इंग्लंड नामक इस्लामी राष्ट्र

    22-Sep-2022
Total Views |
 
 
ingland
 
 
 
इंग्लंडच्या दोन शहरांत इस्लामी कट्टरपंथीयांनी हिंदूंविरोधात हल्ले केले, पण त्यावेळी तिथले पोलीस प्रशासन मुकदर्शकच राहिले. त्यामुळे कोणी कोणत्याही जातीचा, राज्याचा, देशाचा हिंदू असो, त्याला आपले बंधुच मानले पाहिजे, अन्यथा पाकिस्तान, अफगाणिस्तानच नव्हे, तर इंग्लंडही सुरक्षित नाही!
 
 
लोकशाही देशात विशिष्ट समुदायाच्या अन् त्यातही तो समुदाय मुस्लीम असेल, तर केल्या जाणार्‍या लांगूलचालनाचा परिणाम काय होऊ शकतो, याचा दाखला इंग्लंडमधील ताज्या घटनाक्रमांतून मिळतो. इंग्लंडच्या लिसेस्टर शहरानंतर इस्लामी कट्टरपंथीयांनी स्मेथविक शहरातील दुर्गा मंदिराबाहेर धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे. इथे एकाचवेळी तब्बल 200 धर्मांध जिहाद्यांच्या जमावाने मंदिरावर चाल करून जात दुर्गा मंदिराला घेराव घातला, मंदिराच्या भिंतीवर चढत ‘अल्ला-हु-अकबर’चे नारे लावले, तसेच मंदिराकडे तोंड करून हस्तमैथुनाचे विकृत हावभावही करून दाखवले. तत्पूर्वी इस्लामी कट्टरपंथीयांनी लिसेस्टरमधील हिंदू समुदायाला लक्ष्य करत मंदिरे आणि ओम् लिहिलेल्या भगव्या ध्वजाला नुकसान पोहोचवले होते.
 
 
आशिया चषकातील क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवल्याचे कारण यामागे दिले गेले. पण, हिंदूंवरील हल्ल्याचा प्रकार फक्त भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यापुरताच मर्यादित असू शकत नाही. कारण, तसे असते तर तो प्रकार फक्त भारतीयांविरोधात फक्त पाकिस्तान्यांची प्रतिक्रिया असा राहिला असता. पण, तसे झाले नाही आणि धर्मांध जिहाद्यांनी त्याला हिंदू-मुस्लीम वादाचे स्वरुप दिले. परिणामी, इंग्लंडमध्ये भारतासह नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान वगैरे देशांतून राहायला गेलेल्या प्रत्येक हिंदूविरोधात पाकिस्तानसह इतरत्रच्या इस्लामी कट्टरपंथीयांनी हिंसाचार केला. म्हणजेच मुस्लीम कोणत्याही देशातले असोत, त्यांनी प्रत्येक हिंदूला आपले शत्रू मानूनच हल्ला केला, हिंदू धार्मिक प्रतीकांची नासधूस केली. इस्लामी बंधुत्व सर्व मानवांसाठी नाही, ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित असल्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाकिस्तान विषयावरील पुस्तकातील विधानाची इथे प्रचिती येते. इंग्लंडमध्ये राहणार्‍या देशोदेशींच्या धर्मांध जिहाद्यांनी एकमेकांना बंधु मानून हिंदूंविरोधात एकत्र येत हिंसाचार घडवून आणला. यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे, मुस्लिमांतही अनेक भेदाभेद असून त्यांच्यात वादावादीही होते.
 
 
पण, ते परस्परांना मुस्लीमच मानत असतात आणि मुस्लिमांव्यतिरिक्त इतर कोणाविरोधात उभे ठाकायचे असेल, तर लगेच एक होतात. त्यावरून हिंदूंनीही धडा शिकला पाहिजे, कोणी कोणत्याही जातीचा, राज्याचा, देशाचा हिंदू असो, त्याला आपले बंधुच मानले पाहिजे, अन्यथा पाकिस्तान, अफगाणिस्तानच नव्हे, तर इंग्लंडही सुरक्षित नाही!
 
 
इंग्लंडच्या दोन शहरांत इस्लामी कट्टरपंथीयांनी हिंदूंविरोधात हल्ले केले, पण त्यावेळी तिथले पोलीस प्रशासन मुकदर्शकच राहिले. त्याच्या ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांतून सर्वत्र वेगाने पसरत असून पोलिसांच्या निष्क्रियतेचा निषेध केला जात आहे. लिसेस्टरमध्ये धर्मांध जिहाद्यांनी भगवा ध्वज उखडून फेकला तरी त्यावेळी पोलीस शांतच होते आणि स्मेथविकमधील मंदिराबाहेर इस्लामी कट्टरपंथीयांचा जमाव चालून आला तरी पोलीस शांतच होते. धर्मांध जिहाद्यांनी यथेच्छ धुडगूस घालावा, दहशत माजवावी, हिंदूंविरोधात हिंसाचार करावा, यासाठी पोलिसांनीच परवानगी दिल्यासारखी परिस्थिती होती.
 
 
अर्थात, पोलीस तरी काय करतील, ते सरकारी आदेशाचीच वाट पाहणार आणि इंग्लंडमध्ये गेल्या काही वर्षांपासून मुस्लीम तुष्टीकरण वाढल्याने त्यांनी काहीही केले तरी त्याविरोधात सरकारकडून तत्काळ कारवाई केली जात नाही. इंग्लंडमध्ये सध्याच्या घडीला ख्रिश्चनांची संख्या 64 टक्के असून, मुस्लीम पाच टक्के व हिंदू 1.4 टक्के आहेत. तथापि, 2050 पर्यंत ख्रिश्चनांची संख्या 45 टक्क्यांपर्यंत खाली घसरुन मुस्लिमांची संख्या 11 टक्क्यांपर्यंत वाढण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत, तर लिसेस्टर शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख, 30 हजार असून त्यात हिंदू 51 हजार, मुस्लीम 61 हजार आणि शीख 15 हजार आहेत. वरील आकडेवारीवरुन इंग्लंडमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा अधिक असून ती येत्या काळात दुपटीने वाढू शकते.
 
 
भारतात काँग्रेसने स्वातंत्र्यापासूनच दाढीकुरवाळू राजकारण केले, एकगठ्ठा मुस्लीम मतपेटी जपण्यासाठी हिंदूंना लाथाडले. तोच प्रकार आता इंग्लंडमध्येही सुरू आहे. मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे, म्हणजेच मुस्लीम मतदारांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळेच तिथे मुस्लिमांविरोधात ठाम भूमिका घेण्यापासून राजकीय पक्ष कचरत आहेत. इतकेच नव्हे, तर मुस्लीम वा इस्लामविषयी निराळे मत ठेवणार्‍यांना ‘इस्लामोफोबिक’ ठरवण्यातही तिथले राजकारणी आघाडीवर आहेत. त्याचा परिणामही मुस्लिमांनी हिंसाचार केला तरी त्यांच्यावर लगोलग कठोर कारवाई न करण्यावर झाला.
 
 
आपल्यावर कारवाई होणार नसल्याची खात्री मुस्लिमांनाही झालेली असल्याने तेदेखील इंग्लंडमध्ये बिनधास्त आहेत. आपण काहीही केले तरी आपल्यासाठी इंग्लंडच्या राजकारण्यांबरोबर माध्यमे, बुद्धिजीवी बोलू लागतील, याची त्यांना माहिती आहे. त्यातूनच त्यांच्यात कुठल्याही थरापर्यंत जाण्याची मानसिकता वाढत आहे. पण, यामुळे 75 वर्षांपूर्वी ज्या देशाने हिंदू-मुस्लीम म्हणत भारताची फाळणी केली, तोच देश रणभूमी म्हणून समोर येत आहे. या सगळ्यात इंग्लंडच्या नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस आपल्या पूर्वसुरींप्रमाणे इस्लामी कट्टरपंथीयांसमोर कुर्निसात करण्यातच धन्यता मानत आहेत.
 
 
एरवी इंग्लंड वा अमेरिकेसारखे देश भारताला धार्मिक स्वातंत्र्याची अक्कल शिकवत असतात. पण, आज त्याच इंग्लंडमध्ये हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याला पायदळी तुडवले जात असूनही लिझ ट्रस यांना त्याबाबत म्हणणे मांडावेसे वाटत नाही वा धर्मांध जिहाद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश द्यावेसे वाटत नाही. भारतातील तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी टोळकेदेखील या प्रकरणावर चिडीचूपच आहे. कारण, वर उल्लेखलेली विशेषणे लावणारे सारेच मुस्लिमांसमोर लाचार आहेत. यामुळेच युरोपातील अनेक देशांत राष्ट्रवादी विचारांची सरकारे सत्तेवर येत असून मुस्लिमांना कडाडून विरोध केला जात आहे. इंग्लंडमध्ये अजून तशी परिस्थिती नाही, सर्वच राजकीय पक्ष मुस्लीम लांगूलचालनात व्यस्त आहेत, पण म्हणून तिथेही मुस्लीम नको म्हणणारे नेतृत्व उभे राहणारच नाही असे नव्हे. पण, तसे नेतृत्व उभे राहिले नाही तर मात्र इंग्लंड इस्लामिक रिपब्लिक झाल्याशिवाय राहणार नाही.
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.