राजस्थानमध्ये 'ते' ९२ आमदार नवा पक्ष स्थापित करणार?

26 Sep 2022 12:52:39

rajasthan
 
 
जयपूर ः  राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या संघर्षासाठी ९२ आमदारांनी सुरू केलेल्या संघर्षाच्या चर्चेला आता नवे वळण आले आहे. मुख्यमंत्री निवडीबद्दल काँग्रेस हायकमांडवर नाराज असलेल्या ९२ आमदारांनी ठरवलं तर नवा पक्षही स्थापन केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
राजस्थानमधील मुख्यमंत्रिपदाचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेली काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठकही रद्द करण्यात आली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत समर्थक 92 आमदारांनी सामुहिक राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. हे आमदार काँग्रेस आमदार शांती धारीवाल यांच्या घरी एकत्रित झाले होते. इथेच त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.
 
 
याबाबत काँग्रेस नेते प्रताप खाचरियावास म्हणाले की, “आमची बैठक झाली असून आमच्याबरोबर 92 आमदार आहेत, त्यांनी राजीनामा दिला आहे. नव्या मुख्यमंत्री निवडीत आमचे मत विचारात घेतले नाही,” असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे हे सर्व आमदार नाराज आहेत. दरम्यान, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी अशोक गहलोत यांना फोन करत परिस्थिती नियंत्रणात आणायला सांगितले.
 
 
तथापि, आता माझ्या हातात काही नाही, असे उत्तर गहलोत यांनी वेणुगोपाल यांना दिल्याचेही वृत्त आहे. उल्लेखनीय म्हणजे, अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असून सचिन पायलट यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते. पण गहलोत गटाच्या आमदारांना ते मान्य नाही.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0