जगदीप धनखड देशाचे चौदावे उपराष्ट्रपती

06 Aug 2022 20:49:03
 

नवी दिल्ली ,विशेष प्रतिनिधी : देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार जगदीप धनखड हे ५२८ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. अल्वा यांना केवळ १८२ मतांवर समाधान मानावे लागले आहे.


 


 


उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी लोकसभा व राज्यसभेचे निवडून आलेले आणि नामनिर्देशित असे ७८० खासदार मतदार होते. यामध्ये एकुण ७२५ खासदारांनी मतदन केले. त्यापैकी ७१० मते वैध तर १५ मते अवैध ठरली. विजयासाठी आवश्यक मतांचा आकडा हा ३५६ एवढा होता.


 


 


त्यापैकी भाजपप्रणित रालोआचे उमेदवार जगदीप धनखड ५२८ मते मिळवून विजयी झाले. त्याचवेळी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना केवळ १८२ मते मिळाली. त्यामुळे जगदीप धनखड हे देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.


 


 


उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत असून नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी संसद भवनामध्ये शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहिर करण्यात आला. लोकसभेचे महासचिव उत्तमकुमार सिंह यांनी निकालाची माहिती दिली.


 


 


‘किसानपुत्र’ जगदीप धनखड


 


राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील एका दुर्गम खेड्यातील शेतकरी कुटुंबात जगदीप धनखड यांचा जन्म झाला. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून सार्वजनिक व व्यावसायिक जीवनात यश प्राप्त केले आहे. जगदीप धनखड यांनी चित्तौडगढ येथील सैनिक शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्रात पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केले.


 


 


त्यानंतर त्यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आपले वकीली कौशल्य सिद्ध केले आहे. राजस्थानमधील झुंझुनू येथून १९८९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते पहिल्यांदा निवडून आले आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनास प्रारंभ झाला. त्यांनी १९९० साली संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणूनही काम केले. त्यानंतर १९९३ साली ते अजमेर जिल्ह्यातील किशनगड मतदारसंघातून राजस्थान विधानसभेवर निवडून आले. त्यांची नियुक्ती जुलै २०१९ मध्ये प. बंगालच्या राज्यपालपदी करण्यात आली होती.


 


अभ्यासू आणि शिस्तप्रिय


 


कायद्याचा सखोल अभ्यास आणि परंपरांचा दीर्घ अनुभव यामुळे जगदीप धनखड यांची प्रतिमा अतिशय अभ्यासू आणि शिस्तप्रिय अशी झाली आहे. प. बंगालचे राज्यपालपदावरून त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना वेळोवेळी संसदीय परंपराअभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची जाणीव करून दिली आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हिंसाचाराविषयीदेखील धनखड यांनी बॅनर्जी यांच्यावर ताशेरे ओढले होते. , लोकशाही,


 


 


त्यामुळे बॅनर्जी यांचे त्यांच्याशी अनेकदा खटकेही उडालेमात्र तरीदेखील धनखड यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था असावी, ; हा आग्रह त्यांनी कायम ठेवला होता. मावळते उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आपल्या कार्यकाळात राज्यसभेमध्ये शिस्त निर्माण केली होती. त्याचप्रमाणे गोंधळी विरोधी पक्षांनाही योग्य शब्दात जाणीव करून दिली होती. त्यामुळे त्यांच्यानंतरही तीच भूमिका कायम ठेवण्याची जबाबदारी धनखड यांच्यावर असणार आहे.


 


 

Powered By Sangraha 9.0