डॉक्टरांकडून अविरत समाजसेवेचा वसा

    12-Jan-2023
Total Views | 133
Dr. Avinash Vaidya


समाजातून एका अनोख्या मार्गाने गरजूंसाठी पैसा उभा करुन नि:स्वार्थ समाजसेवा घडवली जाते. अशा अविरत समाजसेवेचा वसा घेतलेल्या डॉ. अविनाश वैद्य यांच्या कामाविषयी जाणून घेऊया...


मूळचे पुण्याचे असलेले अविनाश वैद्य यांनी वैद्यकीय अभ्यास पूर्ण केल्यानंतर आपला वैद्यकीय पेशा सांभाळून सामाजिक कामाची सुरुवात केली. राज्यात विविध ठिकाणी फिरल्यानंतर नागरिकांच्या हालअपेष्टा आणि आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्षित घटकांसाठी काम करण्याचे ठरवले. १९९०मध्ये त्यांनी एक छोटासा दवाखाना सुरु केला. तेथे माफक दरात गरजूंना मोफत सेवा देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून वैद्यकीय सेवा हा केवळ व्यवसाय नव्हे, तर सेवाकार्य करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले.

वयाच्या अठराव्या वर्षापासून त्यांना सामाजिक कामाची आवड निर्माण झाली. रा. स्व. संघाच्या शाखेत जात असल्याने ते स्वयंसेवक म्हणून असंख्य जणांशी जोडले गेले होते. पुढे विविध सामाजिक कार्यात त्यांनी भाग घेतला. सुरुवातीला म्हणजेच ३० वर्षांपूर्वी त्यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे पहिलेच शिबीर खूप यशस्वी झाल्याचे ते सांगतात. त्यानंतर या क्षेत्रात काम करण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास सुरु केला. डॉक्टर झाल्यानंतर हेच काम पुढे सुरु केले. पॅथोलॉजीच्या माध्यमातून हजारो व्यक्तींची तपासणी सुरु केली. गेल्या ४० वर्षांत आत्तापर्यंत त्यांनी १ हजार, ७२० रक्तदान शिबिरे घेतली आहेत.

२ लाख, ९० हजारपर्यंत बाटल्या आत्तापर्यंत जमा केल्या असून, त्या गरजूंना पुरवल्याचे डॉ. वैद्य सांगतात. पुणे जिल्ह्यासह वाई, नगर, सांगली या भागातही रक्तदान शिबीरे घेण्यात आली. नुकतेच ४३ वे रक्तदान शिबीर घेण्यात झाले. सार्वजनिक सुट्टी, सणासुदीला, तर जयंती वा पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त काही असो रक्तदान शिबीर आम्ही आर्वजून घेतोच, असे ते सांगतात. एवढेच नव्हे, तर पुढे जाऊन एकाच दिवशी दोन ते तीन ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात आली. महिन्याला पाच ते आठ, तर वर्षाला ५०हून शिबिरे घेण्यात येतात. या माध्यमातून २०१४ मध्ये श्रीशंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवड संस्था सुरु केल्यानंतर असंख्य सामाजिक कामांची मुहूर्तमेढ रोवली.

शहरातील गरजू, गरिबांना छत नसल्याने ते रस्त्यावर अथवा मंदिराजवळ आपला गुजारा करीत असल्याचे दिसल्याने त्यांच्यासाठी काहीतरी करायचे ठरवले. त्यासाठी ‘स्नेहसावली आपलं घर’ हा आश्रम सुरू केला. यात २३ जण राहतात. यात राहणे, जेवण आणि संपूर्ण आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया केली जाते. राहणार्‍या व्यक्तींच्या शस्त्रक्रियेच्या खर्चाचा विषय पुढे आल्याने त्यांनी निधीसाठी नागरिकांना आवाहन केले. मात्र, पैशांचा विषय आल्याने नागरिकांकडून तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा काहीसे नाराज झाल्याचे डॉ. वैद्य सांगतात. पण, हा खर्च आणि एकूण आश्रमाचे व्यवस्थापन चालवायचे कसे, याचा विचार करीत असताना एक अनोखी संकल्पना पुढे आली. त्यातून ‘स्क्रॅप बँक ऑफ इंडिया’ हा उपक्रम सुरु केला. या माध्यमातून समाजाला आवाहन केले की, गरजू आणि गरिबांसाठी सुरु केलेल्या या उपक्रमात मला साथ द्या.

 पैसे नसले तर हरकत नाही, तर तुमच्या घरात जी वस्तू नको आहे, ती मला द्या. जसे रद्दी, खराब व टाकाऊ वस्तू त्यांनी मागितल्या. ते सर्व गोळा करुन त्यांनी कंपनीला देणे सुरु केले. पुढे कंपनीला या कामाचे महत्त्व पटल्यानंतर कंपनीकडून डॉ. वैद्य यांनी त्याची चांगली किंमत मिळू लागली. लोकांच्या घरात जावून त्या वस्तू गोळ्या केल्या, अशी आठवण ते सांगतात. या माध्यमातून ११ हजार कुटुंबीयांशी ते जोडले गेले. अशा प्रकारे शस्त्रक्रिया अथवा गरजूंसाठी मदत लागल्यास या ११ हजार लोकांना डॉ. वैद्य संदेश पाठवतो. शक्यतेनुसार ते मदतही पाठवतात. गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम चालू आहे. पुणे जिल्ह्यातून नव्हे, तर, नाशिक, नगर, सोलापूर, भोर, महाड अशा विविध ठिकाणांहून मदत मिळू लागली. या उपक्रमातून आत्तापर्यंत १००हून अधिक गरजूंच्या शस्त्रक्रिया केल्याचा आनंद आहे, असे ते म्हणतात.

याच जोडीला गेल्या नऊ वर्षांपासून एक अनोखा अभिनव उपक्रम राबवत ते आले आहे. दरवर्षी ते शुद्ध शाडूच्या गणेशमूर्ती तयार करतात. गणेशोत्सवाच्या काळात एका ठिकाणी त्या विक्रीला ठेवून ते भाविकांना बोलावतात. या मूर्ती प्रदर्शनाचा ‘मूर्ती आमची, किंमत तुमची’ हा उद्देश असतो. भाविक त्या मूर्तीची किंमत ठरवतो. ती मदत पुढे रक्तदान शिबीर, वृद्धाश्रम, आजारी व गरजूंसाठी शस्त्रक्रिया, तसेच पर्यावरण रक्षणासाठी वापरली जाते.

यासह आणखी समाजासाठी बरेच काही करायचे असल्याचे सांगून वैद्य म्हणाले की, “सद्य:स्थितीत वृद्धाश्रम भाड्याच्या जागेत आहे. स्वतःच्या जागेत २०० गरिबांची सेवा करता येईल, अशी वास्तू उभारण्याचा मानस आहे. तसेच, गोरगरीब मुलांचे शिक्षण पूर्ण करतो. ४० विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण पूर्ण केले आहे. आणखी काही विद्यार्थ्यांचेही शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.” पर्यावरणासाठी प्लास्टिकबंदीसाठी जुने कपडे संकलित करुन त्यांनी एक लाख कापडी पिशव्या शिवून मोफत वाटल्या. भविष्यात मोफत अन्नछत्र सुरु करण्याचा विचार असल्याने त्या दृष्टीने काम सुरु आहे, असे ते म्हणाले. डॉ. अविनाश वैद्य यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.



-पंकज खोले


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121