मुंबईतील नद्यांचा विकास होणार कधी ?

22 Sep 2022 18:20:43

river cleaning
मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी नदी शुद्धीकरणासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र मुंबईतील नद्यांची स्थिती अद्यापही बदलेली नाही. पावसाळ्यातून मुंबईतील विविध भागांमध्ये पाणी साचते व मुंबईचे रूपांतर हे अक्षरशः तुंबईमध्ये होते. पावसातून मुंबईत पाणी साचू नये व मुंबईतील नाद्द्यांचे सौंदर्य वाढावे म्हणून मुंबई महापालिका नदी शुद्धीकरणाचा उपक्रम तर राबवते मात्र त्याचे सकारात्मक परिणाम होताना मात्र दिसत नाही.
मुंबई महापालिकेने दहिसर नदी, पोईसार नदी आणि ओशिवरा नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला होता. परंतु या नद्यांच्यास्थितीत मात्र कोणताही बदल झालेला दिसत नाही. दहिसर नदीचे रूपांतर तर अक्षरशः एका अस्वच्छ नाल्यात झालेले आहे. तसेच पोईसार व ओशिवरा नदीची देखील स्थिती काही फारशी चांगली नाही. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये मे २०११ पासून ‘रिव्हर मार्च’ची मोहिम सुरु करण्यात आली होती. मात्र या या मोहिमेच्या दहा वर्षांनंतरही मुंबईतील नद्यांची स्थिती काही सुधारलेली नाही. नद्यांना येणाऱ्या पुरामुळे शहरातील अनेक नागरिकांच्या घरात व दुकानांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
 
मिठी नदी साठी तर पालिकेकडून दरवर्षी विविध मोहीम हाती घेण्यात येतात. यापूर्वीही मुंबई महापालिकेकडून मिठी नदीचे रुंदीकरण, सुशोभीकरण, नदीपात्र व परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची कामे हाती घेतली गेली. परंतु या सर्वांचा फारसा काही परिणाम झालेला दिसून येत नाही. आत्तापर्यंत केवळ १५ ते २० टक्के कामे मिठी नदीवरील पूर्ण झाल्याचे येथील स्थानिकांचेही म्हणणे आहे. दरवर्षी मिठी नदीसाठी हाती घेण्यात येणाऱ्या कामांसाठी शेकडो कोटींहून अधिक रक्कम आत्तापर्यंत खर्ची पडलेली आहे.
 
दहिसर व ओशिवरा नद्यांवर दोन्ही बाजूंना रस्ते तयार करून मलजल प्रक्रिया केंद्रे बांधण्याच्या प्रकल्पांसाठी तब्बल १३०० कोटींचा खर्च असून पोईसर नदीच्या शुद्धीकरणासाठी व सौंदर्यीकरणासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
या प्रकल्पामध्ये नदीच्या पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणासाठी ८.७ किमी लांबीची सांडपाणी वाहिनी जाळी वापरात येणार असून ९.२ किमी लांबीच्या पर्जन्यवाहिनीचा वापरही करण्यात येणार आहे. तसेच नदीत बाहेरून टाकला जाणाऱ्या कचऱ्याच्या अडवणुकीसाठी १३ नाल्यांना इन्टरसेप्टर व जाळ्या आहेत. त्याव्यतिरिक्त ३३.५ दशलक्ष लिटर इतकी क्षमता असणाऱ्या दहा मेंब्रेन बायोरिअ‍ॅक्टर या मलजल प्रक्रियेकरिता आहेत.
दहिसर नदीच्याही शुद्धीकरणाचा प्रकल्प मुंबई महापालिकेने हाती तर घेतला परंतु त्याचे सकारात्मक पडसाद काही दिसत नाहीत. दरवर्षी करोडो खर्च हा नदी शुद्धीकरणासाठी होऊनही जर मुंबईतील नद्यांची दुरावसाठ कायम राहणार असेल तर या नदी शुद्धीकरण प्रकल्पाचा उपयोग तरी काय ? आणखीन किती दिवस मुंबईकरांनी त्यांच्या हक्काच्या नाड्यांपासून वनची राहायचं आहे ? आणखीन किती वर्ष मुंबईत नद्या अश्याच दुर्लक्षित राहणार आहेत ? अशा अनेक प्रश्नांची उत्तर मात्र अद्याप अनुत्तरीतच आहेत.
- शेफाली ढवण 
Powered By Sangraha 9.0