मुख्यमंत्र्यांचा आदित्य ठाकरेंना दे धक्का?

03 Sep 2022 16:30:27
eknath shinde, aditya
 
 
मुंबई : वरळीतील अनेक समस्या प्रलंबित असल्याने माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मतदार संघात नाराजी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपने वरळी मतदारसंघात आदित्य यांच्या विरोधात रान पेटवायला सुरुवात केली. त्याचा पहिला अंक जांंबोरी मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुरु केला. तर दुसरीकडे वरळीतील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. येत्या काही दिवसात वरळीतील काही शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने आदित्य ठाकरे यांची चिंता वाढू शकते.
 
  
वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. म्हणूनच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना आमदारकीसाठी वरळी मतदार संघाची निवड केली. भविष्यात कोणतेही नाराजी नाट्य आदित्य यांच्यासाठी अडचणीचे ठरू नये, या उद्देशाने सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. वरळीने शिवसेनेच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकलेले असून देखील, वरळीतील रस्त्यांचा प्रश्न आदित्य ठाकरे यांना निकाली लावता आलेला नाही. त्यामुळे या मतदार संघातील मतदार आदित्य ठाकरेंंवर  नाराज आहेत.
  
 
म्हणून स्थानिक शिवसैनिक देखील  ठाकरे गटावर नाराज
 
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात कोस्टल रोड, न्हावाशेवा ट्रांस हार्बर अश्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. परंतु असे असूनही स्थानिक शिवसैनिकांना या प्रकल्पात कामें मिळावीत यासाठी आदित्य ठाकरेंनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये आदित्य ठाकरेंबद्दल रोषाची भावना आहे,असे सांगितले जाते.
 
  
वरळीत लागले मुख्यमंत्र्यांचे पोस्टर 
 
गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकले. वरळीचा श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 'लाडका मार्केटचा राजा'च्या स्वागत कमानीवर 'महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री', असे लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी वरळीतील ठाकरे गटातील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचे बोलले जाते. त्यामुळे येत्या काही दिवसांत या मतदारसंघातील ठाकरे गटातील  पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठा आहोत हे स्टँँप पेपरवर लिहून द्या, या आवाहनाला खुद्द आदित्य ठाकरेंंच्या वरळी मतदार संघातून अत्यल्प प्रतिसाद लाभल्याचे सांगण्यात येते. त्यात ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास, येत्या मुंबई महापालिका निवडणूक आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटासाठी धोक्याचे ठरू शकते.  
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0