मुंबई : उद्धव ठाकरेंच्या विरोधात उठाव झाल्यानंतर उरलेले शिवसैनिक तरी आपल्यासोबत टिकावेत यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून घेण्यास सुरुवात केली होती. पण हे शपथपत्र सर्वसामान्य शिवसैनिकांच्या खिशाला परवडत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी मतदारसंघातूनच आता पर्यंत फक्त ३२०० शपथपत्र गोळा झाली आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा नक्की काय उपयोग होतोय? खासदार, नगरसेवकांची फौज पाठीशी असतानाही ही परिस्थिती उद्धव ठाकरेंवर का ओढवली? हा प्रश्न समोर येतोय.
उद्धव ठाकरेंनी काढलेल्या फर्मानानुसार शिवसैनिकांनी हा शपथपत्राचा मसुदा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर छापून घेऊन नोटरी करून द्यायचा आहे, त्यावर अजून ५० रुपये भरून नोटरीही करून घ्यायचा आहे त्यामुळे या एका शपथपत्रासाठी प्रत्येकी १५० रुपयांचा खर्च येतो आहे. त्यामुळे हे शपथपत्र देण्यासाठी पिसे खर्च करा तसेच, नोटरी वगैरे करून घेण्यासाठी वेळ खर्च करा अशी दुहेरी कसरत शिवसैनिकांना करावी लागत आहे, त्यामुळे ही कसरत करणे शिवसैनिकांना परवडेनासे झाले आहे.
तरीही ही शपथपत्रे सादर होण्याचा वेग वाढावा यासाठी शिवसेना भवनातून १२ लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाखा, शाखांमध्ये फिरून, लोकांकडून ही शपथपत्रे भरून घेण्यासाठी या लोकांना फिरावे लागत आहे. त्यामुळे या न परवडणाऱ्या शपथपत्रांचा काय उपयोग होणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय.