उद्धव ठाकरेंनी काय गमावले?

    22-Jun-2022
Total Views |

Uddhav Thackeray
 
 
 
एकनाथ शिंदे दावा करीत असल्याप्रमाणे त्यांच्यासोबत ५० आमदार असतील, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला काही अर्थच रहात नाही. आणि बंड शमले असे गृहित धरले तरी यापुढे शिंदेकडे पाहूनच त्यांना कुठल्याही प्रकारच्या निर्णयांचा विचार करावा लागेल. नामधारी पक्षप्रमुखांप्रमाणे त्यांची आता स्थिती होईल. संजय राऊत व त्यांच्या बंधुंनी गोळा केलेल्या कोट्यावधी रूपयांची माया त्यांना राजकीय नेतृत्व देऊ शकणार नाही.
 
 
सध्याचा घटनाक्रम काळजीपूर्वक पाहिला तर महाराष्ट्र राजकीय अराजकाकडे निघाला आहे; यात काही शंका नाही. हे अराजक कुणी खमका प्रशासक येऊन मुख्यमंत्रीपदावर बसत नाही तोपर्यंत थांबणारे नाही, हेदेखील स्पष्ट आहे. सध्या उपलब्ध पर्यायात देवेंद्र फडणवीस हेच सगळ्‌यात योग्य आहेत, यातही काही शंका नाही. मात्र, राजकारणाला स्वत:चा तर्क आणि गती असते. राजकारण त्याच मार्गाने जाते आणि आपला प्रवास पूर्ण करते. महाराष्ट्रातही तेच होईल. प्रश्न उरेल तो शिवसेनेचा. आजच्या घडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे सत्तेशिवाय गमावण्यासारखे काहीच नाही. सत्तेत असताना त्यांनी जे काही कमावले ते त्यांच्या पुढच्या काही पिढ्यांची सोय करून ठेवेल. शिवसेना आणि शिवसेनेचे लोक यापेक्षा निराळे नाहीत. ‘लोक’ शब्द वापरला आहे कारण नेता म्हणावा असा कोणताही नेता आता शिवसेनेच्या निर्णयप्रक्रियेत उरलेला नाही. ठाकरे परिवार वगळलं तर आता नेतृत्व कोण हा प्रश्नच आहे. आता जे आहेत ते निरनिराळे कार्यक्रम 'मॅनेज' करणारे 'मॅनेजर' आहेत. मूळ मुद्दा आता ठाकरे परिवाराच्या नेतृत्वाचाच आहे. जे या बंडामुळे आता गंभीर वळणावर येऊन पोहचले आहे. खरं तर कुठलाही पक्ष असा संपत किंवा सुरू होत नाही. शिवसेनेसारखा पक्ष चळवळीतून आलेला असतो तो तर अशा वादळातही टिकाव धरतो हात शिवसेनेचा इतिहास राहीला आहे.
 
 
 
छगन भुजबळ ते राज ठाकरे यांच्यासारखे मातब्बर नेते शिवसेनेला सोडून जाऊनही शिवसेना संपली नव्हती. उलट मिळेल त्या मार्गाने सत्ता मिळवून शिवसेना गबर झाली. सत्तेतून आलेली वाढ सूज होती. वाढ नव्हे हे आता शिवसेनेच्या नेतृत्वाच्या लक्षात आले असावे म्हणजे किमान आतातरी सेनेच्या हे लक्षात यायला हवे. लढवय्या लोकांची संघटना जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी धावून जाणारी शिवसेना हे वीस वर्षापूर्वीच्या शिवसेनेचे चित्र होते. मात्र, त्याची जागा हळूहळू सत्तालोलूपांनी घेतली. मराठी माणसाचा मुंबईतला घसरता टक्का, त्यामुळे बंद होणाऱ्या मराठी शाळा यासारख्या शिवसेनेच्या अस्मितेच्या राजकारणाच्या प्रश्नांकडेही शिवसेनेकडे उत्तर नव्हते. बाळासाहेबांनी अत्यंत बेमालमपणे किंवा अपरिहार्यता म्हणून आपले चिंरजीव असलेल्या उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेचे नेतृत्व सोपविले आणि तिथून शिवसेनेसमोरच्या नव्या कालखंडाला सुरुवात झाली. राजकारणात चूक किंवा बरोबर असे काहीच नसते, जे असते ते काळाचे गणित! या गणितात मात्र उद्धव ठाकरे पुरते फसले. याची कारणेही त्यांच्या कार्यपध्दतीतच दडलेली आहेत.
 
 
 
शिवसेनेला आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा मिळाला मुंबईच्या दंगलीत. बेहरामपाड्यात आपल्या शिवसैनिकांसमवेत उतरलेले बाळासाहेब ठाकरे हे हिंदुंसाठी आयकॉन ठरले. यापूर्वी बाळासाहेबांनीही आपल्या राजकीय अस्तित्वासाठी अनेक प्रयोग केले होते. राजकारणाला असे प्रयोग लागतातच. आतून–बाहेरून या आणि अशा कितीतरी छुप्या युत्या त्यांनीही केल्या. काँग्रेसच्या राषट्रपतीपदाच्या उमेदवारांना पाठींबा देण्याच्या त्याच्या कृतीवर चांगलीच टिकाही झाली होती. मात्र, आपला हिंदुत्वाचा भगावा चोला मात्र त्यांनी काढून फेकला नव्हता. उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी ते केले आणि त्यांना संजय राऊतांनी त्यासाठी भरीस पाडले. सत्ता येते जाते पण तुमच्या अस्तित्वाच्या कारणांशीच, तुमच्या अधिष्ठानांशीच तुम्ही प्रतारणा केली. तुमची अवस्था कशी केविलवाणी होते, त्याचे उदाहरण समोर आहे. उद्धव ठाकरेंनी हे केळ्याच्या रोपावर फणसाचे केलेले कलम मोठी काटेरी फळे घेऊन आले आहे. कुठलेही बंड नेतृत्वासमोर आव्हाने उभी करते मात्र नेतृत्वाला ते मोडून काढून संघटनेवर आपली मांड पुन्हा ठोकावी लागते.
 
 
 
एकनाथ शिंदेनी उभे केलेले बंड उद्धव ठाकरेंना पेलवणारे नाहीच. बाळासाहेंच्या काळात असे बंड करणाऱ्यांचे काय केले जायचे ते सगळ्यांनीच पाहिले होते. आता शिंदेना तशी शिक्षा देण्याची हिंमत असलेला कुणीच नाही. त्याचे कारण लोकांमधून निवडून येणाऱ्या लोकांपेक्षा सेनेच्या नेतृत्वात विधान परिषद आणि राज्यसभेच्या माध्यमातून म्हणजेच मागच्या दाराने आत गेलेल्यांचाच भरणा मोठा आहे. ही मंडळी पक्ष चालवित नाहीत. सत्तेत त्यांना स्थान नसते मग साहेंबाच्या कानापर्यंत पोहचून ती जागा अडवून ठेवायची आणि अन्य कुणालाही तिथपर्यंत पोहचू द्यायचे नाही, असा हा शिरस्ता. यातून लोक दूर गेले. राजकारण हा छंदी माणासाच्या आवाक्यातली गोष्टच नाही. उद्धव ठाकरेंच्या पदरात आज पदच्युत केलेला नेता आणि गमावलेले मावळे अशी दूषणे पडली आहेत. इतके होऊनही सध्या ज्या केविलवाण्या स्वरात ते आपल्या शिवसैनिकांना साद घालत आहेत, त्यात राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे म्हणून परत या असा सूर आहे. ज्यांच्यावर कुणीच भरोसा ठेवला नाही अशा शरद पवारांवर भिस्त ठेऊन हा सगळा खेळ सुरू आहे. शिवसेनेला सत्ता मिळाली मात्र अधिकार फारसे मिळालेले नाहीत. छान छान कार्यक्रम यात मुख्यमंत्री व त्यांचे सुपुत्र रमले. मात्र खाली काम करणारा शिवसैनिक कामे होत नसल्याने ओरड करीत होता. मात्र त्याचा आवाज सत्तेत मशगूल असलेल्यांच्या कानापर्यंत पोहोचला नाही.
 
 
 
एकनाथ शिंदे दावा करीत असल्याप्रमाणे त्यांच्यासोबत ५० आमदार असतील, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला काही अर्थच रहात नाही. आणि बंड शमले असे गृहित धरले तरी यापुढे शिंदेकडे पाहूनच त्यांना कुठल्याही प्रकारच्या निर्णयांचा विचार करावा लागेल. नामधारी पक्षप्रमुखांप्रमाणे त्यांची आता स्थिती होईल. संजय राऊत व त्यांच्या बंधुंनी गोळा केलेल्या कोट्यावधी रूपयांची माया त्यांना राजकीय नेतृत्व देऊ शकणार नाही. पुढे काय घडेल याचा घटनाक्रम सुस्पष्ट आहे. शिवसेनेच्या राजकीय उत्कर्षाची सुरूवात ठाण्यातून झाली होती. ठाणे महापालिका ही शिवसेनेने जिंकलेली पहिली महापालिका. आता शिवसेनेच्या अपकर्षाची सुरूवातही ठाण्यातूनच झाली आहे. घराण्याच्या कच्छपी लागून राजकीय कारकीर्द करू इच्छिणाऱ्या मंडळींनाही हा घटनाक्रम जो संदेश द्यायचा तो देणारा असेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.