कलम ३७० रद्द करण्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय सुनावणीस तयार!
23 Sep 2022 17:29:21
नवी दिल्ली: जम्मू – काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० संपुष्टात आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून आता दसऱ्यानंतर त्यावर सुनावणी होणार आहे.
कलम ३७० रद्द करणे आणि जम्मू आणि काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करणे याला आव्हान देणारे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर तातडीने सुनावणीसाठी नमूद करण्यात आले होते, त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे.
दसऱ्याच्या सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित म्हणाले, 'आम्ही याप्रकरणावर सुनावणी करण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यापूर्वीही अनेकवेळा या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची मागणी करण्यात आली होती, हे प्रकरण २०१९ पासून प्रलंबित आहे.