पवार खंबीर आहेत तोवर सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही! : अमोल मिटकरी

22 Jun 2022 16:49:33

Amol Mitkari
 
 
मुंबई : विधान परिषदेच्या निकालाच्या दुसर्‍याच दिवशी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय उलथापालथ पाहता शिवसेना आणि ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसुध्दा राष्ट्रपती पदासंदर्भात असलेली बैठक अर्धवट सोडून मुंबईला रवाना झाले होते. अशातच "पवार खंबीर आहेत तोवर सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही!", असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. बुधवारी (दि. २२ जून) घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
 
 
 
"सध्याची राजकारणातील परिस्थिती पाहता आलेलं संकट हे शिवसेनेवर नसून आघाडी सरकारवर आलेलं संकट आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीतल्या आमदारांच्या मनात काय आहे, कशापद्धतीने आता पुढे गेलं पाहिजे यासंदर्भात मार्गदर्शनासाठी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सहज बोलावलं होतं. प्रत्येकाच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. त्यानिमित्ताने आणखी एक बैठक येत्या गुरुवारी ठेवली आहे.", असे मिटकरी यांचे म्हणणे आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी सरकारसोबत आहे. अशा अडचणीच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आम्ही त्यांच्या सोबत आहोत.', असेही ते पुढे म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0