नागपूर : लातूरच्या एम्स (AIMS) परिवाराच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशात एकता, समता व बंधुभाव नांदावा आणि सामाजिक समरसता वृद्धिंगत व्हावी या उदात्त उद्देशाने दीक्षाभूमी नागपूर ते ज्ञान भूमी बौद्ध गया (नागपूर-सारनाथ -बौद्ध गया) या पवित्र तीर्थक्षेत्रला भेट देऊन या ठिकाणी तिरंगा यात्रेचे आयोजन केले गेले. या तीनही ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांचे जिवन-विचार विषयी प्रबोधनात्मक व्याख्याने झाली. दि. ३० जुलै ते ०३ ऑगस्ट २०२२ या दरम्यान निघालेल्या या पाच दिवसांच्या तिरंगा यात्रेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून १६० सामजिक कार्यकर्ते व व्यक्तींनी सहभाग घेतला.
दिनांक २९ जुलै रोजी एम्स परिवार लातूरच्या कार्यालय येथे स्वागताध्यक्ष आमदार अभिमन्यू पवार, संस्थेचे मार्गदर्शक तथा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथजी मगे यांनी पूजन करून शुभेच्छा दिल्या व एम्स परिवाराची टीमने नागपूरच्या दिशेने प्रवास सुरु केला. दिनांक ३० जुलै रोजी डॉ. हेडगेवार स्मारक समिती, नागपूर येथे सकाळी ११ वा. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून १६० कार्यकर्ते एकत्र आले. रेशीमबाग येथे सामाजिक कार्यकर्ते निलेशजी गद्रे यांच्या उपस्थितीत उदघाट्न कार्यक्रम पार पडला. सोबतच महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांवर व्याख्यान झाले. याप्रसंगी निलेशजी गद्रे, संस्थेचे अध्यक्ष गुरुप्रसाद हुंडेकर आणि कार्यक्रम प्रमुख अशोक रायते यांचे मार्गदर्शन झाले व तिरंगा रॅलीची सुरुवात झाली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने पवित्र दिक्षा भूमीपर्यंत रॅली गेली आणि संपूर्ण परिसर भारत माता की जय, महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय या घोषणांनी भारावून गेला. नंतरचा प्रवास सारनाथच्या दिशेने सुरु झाला.
दिनांक ०१ ऑगस्ट रोजी सकाळी यात्रा सारनाथला पोहचली व जिथे तथागतांनी आपले पहिले मार्गदर्शन त्यांच्या शिष्यांना केले. अशा पावन सारनाथ परिसर दर्शन झाले. दुपारी भंते प्रो. मेश्चंद्र नेगीजी यांचे "बुद्ध दर्शन" या विषयावर अमूल्य मार्गदर्शन झाले. भगवान बुद्ध यांचे जीवन आणि त्यांनी दिलेला मार्ग यावर प्रबोधनपर मार्गदर्शन पु.भंतेजी यांनी केले त्यानंतर चौखंडी स्तुपापर्यंत भंतेजी यांच्या प्रमुख उपस्तितीमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात सारनाथमध्ये निघालेली ही पहिलीच तिरंगा रॅली असल्याचे भंतेजी यांनी सांगितले. चौखंडी स्तूप येथे बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
दिनांक ०२ ऑगस्ट रोजी सारनाथ ते तिब्बेती विद्यापीठ अशी तिरंगा रॅली काढण्यात आली ज्यात स्थानिक लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला. रा. स्व.संघाचे अखिल भारतीय सदस्य माननीय इंद्रेश कुमारजी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निघालेल्या या तिरंगा रॅलीने परत एकदा भारत माता की जय च्या नादात परिसर आणि आसमंत दणाणून निघाला.
या यात्रेत एम्स परिवाराच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार वितरण सोहळाही संपन्न झाला. तिब्बेती विद्यापीठात रा.स्व.संघाचे इंद्रेश कुमार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.गेशे समतेनजी, उत्तर पूर्व क्षेत्राचे कार्यवाह डॉ.वीरेंद्र जायसवालजी, भंते दीपांकरजी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये माजी आमदार बब्रूवान खंदाडे साहेब यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर एम्स आयडल - २०२२ शैक्षणिक क्षेत्र - डॉ. जग्गनाथ पाटील, साहित्य - रवी शंकर, पत्रकारिता - संजय जेवरीकर, आरोग्यदूत - नामदेव कदम यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. सोबतच माननीय इंद्रेश कुमार, डॉ. समतेन आणि डॉ. जायसवाल यांचे भगवान बुद्ध आणि समाज यावर मार्गदर्शन झाले. रात्री बौद्ध गयेच्या दिशेने प्रवास सुरु झाला.
दिनांक ०३ ऑगस्ट रोजी तथागत भगवान बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झालेल्या पावन भूमीत तिरंगा रॅली काढण्यात आली डॉ. रमेश पांडवजी, भंते राहुलजी, ऍड. अमरिंदर सिंगजी आणि महाबोधी सोसायटी, बौद्ध गयाचे पदाधिकारी यांच्या समवेत मंदिराची तिरंगा यात्रेने परिक्रमा केली, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षातील बौद्ध गया येथील ही पहिलीच तिरंगा रॅली ठरली. सायंकाळी समारोप कार्यक्रम झाला या प्रसंगी भंते राहुल, ऍड. अमरिंदर आणि डॉ. रमेश पाण्डव यांचे मार्गदर्शन झाले. तर डॉ. राजीव डोंगरे यांनी आभार प्रदर्शन केले. यात्रेत प्रत्येक सहभागी व्यक्तींना भगवान बुद्धांची मूर्ती भेट देऊन रात्री जड पाऊलानी परतीचा प्रवास सुरु झाला.
या अधभूत कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी श्री.अशोक रायते, ब्रिजेश श्रीवास्तव, श्रीकांत रांजणकर, राहुल कुलकर्णी, संस्थेचे सचिव विवेक हुंडेकर, उपाध्यक्ष सुनील फुलारी, अक्षर जेवरीकर शिवम देवशवार, पांडुरंग बोलकर, तुषार वासरकर, राम गाडेकर, जग्गनाथ गवळी यांच्या सह अनेकांचे सहकार्य लाभले.