मनसेचा मेळावा रद्द! राज ठाकरेंनी दिलं पत्राद्वारे कारण

12 Jul 2022 14:51:05

raj thackeray
 
 
मुंबई: राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, मनसेच्या मेळाव्याचे १३जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते. पण राज्यभरातील पुरस्थितीमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहीलं आहे. या पत्रात मुसळधार पावसामुळे हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे.
 
 
"आपण वास्तविक उद्या एका मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हाला सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे. अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन कळवली जाईल. दरम्यान, तुम्ही स्वत:ची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे. तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा." असे पत्राद्वारे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
 
 
"मुख्यत: नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली-कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण पुरवावं लागेल. मुख्यत: वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडं उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील, अशा खूप गोष्टी आहेत. कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं." असे निवेदनातून सांगितले आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0