मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी 'चांदा ते बांदा' ही योजना आणली होती. त्यावेळी सध्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर हे या योजनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अध्यक्ष तर कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरमधील अध्यक्ष होते. या योजनेचा लाभ सर्वसामान्य शेतकरी, मच्छिमार, कलावंत, उद्योजक या सर्वांनाच झाला असल्याने ही योजना तळागाळापर्यंत पोहोचली होती. मात्र २०१९ मध्ये आलेल्या ठाकरे सरकारने ही योजना बंद केली. आता फडणवीस-शिंदे सरकार आल्याने 'चांदा ते बांदा' ही योजना पुन्हा एकदा कार्यान्वित करणार असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. शेती अनेक उपयोगी अवजारं या योजनेतून मिळू लागली. मच्छीमारांना मासे टिकवण्यासाठीची सामग्री, बोटी, मच्छीमारी जाळी यासाठी लाभ होऊ लागला. तर आंबा बागायतदार आणि इतर उद्योजकांना या योजनेचा चांगला लाभ झाला. त्यामुळे सिंधुदुर्गात ही योजना तळागाळापर्यंत पोहोचली होती. २०१९ मध्ये ठाकरे सरकारने ही योजना ही योजना बंद करून रत्नसिंधू योजना सुरु केली. मात्र ती अमलात येईपर्यंत ठाकरे सरकार कोसळलं. त्यामुळे दीपक केसरकर यांना विचारलं असता त्यांनी रत्नसिंधूमध्ये 'चांदा ते बांदा' योजनेचे पैसे खर्च करून काही काळातच पुन्हा एकदा चांदा ते बांदा ही योजना कार्यान्वित करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
फडणवीस-शिंदे सरकारच्या आणखी एका निर्णयाने उद्धव ठाकरेंना धक्का!
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नसिंधू ही योजना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी आणली होती. त्या योजनेला आता ब्रेक देण्यात येणार आहे. कोकण हा शिवसेनेसाठी बालेकिल्ला असून याच कोकणासाठी ठाकरेंनी चांदा ते बांधा ही योजनेला ब्रेक देत रत्नसिंधू योजना आखली. मात्र सरकार बदलल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी असलेली योजना चांदा ते बांदा पुन्हा एकदा कार्यरत होत आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंना एक धक्का मानला जात आहे.
कशी असेल आताची चांदा ते बांदा योजना?
चांदा ते बांदा ही योजना संपूर्ण राज्यासाठी आहे. पहिला टप्प्यात चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश केला होता. मात्र टप्प्याटप्प्यानं त्या योजनेत राज्यातील इतरही जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा कार्यान्वित होणार आहे. रत्नसिंधू ही दोन जिल्ह्यांसाठी असणारी योजना बंद करून पुन्हा एकदा चांदा ते बांदा ही देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील योजना सुरू होणार आहे.