिरार्थ्यांकडून करवून घ्यायच्या शारीरिक कार्यक्रमांची निश्चिती, पाठांतराच्या गीतांचा सराव, हे सगळीकडे एकाच पद्धतीने व्हावे, यासाठी सर्व जिल्ह्यातील शारीरिक प्रमुखांच्या दरमहा बैठका असा धूमधडाका सुरू झाला. स्वतः प्रांत संघचालक बाबाराव भिडे शिबीर उभारणी व महाव्यवस्थापक म्हणून जबाबदारी असणारे तात्या बापट यांच्या परिश्रमांना तर तोड नव्हती. कदाचित या अतिपरिश्रमांमुळेच या दोघांचेही शिबीर झाल्यानंतर काही महिन्यांतच निधन झाले.
हिंदू सारा एक...
या शिबिराच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे समाजातील गणमान्य व्यक्तींची उपस्थिती. तत्कालीन प. पू.सरसंघचालक बाळासाहेब देवरस, सरकार्यवाह रज्जुभैय्या, संघाचे अखिल भारतीय पदाधिकारी तर होतेच, त्याचबरोबर प्रख्यात वक्ते व तत्त्वचिंतक प्राचार्य शिवाजीराव भोसले, ’स्वाध्याय’ चळवळीचे प्रमुख प.पू.पांडुरंगशास्त्री आठवले, ’स्वामी’कार लेखक रणजित देसाई, नामवंत संगीतकार सुधीरजी फडके अशी अनेक नावे घेता येतील.
या शिबिरात पाठांतरसाठी ’हिंदू सारा एक मंत्र हा, दाही दिशांना घुमवूया’ हे गीत भारतीय जनता पक्षाचे नेते, ज्येष्ठ स्वयंसेवक कै. डॉ. अरविंदराव लेले यांनी तयार केले होते. त्याला चाल लावून ते सर्वांकडून म्हणवून घेतले ते आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध गीतगायक संगीत दिग्दर्शक बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनी. प. पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आपल्याला समतायुक्त- शोषणमुक्त समाज उभा करायचा आहे, असा संदेश याच शिबिरात स्वयंसेवकांना दिला.
पथसंचलन
शिबिरात सर्वात आकर्षक कार्यक्रम झाला तो म्हणजे पथसंचलनाचा. शिबीर स्थानावरून निरनिराळ्या तीन गटांत विभागलेले 35 हजार स्वयंसेवक तीन वेगवेगळ्या दिशांनी मार्गस्थ झाले व संपूर्ण पुणे शहरात फिरून एका ठरलेल्या चौकात एकाच वेळी एकत्र आले. कोणत्याही गटाला या चौकात येण्यास एखाद्या मिनिटाचाही उशीर झाला नाही. हा काही योगायोग नव्हता, तर अचूक नियोजन, गती आणि वेळ यांचा योग्य ताळमेळ साधण्यामुळे हे शक्य झाले होते. दर दोन हजार स्वयंसेवकांमागे एक घोषपथक होते. त्या वाद्यांच्या तालावर स्वयंसेवक संचलन करीत होते. हा सर्व शहरांत व वृत्तपत्रांतही एक चर्चेचा, कौतुकाचा विषय झाला होता.
पुणे शहरातून गुळाच्या पोळ्या
शिबीर कालावधीतच मकरसंक्रांत येत असल्याने आलेल्या सर्व स्वयंसेवकांसाठी गुळाच्या पोळ्या घराघरांतून गोळा कराव्यात, असे ठरले व तसे नियोजनही केले गेले. जवळजवळ 80 हजार कुटुंबातून सुमारे 1 लाख, 25 हजारांच्या वर (सव्वा लाख) गुळाच्या पोळ्या संकलित केल्या गेल्या आणि शिबिरार्थ्यांची संक्रांत साजरी झाली. या पोळ्या गोळा करण्याच्या नियोजनाची व फलस्वरूप गोळा झालेल्या पोळ्यांची संख्या व देणार्या घरांची संख्याही अचंबित करणारी होती. त्यामुळे याही विषयाची चर्चा सर्वत्र झाली होती.
संघकार्याचा एक अविभाज्य पैलू म्हणजे सेवा कार्य. निःस्वार्थ, निरपेक्ष बुद्धीने संघ समाजाची सेवा आपत्तीच्या काळात व सामान्य परिस्थितीतही करत आलेला आहे. याचेच दर्शन उडवणारी एक आकर्षक प्रदर्शनी प्रवेशद्वाराजवळच उभी केली होती. सुमारे एक लाखांपेक्षा अधिक पुणेकर व उत्सुकतेपोटी केवळ शिबीर पाहण्यासाठी अन्य गावांतून आलेल्या नागरिकांनी या प्रदर्शनीस भेट दिली होती. या प्रदर्शनीतून संघकार्याचे स्वरूप लक्षात आल्यामुळेही समाजातील संघविरोधाची धार कमी होऊन संघकार्यास साहाय्य करण्याची भावना समाजात वाढीस लागली, असे निश्चितपणाने म्हणता येईल. शिबिराची उभारणी, रचना, स्वयंसेवक यावेत म्हणून केले गेलेले प्रयत्न, कार्यकर्त्यांचे परिश्रम व समाजाने भरभरून दिलेले साहाय्य, हे करत असताना आलेले हृदयस्पर्शी अनुभव, हा विषय इतका मोठा आहे की, त्यापैकी प्रत्येक बाबीवर वर स्वतंत्रपणे लिहावे लागेल.
महाराष्ट्रातील संघकार्याला समाजव्यापी बनविण्याचे काम या तळजाई शिबिराने केले हे निश्चित!
- गोविंद यार्दी
(लेखक रा. स्व. संघ जनकल्याण समिती, प्रांत संस्कार आयाम प्रमुख, नाशिक आहेत.)