वर्धा जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी १३६ मि.मी. पाऊस

18 Jul 2022 19:22:50
paus
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मुंबई : राज्यात वर्धा जिल्ह्यात २४ तासांमध्ये सरासरी १३६ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५.९ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहे. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचे दिसून आले आहे.
 
 
सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा दि. ३० जुलै पर्यंत सकाळी ०६ वा. पासून ते सायंकाळी ०७ वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली असून, सायंकाळी ७ वा. ते सकाळी ६ वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे.
 
 
नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये ११३ मिमी एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत. लक्ष्मी बॅरेज (मेडीगडा) चे सर्व ८५ दरवाजे उघडले आहेत.
 
 
गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १३६.४ मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या बचावाकरिता एनडीआरएफ टीम व दोन एसडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0