मुंबई : "ओबीसींच्या राजकीय आरक्षणसंदर्भातील दिलेला शब्द आमच्या महायुती सरकारने पाळला, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला मान्यता दिली हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे" अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ओबीसी कल्याण, गरीब कल्याण, बहुजनांचे कल्याण हाच आमचा अजेंडा आहे आणि राहील, या संपूर्ण प्रक्रियेत ज्यांनी ज्यांनी आम्हांला मदत केली, सहकार्य केले त्यांचे मी आभार मानतो अशा शब्दांत फडणवीसांनी सर्वांचे आभारही मानले आहेत.
आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक दिलेला शब्द पाळणारच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
"सर्वोच्च न्यालयाकडून ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मंजूर झाले आहे, आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहोत एकदा दिलेला शब्द पाळणारच" अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
याला म्हणतात पायगुण : आ. नितेश राणे
"ओबीसींच्या राकीय आरक्षणासहित निवडणूक घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय" अशी प्रतिक्रिया देत आ. नितेश राणेंनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. हा फडणवीस - शिंदेंच्या सरकारचा पायगुण असे म्हणत नितेश राणेंनी महाविकास आघाडीवर टीका देखील केली आहे.
आता आमच्यामुळे ओबीसी आरक्षण मिळाले असे ढोल माविआ बडवेल : चंद्रकांत पाटील
"ओबीसींना सुप्रीम कोर्टातील कायदेशीर लढाईतून अखेर राजकीय आरक्षण परत मिळाले आहे, त्यासाठी माविआ सरकार जाऊन महायुती सरकार यावे लागले" अशी प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आनंद व्यक्त करताना माविआ सरकारने घातलेल्या घोळावर खोचक टीका सुद्धा केली आहे. हे आरक्षण जरी मिळाले नसते तरी आम्ही २७ टक्के जागांवर ओबीसी उमेदवारच उभे करणार होतो. आता आरक्षण आमच्यामुळे मिळाले असे ढोल माविआ बडवू लागेल अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायलायच्या निर्णयाने राजकीय भविष्यावरील टांगती तलवार दूर झाली : पंकजा मुंडे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसींची प्रतीक्षा आता संपली आहे, संपूर्ण ओबीसी समाज याची आतुरतेने वाट बघत होता, त्यांच्या राजकीय भविष्यावरील टांगती तलवार आता दूर झाली आहे याबद्दल सरकारचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे आभार.
माविआ सरकारच्या लढ्याला यश : जयंत पाटील
माविआ सरकरने ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, त्यांचे राजकीय महत्व टिकावे यासाठी खूप मेहनत घेतली होती, त्या मेहनतीला आज यश आले असा शब्दांत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले हे माविआ सरकरचे श्रेय अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली.
ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी उद्धव ठाकरे - अजित पवार सरकार जावे लागले : चंद्रशेखर बावनकुळे
ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळण्यासाठी राज्यातील उद्धव ठाकरे - अजित पवार सरकार जावे लागले अशा शब्दांत भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माविआ सरकारवर टीका करत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आनंद व्यक्त केला आहे.