जालंधर : पंजाबी अभिनेता राणा जंग बहादूर यांनी भगवान वाल्मिकिंविषयी वादग्रस्त विधान केल्यामुळे जालंधर पोलिसांनी त्यांना अटक केले आहे. टीव्हीवरील एका कार्यक्रमात त्यांनी भगवान वाल्मिकिंविषयी चुकीचा शब्द वापरल्याने त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शिवाय न्यायालयाने देखील त्यांची जमीन याचिका फेटाळली आहे.
काही दिवसांपूर्वी या प्रकरणी वाल्मिकी समाजाच्या शिष्टामंडळाने अकाली दलाचे नेता चंदन ग्रेवाल यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्त गुरशरणसिंह संधू यांची भेट घेऊन राणा जंग बहादूर यांना अटक करण्याची मागणी केली होती. वाल्मिकी समाजाच्या संघटनांनी राणा जंग बहादूर १० जुलैपर्यंत अटक न झाल्यास ११ जुलैला जालंधर बंदचा इशारा दिला होता. त्यापूर्वीच त्यांनी बसस्थानकासह अनेक ठिकाणी निषेध करत राणा यांचा पुतळा जाळला होता.
हे प्रकरण होऊन खरेतर एक महिना झाला आहे. एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात अभिनेता राणा जंग बहादूर यांनी भगवान वाल्मिकींविषयी वक्तव्य केले होते. वाल्मिकी समाजाच्या संघटनांनी त्यांच्यावर अपशब्द वापरल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. निदर्शनानंतर जालंधर पोलिसांनी नई बारादरी ठाण्यात प्रथम एफआयआर केली होती. परंतु आता हे प्रकरण उग्र रूप धारण करत आहे.