वाचा बंद झालेला पोपट!

    23-Jun-2022   
Total Views |
 
 
shivsena 
 
 
 
एकेदिवशी बंड झाले. राजाला राजसिंहासन सोडण्याची वेळ आली. बोलक्या पोपटाला काही समजेना की, आता काय बोलायचे. ज्यांना कालपर्यंत मी दम मारत बसलो, तेच आता माझे पंख छाटायला निघाले आहेत, बिचार्‍याची वाचाच गेली, चोच बंद झाली, मुखम्लान झाले. रोज वटवट करणारा हा पोपट एकदमच शांत झाला. लोकांच्या दृष्टीआड तो होत गेला. त्याचे महत्त्व लयाला गेले. जीवंत असूनही मरण जवळ आले.
 
एक होता राजा. तो पोपटांचा फार शौकीन होता. विशेषकरून माणसाप्रमाणे बोलणारे पोपट त्याला फार आवडत असे. त्यामुळे त्याने खूप पोपट पाळले. हे पोेपट राजाची फार स्तुती करीत असत. आमचा राजा म्हणजे ‘राजा’ आहे. तो जंगलातील वाघ आहे. त्याचे दात तीक्ष्ण आहेत आणि नखेदेखील धारदार आहेत. आमच्या वाघाशी कुणीदेखील लढू शकत नाही. त्यात सर्वाधिक बोलणारा पोपट म्हणत असे की, तुमची हिंमत असेल, तर आमच्या वाघाशी येऊन लढा, आमच्या वाघाच्या नखांचा प्रसाद घ्या!
 
या बोलणार्‍या पोपट समूहातील हा पोपट राजाचा फार आवडता होता. राजाने त्याला सर्व सुखसुविधा उत्पन्न करून दिल्या. कुणाशी बोलायचं असेल, तर राजा या पोपटाच्या माध्यमातून बोलत असे. राजाला जनतेशी काही संवाद करायचा असेल, तर तोदेखील या पोपटाच्या माध्यमातूनच राजा करीत असे. इतर दुसर्‍या राजांशी बोलायचे असेल, चर्चा करायची असेल, तर राजा या पोपटालाच पाठवीत असे. अशी सगळी कामे हा बोलका पोपट सर्व शक्ती पणाला लावून पूर्ण करीत असे. अन्य पोपटांना त्याचा हेवा वाटे. परंतु, ते काही बोलत नसत. राजाची मर्जी गेली, तर आपण स्थानाच्युत होऊ, अशी त्यांना भीती वाटत असे. पोपटाला असे वाटे की, राजानंतर मीच. माझा दरारा केवढा आहे, माझ्यापुढे बोलण्याची कुणाची हिंमत होत नाही. सगळे कसे खाली मान घालून शांत बसलेले असतात.
 
यामुळे पोपट कधी कधी मर्यादा सोडूनही बोलत असे. राजाचे वरदान असल्यामुळे त्याला सर्व गुन्हे माफ होते. त्याची नजर बारीक असे. आपला विश्वासघात कुणी केला, कसा केला, हे तो रंगवून रंगवून सांगे. राजालाही सांगे की, राजा म्हणून तुमचा सन्मान झाला पाहिजे. तुम्हाला कुणी अपमानास्पद वागणूक देता कामा नये, ती तुम्ही सहन करता कामा नये आणि जो अपमानकारक वागणूक देईल त्याला शासन केले पाहिजे. पोपटाच्या मानापमानाच्या कल्पना थोड्या वेगळ्या होत्या. त्याची मानापमानाची पहिली कल्पना ही होती की, वनातील सगळ्यांनी माझ्या राजालाच ‘राजा’ म्हटले पाहिजे. त्याच्या निवासस्थानी जाऊन त्याला सलाम केला पाहिजे. तो जे काही सांगेल ते ऐकले पाहिजे आणि जे करायला सांगेल ते केले पाहिजे. यापैकी एखादी गोष्ट जरी कमी झाली, तर आपल्या राजाचा महान अपमान झाला, अशी वटवट हा पोपट सतत करीत राही.
 
पोपटाला असेच वाटत राहिले की, राजाचे राजेपद चंद्र-सूर्य असेपर्यंत राहणार आहे आणि त्यामुळे बोलक्या पोपटाला वाटे की, माझेही स्थान अढळ राहणार आहे. आमच्या दोघांच्या स्थानाला कसलाच धोका नाही. पोपटाची बडबड जास्त असली तरी वाचन थोडे कमी होते. त्याने जर गौतम बुद्धांचे चरित्र वाचले असते, तर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली असती. भगवान गौतम बुद्ध नेहमी सांगत की, “नामरुपात्मक असे जगात जे जे काही आहे, ते नाशवंत आहे. ते कायम टिकणारे नाही. सतत बदलत जाणारे आहे.” आज एक स्थिती आहे, उद्या ती तशीच राहील याची शक्यता नाही. आपल्या सर्वांना अशा अनित्य जगात जगायचे आहे. म्हणून अनित्येवर श्रद्धा ठेवू नये, ती खरी मानू नये. कायमॉस्वरुपाची मानू नये. त्यात बदल होणार, हे लक्षात ठेवावे. बोलक्या पोपटाने हे काही वाचलेले नसल्यामुळे तो अनित्यतेला नित्य मानत गेला आणि एकेदिवशी फसला.
 
राजाचे शूर निष्ठावान सैनिक बंड करतात आणि राजाच्या सिंहासनाचे खांब जमीनदोस्त होतात, अशी बंडे फार गुप्तपणे करावी लागतात. बंड होईपर्यंत त्याचा सुगावा कुणालाच लागत नाही. या कानाचे त्या कानाला कळत नाही. बंडाची तयारी चालू असताना पोपट मात्र ‘याद राखा, गद्दारी कराल, तर ठोकून काढू. गद्दारांना राजदरबारात स्थान नाही. आम्ही राजनिष्ठ आहोत. प्राण गेला तरी निष्ठा सोडणार नाही. आमच्या निष्ठा राजाच्या चरणी अर्पित आहेत.’ पोपटाची बडबड सगळे बंडखोर खाली माना घालून ऐकत होते आणि मनातल्या मनात हसत होते. या पोपटाचे पंख कसे कापायचे, याच्या त्यांच्या योजना पूर्ण झाल्या होत्या. योग्य संधीची ते वाट पाहत होते. अशी संधी पोपटाच्या राजानेदेखील सर्वांना दिली.
 
अनेक कारणांमुळे तो फक्त घरातच बसून असे. घरात बसूनच तो राज्य चालवीत. जनतेशी त्याचा संपर्क तुटला आणि सहकार्‍यांशी त्याचा संपर्क फारसा राहिला नाही. बंड होईपर्यंत त्याला आपले सहकारी काय करतात, हे समजलेच नाही. एकेदिवशी बंड झाले. राजाला राजसिंहासन सोडण्याची वेळ आली. बोलक्या पोपटाला काही समजेना की, आता काय बोलायचे. ज्यांना कालपर्यंत मी दम मारत बसलो, तेच आता माझे पंख छाटायला निघाले आहेत, बिचार्‍याची वाचाच गेली, चोच बंद झाली, मुखम्लान झाले. रोज वटवट करणारा हा पोपट एकदमच शांत झाला. लोकांच्या दृष्टीआड तो होत गेला. त्याचे महत्त्व लयाला गेले. जीवंत असूनही मरण जवळ आले. तेव्हा त्याच्याच कंपूतील दुसरा पोपट त्याला म्हणाला, “बाबा रे, एवढा दुखी होऊ नकोस. अजूनही दुसरे राजे यात आहेत. शक्तीमान आहेत. त्यांची सेवा कर. पुन्हा चांगले दिवस येतील. पण, एक धडा लक्षात ठेव, राजप्रसादाच्या शिखरावर पोपटही बसतो आणि तो आवाजही करीत राहतो. पण, राजप्रसादावर बसलेला पोपट कधी गरूड होत नाही, तो पोपटच राहतो.” एवढे लक्षात ठेव म्हणजे झाले!!
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.