मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला मुसळधार पावसाने आधीच जनजीवन विस्कळीत होत असताना आता पुढचे दोन दिवस अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. हवामान खात्याकडून मुंबईसाठी रेड अलर्ट जाहीर झाला आहे. फक्त मुंबईच नव्हे तर ठाणे, नाशिक या जिल्ह्यांसाठीही रेड अलर्ट जाहीर झाला आहे. पाच हजार सीसीटीव्हींच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला भेट देऊन कुठल्याही परिस्थितीत मुंबईकरांची गैरसोय होणार नाही यासाठी काय काय केले पाहिजे याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पाणीभरून काही काळापुरती रेल्वे सेवा कोलमडून जाते. तेव्हा, बेस्ट प्रशासनाकडून जादा गाड्या सोडण्यात याव्यात तसेच त्यांना चहा, नाश्त्याचीही सोय पालिकेकडून करण्यात यावी, अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सर्वसामान्य जनता आणि पालिका प्रशासन या दोघांनींही एकत्र मिळून या संकटाचा सामना करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.