मुंबई : ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे हा त्यांच्या घराण्याची गाण्याची परंपरा समर्थपणे पेलत आहे. बिग बॉस मराठीमध्ये देखील तो झळकला होता. त्याच्या दमदार खेळाने त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. उत्कर्ष फक्त गायकच नाही तर तो उत्तम डॉक्टर, लेखक, संगीत दिग्दर्शकही आहे. एक उत्तम व्यक्ती असून सामाजिक आस्था बाळगणारा उत्कर्ष अनेकदा सामाजिक कार्यात व्यग्र असतो.
उत्कर्षच्या आजच्या एका पोस्टमधून त्याचे विचार, त्याची सामाजिक बांधिलकी दिसून आली आहे. काल झालेल्या स्वातंत्र्यदिनी त्याच्या समोर एक तृतीयपंथी व्यक्ती आली, तिच्यासोबत फोटो घेत उत्कर्षने एक पोस्ट लिहिली आहे. जी पाहून आपलेही डोळे उघडतील.
तृतीयपंथींना बघून आजही अनेक लोक नाक मुरडतात. त्यांना ना आपल्या जीवनात स्थान आणि ना समाजात. शिवाय त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आजही गंभीर आहे. अनेकदा शिक्षण असूनही त्यांना नोकरी मिळत नाही. कित्येक तृतीयपंथी रोज आपल्याला रस्त्यावर, सिग्नलवर भिक्षा मागताना दिसतात. अशीच एक तृतीयपंथी व्यक्ती काल १५ ऑगस्ट रोजी गायक, गीतकार उत्कर्ष शिंदे याला एक सिग्नलवर भेटली. त्यावेळी उत्कर्षने एका पोस्ट मधून त्याला आलेला अनुभव सांगितला आहे. उत्कर्ष म्हणतो, 'आज तुला पाहिल आणि विचार बदलले .... “जो भरा नहीं है भावों से, जिसमें बहती रसधार नहीं । वह हृदय नहीं है पत्थर है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं।”
राष्ट्रप्रेम सर्वोच्च प्रेम म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तिला आपल्या जन्मभूमीवर निस्वार्थ प्रेम असावे. आज सिग्नलला माझी कार थांबली आणि समोर तू दिसलीस,तुला पाहून खरंच संकुचित विचारांच्या लोकांना तू आज चपखल उत्तर दिलंस.' पुढे उत्कर्ष म्हणत आहे की, 'कोण तू? कुठली तू? तू नर? की नारी? ह्या वरून तुझे परीक्षण आजपर्यंत भवतालच्या बऱ्याच लोकांनी केले असेल. पण तू त्याचं उत्तर "तू प्रथम भारतीय" आहेस हे तू आज तुझ्या पेहेराव्यातूनच नाही तर तुझ्या बोलण्यातून दाखवून दिलंस. कारची काच मी जेव्हा खाली घेतली आणि तू हसत किती सकारात्मकतेने "साहब भारत माता कि जय हो" म्हणालीस . आणि पैसे नहीं चाहिये आज. आज सिर्फ दुआ दूंगी म्हणत डोक्यावरून हाथ फिरवलास आणि प्रवास भर मी तुझ्यातल्या माणुसकीला, देशप्रेमाला मनोमन सलाम करत राहिलो. ७५व्या स्वातंत्र्य दिनी आज खरंच भासल बुरसटलेल्या, भेद भाव मानणाऱ्या,माणसाला माणसापासून दूर ठेवणाऱ्या विचारांपासून काहींना अजूनही स्वातंत्र्य मिळणे बाकी आहे.'
उत्कर्षच्या या पोस्टमुळे समजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे.