कोलकाता : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत, सत्ताधारी शिवसेनेतच उठाव घडून येत भाजप सत्तेवर आला. तसाच धमाका आता पश्चिम बंगालमध्येही होण्याची शक्यता आता आहे. भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेसचे ३८ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत जोरदार खळबळ उडवून दिली आहे. या ३८ आमदारांमधील २१ आमदार आमच्या थेट संपर्कात असल्याचा दावा मिथुन यांनी केला आहे.
"आमची सत्ताधारी तृणमूलशी सुरु असलेली लढाई सुरूच राहील,ती थांबणारच नाही. देशातील १८ राज्यांत सध्या भाजप सत्तेत आहे आणि लवकरच बाकीच्या राज्यांतही सत्तेवर येईल" असा दावाही मिथुन यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या शंतनू सेन यांनी हे सर्व मतदारांना भुलवण्याचे आणि मूर्ख बनवण्याचे प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ हेही राज्य जर भाजप कडे गेले तर विरोधकांच्या घडून येत असलेल्या कथित आघाडीचे कंबरडे मोडले जाण्याची शक्यता आहे.