आता यांना तिरंगाही नको!

    05-Aug-2022
Total Views |

kng
 
 
काँग्रेसी जयराम रमेश असो वा अमोल मिटकरी, त्यांना घराणेशाहीसमोर झुकण्याव्यतिरिक्त इतर कशाचेही महत्त्व वाटत नाही. मोदीविरोधाच्या नादाने घराण्याच्या म्होरक्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडावी, अशी त्यांची इच्छा असते. त्यातूनच त्यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाला विरोध केला. पण, तिरंगा फक्त मोदींचा वा भाजपचा नाही, इतकीही अक्कल त्यांना राहिली नसल्याचेच यातून स्पष्ट होते.
 
 
ब्रिटिशांच्या दडपशाहीविरोधात क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी वर्षानुवर्षे लढा दिला आणि दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. यंदा भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असून, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी भाजपशासित केंद्र सरकार कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. याच अनुषंगाने भाजपने संपूर्ण देशभरात ‘हर घर तिरंगा’ किंवा ‘घरोघरी तिरंगा अभियान’ सुरू केले, जेणेकरुन समस्त भारतीय स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष मोठ्या उत्साहाने साजरे करू शकतील. पण, देशातील सर्वात वयोवृद्ध पक्ष आणि ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे आम्हीच एकमेव’चा निराधार दावा करणार्‍या काँग्रेसला ‘हर घर तिरंगा’अभियानाचाही त्रास होऊ लागला.
 
 
भारताला स्वातंत्र्य आमच्यामुळेच मिळाल्याचे सांगण्यासाठी आणि आपला राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी काँग्रेसने ‘हर घर तिरंगा’ अभियानादरम्यान नेहरु-गांधी कुटुंबाचे महिमामंडन सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात सर्व देशवासीयांनी आपल्या घराच्या छतावर राष्ट्रध्वज फडकावण्याचे आवाहन करतानाच कू, फेसबुक, व्हाट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमी खात्यांचा ‘डिपी’ म्हणूनही तिरंगा ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला सर्वसामान्य जनतेसह विविध क्षेत्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींनीही उत्तम प्रतिसाद दिला. पण, ते न पाहवलेल्या काँग्रेसने राष्ट्रध्वजाऐवजी हातात तिरंगा घेतलेल्या जवाहरलाल नेहरु यांचे छायाचित्र ‘डिपी’ म्हणून लावायला सुरुवात केली. कारण, काँग्रेससाठी राष्ट्रध्वज महत्त्वाचा नाही, तर नेहरु-गांधी कुटुंब महत्त्वाचे आहे.
 
 
भारताचे अस्तित्व केवळ नेहरु-गांधी कुटुंबामुळेच असून ते नसते, तर भारताचे अस्तित्वच राहिले नसते, असे काँग्रेसींना वाटते. म्हणूनच तिरंगा राष्ट्रध्वजाऐवजी, हातात तिरंगा घेतलेल्या जवाहरलाल नेहरुंना दाखवण्याचे उद्योग त्यांनी सुरू केले. पण, याच काँग्रेसींनी भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगली व्यंकय्या आपल्या अखेरच्या काळात एका झोपडीत, दारिद्य्रात खितपत पडत, लाचारीचे जिणे जगत असताना त्यांची मदत करण्याचेही कष्ट घेतले नाहीत. आजही काँग्रेसींना तिरंग्याशी काहीही घेणेदेणे नाही, त्यांना फक्त नेहरु-गांधी घराण्याचा उदो उदो होण्याशी मतलब आहे. म्हणूनच त्यांनी राष्ट्रध्वजापेक्षाही आपल्या माजी नेत्याचे छायाचित्र फडकावले.
 
 
नरेंद्र मोदींनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा करताच, काँग्रेसींनी आणखी एक आक्षेप घेतला, तो म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्याच्या ५२ वर्षांपर्यंत राष्ट्रध्वज फडकावला नाही. जयराम रमेश यांनी त्याची सुरुवात केली आणि राहुल गांधींनी आणखी पुढची मजल मारली. ‘इतिहास साक्षी आहे की, ‘हर घर तिरंगा’ अभियान चालवणारे ‘त्या’ देशद्रोही संघटनेचे अपत्य आहेत, ज्यांनी ५२ वर्षांपर्यंत तिरंगा फडकावला नाही,’ असे राहुल गांधी ट्विटरवर म्हणाले. पण, रा. स्व. संघावर तिरंगा न फडकावल्याचा आरोप करणार्‍या जयराम रमेश वा राहुल गांधींना ध्वजसंहिता ठावूक नाही का? राहुल गांधी राजकारणात बालबुद्धी म्हणून ओळखले जातात. पण, जयराम रमेश तर वर्षानुवर्षांपासून राजकारणात आहेत, त्यांनाही ध्वजसंहिता माहिती नाही का?
 
 
सुधारणा होण्याआधीच्या ध्वजसंहितेनुसार १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीव्यतिरिक्त अपवाद वगळता अन्य कुठेही राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी नव्हती, त्यावर निर्बंध होते. ते निर्बंध हटवण्यासाठी भाजप नेते अटलबिहारी वाजपेयींना पंतप्रधानपदी यावे लागले, त्यांनीच २००२ साली ध्वजसंहितेत विशेष दुरुस्ती केली आणि राष्ट्रध्वज फडकावण्यासाठीच्या जाचक अटी, नियम रद्द केले. त्याआधीच्या ध्वजसंहितेनुसार मंजुरी नसलेल्या ठिकाणी वा मंजुरी नसलेल्या प्रकारे राष्ट्रध्वज फडकावल्यास तो राष्ट्रध्वजाचा अवमान मानले जात होते.
 
 
राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये या उदात्त हेतूनेच इच्छा असूनही अनेकांना तिरंगा फडकावता येत नव्हता. यासाठी खरे तर नेहरु-गांधी घराण्यालाच गुन्हेगार ठरवले पाहिजे. कारण, १९५० वा १९७१च्या ध्वजसंहितेची निर्मिती काँग्रेसी सरकारांनीच केली होती. त्या माध्यमातून सर्व देशवासीयांना राष्ट्रध्वज फडकावण्यापासून नेहरु-गांधी कुटुंबानेच दूर लोटले होते. त्यातून नेहरु-गांधी कुटुंबाला राष्ट्रध्वज सर्व जनतेचा नव्हे, तर फक्त आपलाच आहे, असे सांगत राष्ट्रध्वजावरही आपलाच हक्क, अधिकार गाजवायचा होता. पण, जयराम रमेश व राहुल गांधींना हा इतिहास माहिती नसावा, म्हणून ते संघावर टीका करत आहेत. त्यातून आता त्यांना स्वतःलादेखील तिरंगा नको असून त्याच्या माध्यमातून फक्त मोदी, भाजप व रा. स्व. संघावर टीका करण्यात आणि नेहरु-गांधी कुटुंबाला झळकावण्यातच रस असल्याचे स्पष्ट होते.
 
 
‘हर घर तिरंगा’ अभियानावर आक्षेप घेणार्‍यांत काँग्रेसच्या अंगणात जन्मलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाला चक्क ‘फालतू’ म्हटले. त्यांची एक ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांत वेगाने ‘व्हायरल’ होत असून, ‘हर घर तिरंगा’ अभियानाला त्यांनी किती घाणेरड्या पद्धतीने विरोध केला, हे दिसून येते.
 
 
काँग्रेसी जयराम रमेश असो वा अमोल मिटकरी, त्यांना घराणेशाहीसमोर झुकण्याव्यतिरिक्त इतर कशाचेही महत्त्व वाटत नाही. मोदीविरोधाच्या नादाने घराण्याच्या म्होरक्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडावी, अशी त्यांची इच्छा असते. त्यातूनच त्यांनी ‘हर घर तिरंगा’अभियानाला विरोध केला. पण, तिरंगा फक्त मोदींचा वा भाजपचा नाही, इतकीही अक्कल त्यांना राहिली नसल्याचेच यातून स्पष्ट होते.
 
 
दरम्यान, राहुल गांधींनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाला विरोध करताना आपल्या ट्विटमध्ये अप्रत्यक्षपणे रा. स्व. संघाला देशद्रोही संघटनाही म्हटले. पण, नेहरु-गांधी खानदान सोडा, केवळ राहुल गांधी तरी कितपत देशप्रेमी, देशभक्त आहेत? राहुल गांधींच्या देशद्रोही उद्योगांची यादी इतकी मोठी आहे की, ती सर्वच्या सर्व इथे सांगता येणार नाहीत. पण, त्यातली काही उदाहरणे दिली तरी त्यातून राहुल गांधी कसे देशद्रोही, पाकिस्तान व चीनप्रेमी आहेत, हे स्पष्ट होते. जम्मू-काश्मीरला लागू असलेले ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर तिथे लोक मरत आहेत, असे विधान राहुल गांधींनी केले होते.
 
 
त्याच विधानाचा हत्यारासारखा वापर करत पाकिस्तानने दि. २७ ऑगस्ट, २०१९ रोजी संयुक्त राष्ट्रात सादर केलेल्या पत्रातून भारत जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन व हिंसाचार करत असल्याचा आरोप केला. संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्दा उपस्थित करणार्‍या व भारतावर काश्मिरात मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करणार्‍या तुर्कीमध्ये नुकतेच आपले कार्यालय थाटले आहे. ते कशासाठी? जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवादी हल्ला घडवणार्‍या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा उल्लेख राहुल गांधींनी ‘मसूद अजहरजी’ असा आदरार्थी केलेला आहे.
 
 
ओडिशातील कारोपूटमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर आक्रमण केल्याचे व आपले लोक हुतात्मा झाल्याचे म्हटले होते, हा देशद्रोह नव्हे तर काय? त्यातून त्यांना भारतच हल्लेखोर असल्याचे जगाला सांगायचे होते. ‘सर्जिकल स्टाईक’वेळी राहुल गांधींनी त्याला ‘खून की दलाली’ म्हटले होते. डोकलाममधील तणावावेळीही राहुल गांधींनी भारतीय सैन्य वा पंतप्रधानांवर विश्वास ठेवण्याऐवजी लपून छपून चिनी राजदूत लिओ झाओहुई यांची भेट घेतली होती. याव्यतिरिक्त तुकडे तुकडे गँगचे समर्थन करण्यासाठीही राहुल गांधी ‘जेएनयु’मध्ये पोहोचले होते.
 
 
राहुल गांधी असे तर त्यांचे काँग्रेसी गुलामही त्यांच्यासारखेच. दिग्विजय सिंह, रणदीप सुरजेवाला, मणीशंकर अय्यर, शशी थरुर, पी. चिदंबरम यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली, ज्यातून भारताच्या भूमिकेवर सवाल तर दहशतवाद्यांसह पाकिस्तान आणि चीनच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे दिसते. काँग्रेसशी संबंधित असा सगळा देशद्रोही, देशविघातक घटनाक्रम असताना राहुल गांधी रा. स्व. संघाला देशद्रोही म्हणतात, हेच हास्यास्पद. त्यांनी आधी आरसा पाहावा, देशद्रोही म्हणजे काय हे त्यांना त्यातूनच कळे!
 
 
  
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.