मुंबई: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जे इतिहास संशोधन केले त्यात मी म्हणतो तेच खरे असा आग्रह धरला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चरित्र लिहीले गेले नाही,अशीच खंत ते वारंवार व्यक्त करीत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जो सहवास लाभला त्यातून एवढेच म्हणावेसे वाटते "देव माणूस देवाघरी गेला" असे प्रतिसादन तरुण इतिहास संशोधक डाँ. केदार फाळके यांनी आज येथे केले.
स्वरगंधार, जयसत्य चँरिटेबल ट्रस्ट, जीवनगाणी आणि भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्या पुढाकाराने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर येणाऱ्या पहिल्या जयंती निमित्ताने आज दादर येथे "शिवकल्याण राजा" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गींताचा संस्मरणीय अविष्कार सादर करण्यात आला. गायक नंदेश उमप याच्या पहाडी आवाजाने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकारांने दादरचे स्वा. वि. दा. सावरकर सभागृह दुमदुमून गेले.
तरुण इतिहास संशोधक डाँ. केदार फाळके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पत्रांचे दाखले देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन व महान कार्याचा वेध आपल्या व्याख्यानात घेतला. तर त्याचवेळी इतिहास संशोधन करीत असताना बाबासाहेब पुरंदरे यांचा लाभलेला सहवास आणि त्यातील आठवणींना उजाळा दिला. इतिहास संशोधक म्हणून आमच्या दोघांमध्ये काही मतभेद होते ते कायम राहिले तरी पुरंदरे यांनी जे लेखन, संशोधन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रती केलेले काम प्रचंड होते , असे त्यांनी नमूद केले.
यावेळी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी गतवर्षी बाबासाहेब यांच्या ९९व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांच्या स्मृतींना उजाळा देत शिवशाहीरांच्या कार्याचा आढावा घेतला. इतिहास संशोधक, लेखक, शिवशाहीर, नाटककार, संगीतकार, संवादलेखक आणि तत्वज्ञ असे बहुआयामी व्यक्तीमत्व असणारे बाबासाहेब हे अत्यंत नम्र होते. त्यांनी तरुणांना दुर्ग भ्रमंतीचे वेड लावले. जो जो शिवछत्रपतींचा जयजयकार करेल त्यांचा सत्कार भाजप करेल. हीच आमची भूमिका आहे. बाबासाहेब कसे कुणाला वाटले हा त्यांचा त्याचा भाग आहे. मी मांडेन तेच सत्य असा प्रघात बाबासाहेबांच्या बाबतीत वाढत चाललाय.
मी मांडेन तेच सत्य असा अट्टाहास बाबासाहेबांनी कधीच केला नाही, असा टोला ही त्यांनी लगावला.