मुंबई: काल (मंगळवारी) स्वतः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करुन माहिती दिली की, आज बारावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साह व उत्सुकतेचं वातावरण आहे. यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेला उशिर झाल्याने निकालही आठवडाभराने उशिरा लागतोय. आज निकाल जाहीर होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावर्षी 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. मागच्या वर्षी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत. पण नंतर कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज म्हणजेच, बुधवारी 08 जून 2022 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थी व पालकांना उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला दहावी व बारावीचे निकाल लागतात. पण यावर्षी शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार, अशी शक्यता निर्माण झाली होती. दरवर्षी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली कि शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. त्यामुळे परीक्षांचे निकाल वेळेत लागतात. पण यावर्षी परीक्षेला सुरुवात होऊन देखील विनाअनुदानित शिक्षकांनी पेपर तपासायला सुरुवात केली नव्हती. त्यामुळे निकाल लागण्यासाठी खूप उशीर होणार व त्याचा परिणत पुढील ऍडमिशन व शैक्षणिक वर्षावर होणार का? या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. आज बारावीचा निकाल लागणार असल्याने दहावीच्या निकालाची तारीख देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.