मुंबई : खड्डे आणि मुंबई हे समीकरण अनेक वर्ष आपण ऐकत आलो आहोत. त्यामुळे पावसाळा आला की मुंबईच्या खड्ड्यांचा आणि पाणी तुंबण्याचा विषय आवर्जून येतो. दरवर्षी मुंबई महानगर पालिका यावर स्पष्टीकरण देते, काम सुरू असल्याचे सांगते व पुढे काहीच घडत नाही. यावरून राजकारण होते, जोरदार टीका होतात. यावर आता अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील मुंबईच्या रस्त्यांची दुरवस्था बोलून दाखवली आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी मुंबईची दुरावस्था पाहून आपला संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणतात, 'मुंबईच्या रस्त्यांची बिकट अवस्था पाहून एखादी गर्भवती महिला या रस्त्यांवरुन प्रवास कसा करत असावी याचा विचारही करवत नाही. मी तर मुंबईत प्रवास करताना अक्षरशः घाबरते. रस्त्यावर असणारी वाहतूक कोंडी आणि यादरम्यान निर्माण होणारी परिस्थिती तर त्यापेक्षाही वाईट आहे. दिल्ली-मथुरामध्ये देखील बरीच वाहतूक कोंडी व्हायची. पण आता तिथली परिस्थिती सुधारली आहे.' असे त्या म्हणाल्या.
याचबरोबर त्या पुढे म्हणतात, 'चित्रीकरणाच्या निमित्ताने आता मी मुंबईमध्ये प्रवास करत असते, पण आता हा प्रवास दिवसेन् दिवस कठीण होत चालला आहे. पूर्वी मुंबई कशी होती आणि आता काय झाली आहे.' त्यांच्या या विधानाची चर्चा सुरु आहे. त्या अभिनेत्री तर आहेतच पण त्या बरोबर त्यांचे राजकीय विश्वाशीही जवळचे नाते आहे. भारतीय जनता पक्षात असून त्या लोकसभेत खासदार देखील आहेत त्यामुळे समाजातील अनेक खटकणाऱ्या गोष्टींवर त्या प्रकाश टाकत असतात.