पाश्चात्य देश म्हंटले की, मस्त थंडी, बर्फ असे समीकरण. तसेच पाश्चात्य देशात म्हणजे अमेरिका-युरोप खंडाला निसर्गाने भरभरून दिले आणि तिथल्या लोकांनीही भौतिक विकास भरपूर केला. त्यामुळे पाणी, वीज मुबलक, त्या अनुषंगाने कसली ददातच नाही, असेही कित्येकांना वाटत असते. पण, हे असणे वाटणे म्हणजे कवीकल्पना म्हणू शकतो. कोरोनाची महामारी थोडी कमी होत असतानाच आता या दोन्ही खंडांवर निसर्गाची अवकृपा सुरू आहे. पूर, वादळ भूकंपासोबतच अवर्षण अर्थात दुष्काळाची गंभीर समस्या या खंडांना उद्ध्वस्त करत आहे.
अमेरिका आणि युरोप खंडाच्या मोठमोठ्या नद्या आटत चालल्या आहेत. फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर डूब नदी आटली आहे. इटलीची पो नदी, ब्रिटनची थेम्स नदी आणि अमेरिकेची कोलोरॅडो नदी ही अशीच आटली. नद्यांचा पाण्याचा स्तर अत्यंत निम्नस्तरावर गेला. या नद्यांच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, शेती उद्योगधंद्यांसाठी होत होता. पण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या नद्यांमधून अवजड वस्तूंचीही वाहतूक होत होती.
जलवाहतूक या नद्यांमधून होत होती. मात्र, सध्या या नद्यांमधील जलवाहतूक थांबल्यातच जमा आहे. कारण, नद्यांमध्येच पाणीच नाही. जिथे कुठे पाणी आहे तिथपर्यंत बोटींना नेण्यासाठी दुसरी व्यवस्था करावी लागते. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. जलवाहतुकीने मालाची ने-आण करणार्या व्यवसायांवर इथे गदाच कोसळली आहे. परिणामी, या वस्तूंची टंचाई जाणवू लागली आहे. वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
या सगळ्याचा परिणाम या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. मेक्सिकोच्यासीमेजवळ टेक्सास भागात जवळजवळ 45 टक्के भाग दुष्काळग्रस्त आहे. राज्यात १५ दशलक्ष लाख दुष्काळाचा सामना करत आहेत. हे कमी की काय म्हणून युरोपमध्ये तापमान वाढीचा कहर झाला. 40 डिग्रीच्या पुढे तापमान गेले. त्यामुळे इथले जनजीवन विस्कळीत झाले. कारण, इथल्या लोकांना उष्णतेचा फारसा अनुभवच नव्हता. त्वचेला ऊन मिळावे किंवा उन्हाळी तापमान कसे असते, हे पाहण्यासाठी युरोपीय खास उष्णकटिबद्धीय देशांच्या सहली करत असत. थंडीचा कडाका घालवण्यासाठी इथे हिटर आणि तत्सम गोष्टी.
वातानुकूलित यंत्रणा किंवा उष्णतेला प्रतिरोध करील, अशी व्यवस्था इथल्या सामान्य लोकांच्या घरात नाहीत. त्यामुळे उष्णता वाढली आणि उष्णतेच्या मार्याने इथे शेकडो लोक मृत्युमुखी पडले. उष्णतेची भीती धसका इतका की, इथल्या रेल्वे रूळांनाही पांढर्या रंगाने रंगवण्यात आले. का तर उष्णतेमुळे रेल्वेचे रूळ वितळू नयेत म्हणून.
गेल्या महिन्यात युरोपीय प्रशासनाने एक निष्कर्ष काढला की, अचानक ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूत वाढ झाली. कारण काय? तर तापमानाची झळ असह्य होऊन कित्येक जण सहलीला गेले. ज्यांना वृद्धापकाळामुळे शक्य झाले नाही ते घरीच राहिले. मात्र, उष्णतेेने ते आजारी पडले. अशावेळी एका फोनने येणारे डॉक्टर्सही उपलब्ध झाले नाहीत. कारण, आरोग्यसेवेत रूजू असलेले आरोग्य कर्मचाारीही उष्णतेमुळे सुट्टीवर गेलेले किंवा नोकरीवर असले तरी उन्हाचा झटका लागू नये म्हणून इस्पितळाच्या बाहेर पडण्यास अनुत्सूक होते.
याचाच अर्थ भव्य रुग्णालयात आणि अद्ययावत आरोग्य सेवा असूनही या ज्येेष्ठ नागरिकांना त्याचा काही उपयोग झाला नाही. अमेरिकेची परिस्थितीही काही वेगळी नाही. ‘फर्स्ट स्ट्रीट फाऊंडेशन’ या संस्थेने एक अहवाल, जाहीर केला. त्यानुसार २०५३ साली अमेरिकेमध्ये तापमान १०३ फॅरेनाईटपर्यंत जाणार आहे. त्यामुळे १०७ दशलक्ष लोकांवर दुष्परिणाम होणार आहे. अहवालानुसार, उत्तर टेक्सास, लुइसियाना ते इलिनोइस, इंडियाना आणि विस्कॉन्सिनपर्यंतच्या भौगोलिक क्षेत्रांवर या उष्णतेचा परिणाम होणार आहे.
मियामी-डेड काउंटी, फ्लोरिडा यांनाही झळ बसणार आहे. कल्पना करा, जिथे १० ते ११ डिग्री तापमानही जास्तच वाटते, तिथे तापमान ४० ते ५० डिग्री झाले, तर लोक कसे सहन करतील? लोक तर लोक, इथली वनसंपदाही या उष्णतेच्या मार्याने कोलमडणार आहे. कारण, युरोप आणि अमेरिका खंडातील वृक्ष आणि मानवाव्यतिरिक्त इतर जीवही उष्णतेशी जुळवून घेणारे नाहीत. या खंडातील वृक्षराजी थंड तापमानात तग धरणारी आहे. त्यामुळे वृक्ष आणि जंगलं होरपळली जाणार आहेत. युरोप आणि अमेरिकेच्या पर्यटनावरही या उष्णतेचा परिणाम होत आहे, तर अशी उष्णतेची लाट पाश्चिमात्य देशांसाठी शापच ठरत आहे.