मुंबई : उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा त्याआधी झालेल्या भडकाऊ भाषणांमुळेच झाला असा घणाघाती आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. मंगळवारी आदित्य ठाकरेंच्या पुण्यातील सभेत भाषण झाल्यानंतर माजी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर १५ ते २० जणांच्या जमावाने हल्ला, त्यात त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली होती.
अशा प्रकारच्या भडकाऊ भाषणांचा उद्देश हा फक्त लोकांची सहानुभूती मिळवणे एवढाच आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि प्रत्येक नेत्याने भाषण करताना राज्यातील सामाजिक शांतता बिघडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असा खोचक सल्लाही दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना दिला.
शिवसैनिकांच्या मनात आमच्याबद्दल जो जाणूनबुजून गैरसमज पसरवला जातोय, खोटे आरोप केले जात आहेत, याबद्दल मी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना उत्तर देणार आहे आणि त्याचवेळी सर्व गैरसमज दूर करणार आहे असेही केसरकरांनी सांगितले आहे. येत्या रविवार पर्यंत राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्याबाबतची नक्की तारीख मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच सांगतील असेही जाहीर केले.