मुंबई : ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकारांचा शिंदे गटाच्या भूमिकेला पाठिंबा मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत केलेली युती नैसर्गिकच आहे, अशी कबुली ठाकरे गटाचे नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या समीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केले आहे.
तसेच जेव्हा शिवसेनेत बंडाळी होत होती तेव्हा आपण उद्धव ठाकरेंशी बोलून समेट करण्याचेही सांगितल्याचे कीर्तिकर यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्याला उपस्थित असताना त्यांनी ही कबुली दिली आहे. कीर्तिकारांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी एकप्रकारे शिंदे गटाच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.
वर्षा वारीवर कीर्तिकारांचे स्पष्टीकरण
भाजप शिवसेना युती झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थांनी किर्तीकर यांनी गणपती दर्शनासाठी उपस्थिती दर्शवली होती. यावर बोलताना ते म्हणाले, "मुख्यमंत्रीपद हे सत्तेचे केंद्रस्थान आहे. सुशील कुमार शिंदेंपासून ते अशोकराव चव्हाणांपर्यंत ज्या ज्यावेळी गणपतीसाठी जाण्याचा योग आला त्यावेळी आपण वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन दर्शन घेतले होते. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने माझ्या लोकसभा मतदार संघातील काही कामांच्या विषयी बोलण्यासाठी मी एकनाथ शिंदेंना भेटलो. तब्बल २५ कोटींच्या विविध कामांचे प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्र्यांना यावेळी दिले.", असेही ते म्हणाले.
कितीकाळ एकमेकांची डोकी फोडत रहाणार!
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजप शिवसेना युती डोळ्यापुढे ठेवून घेतलेल्या निर्णयाबद्दल कधीतरी समेट घडवून आणावा लागेल. दररोज एकमेकांची कितीकाळ डोकी फोडत रहायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याबद्दल मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांशीही बोललो. समेट करा, किती वर्ष अशी भांडत रहाणार आहात, असा सल्ला त्यांनी दिला आहे.