ज्ञानयोग अर्थात ब्रह्मैक्य ज्ञान

18 Jun 2022 11:47:36

meditation
 
 
योग ही भारतातील हजारो वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. योग हा शब्द ‘युज्’ या मूळ शब्दापासून बनला आहे. ‘युज्’ म्हणजे जोडणे. जीव (आत्मा) व परब्रह्म (परमात्मा) यांचे मीलन म्हणजेच योग. हे साध्य करण्याचे अनेक मार्ग किंवा टप्पे आहेत. राजयोग, कर्मयोग, हठयोग, भक्तियोग, लययोग आणि ज्ञानयोग हे त्यातीलच प्रमुख सहा मार्ग. यामध्ये कोणताही मार्ग अवलंबविण्यासाठी यथार्थ ज्ञानाला पर्याय नाही. त्यामुळे ज्ञानयोग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या भागात जाणून घेऊया याच ज्ञानयोगाविषयी...
 
 
आता प्रश्न पडू शकतो की, ‘ज्ञानयोग’ या परिभाषेमध्ये ‘ज्ञान’ या शब्दाने नक्की काय अर्थ अभिप्रेत आहे?
‘ज्ञान’ म्हणजे ‘इन्फर्मेशन’ इतकाच अर्थ इथे नक्कीच अपेक्षित नाही. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या विशेष श्रेणीत अनेक पदव्या संपादन केलेली व्यक्ती म्हणजे ‘ज्ञानी माणूस’ अशी रूढ व्याख्या इथे तोकडी पडते. सर्व सृष्टी हा आत्मतत्त्वाचाच आविष्कार आहे, असे मानूनच आपला आचार-विचार ठेवणे म्हणजे यथार्थ ज्ञान किंवा अंतिम सत्य (अलीेर्श्रीींश ज्ञपेुश्रशवसश / र्ढीीींह) म्हणता येईल.
 
 
म्हणूनच संस्कृती कोशामध्ये ज्ञानयोगाची खालीलप्रमाणे व्याख्या केली आहे-
 
 
जीव, जगत् व परब्रह्म यांचे यथार्थ ज्ञान शास्त्रांच्या अभ्यासाने व गुरूच्या साहाय्याने करून घेऊन त्यावरून ब्रह्मैक्य जाणणे आणि अनुभवणे याला ‘ज्ञानयोग’ म्हणतात.
 
 
’न हि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते ।’ म्हणजे ज्ञानासारखे पवित्र इथे काहीही नाही, असे गीतेत (४.३८) सांगितले आहे. ज्ञानप्राप्तीसाठी साधकाला तीव्र जिज्ञासा असली पाहिजे. ज्ञानासाठी श्रद्धेची नितांत आवश्यकता आहे. श्रद्धेसोबतच इंद्रियसंयम व तत्परतादेखील आवश्यक आहे. अशाप्रकारे या तीनही गोष्टींमुळे ज्ञानाविषयी तीव्र जिज्ञासा जागृत होऊन यथार्थ ज्ञान व त्यामुळे परमशांती लाभू शकते, असे भगवान श्रीकृष्ण सांगतात.
 
 
श्रद्धेने मेळवी ज्ञान
संयमी नित्य सावध।
ज्ञानाने शीघ्र तो पावे शांति शेवटची मग॥ ४.३९-विनोबा समश्लोकी
 
 
ज्ञानाचे प्रकार
 
 
भगवद्गीतेमध्ये ज्ञानाचे तीन प्रकार वर्णिलेले आहेत. तामस, राजस आणि सात्त्विक ज्ञान. या प्रकारांची साधी सोपी लक्षणे दिली आहेत. ती क्रमश: पाहू -
 
 
तामस : केवळ स्वत:च्या देहालाच सर्वस्व मानणे म्हणजे तामस ज्ञान होय. यामुळे गर्विष्ठ, घातकी, आळशी, स्वच्छंदी इत्यादी वृत्ती दिसून येतात.
 
 
एका देहात सर्वस्व मानुनी
गुंतले वृथा।
भावार्थ हीन जे क्षुद्र जाण
ज्ञान ते तामस ॥ १८.२४
विनोबा समश्लोकी
 
 
राजस : सर्व प्राणिमात्रांचे वेगवेगळे असे भेदात्मक ज्ञान म्हणजे राजस ज्ञान. यामुळे लोभ, कामासक्ती, हिंसा, हर्ष, शोक इत्यादी वृत्ती निर्माण होतात.
 
 
भेद बुद्धीस पोषूनी सर्व भूतात पाहते।
वेगळे वेगळे जाण ते ज्ञान राजस॥ १८.२३- विनोबा समश्लोकी
 
 
सात्त्विक : सर्व प्राणिमात्र एकच आहेत, असे ज्ञान म्हणजे सात्त्विक ज्ञान. यामुळे निरहंकार, उत्साह, नि:संग, धैर्य इत्यादी गुण वाढीस लागतात.
 
 
भूतमात्रांत जे पाहे
भाव एक सनातन। अभिन्न भेदलेल्यात जाण
ज्ञान ते सात्त्विक ॥१८.२२- विनोबा समश्लोकी
 
 
यथार्थ ज्ञानाचे अधिकारी होण्यासाठी उत्सुक व्यक्तीस किंवा साधकास ’मुमुक्षु’ ही संज्ञा आपल्याकडे वापरलेली दिसते. मुमुक्षु म्हणजे मोक्ष किंवा आत्यंतिक सुख प्राप्त करण्याची इच्छा बाळगणारा.
 
 
मुमुक्षुने यथार्थ ज्ञान मिळविण्यासाठी प्रामुख्याने चार साधनांचा अंगीकार करावा, असे शास्त्र सांगते-
नित्यानित्यविवेक : आत्मतत्त्व वगळता बाकी सर्व वस्तू या नाशिवंत आहेत. केवळ आत्मा हा स्थिर व अविनाशी आहे, हे ओळखणे म्हणजे नित्यानित्यविवेक.
 
 
इहामुत्रकर्मफलवियोग : कोणत्याही कर्मापासून मिळणार्‍या ऐहिक अथवा पारलौकिक फळाविषयी वैराग्य - अनासक्ती.
यम - नियम - वैयक्तिक व सामाजिक नियम पालन. याविषयी आपण सदर लेखमालेच्या ‘अष्टांगयोग’ या प्रथम लेखात माहिती घेतली आहेच.
 
 
मुमुक्षुता : ब्रह्मतत्त्व हे सर्वव्याप्त आहे असे ज्ञान (ब्रह्मैक्य ज्ञान) प्राप्त करून मुक्तीची इच्छा.
ज्ञानप्रक्रियेत ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान अशा तीन गोष्टींचा समावेश होतो. याला एकत्रित ज्ञान-त्रिपुटी अशी संज्ञा आहे.
ज्ञाता म्हणजे ज्याला ज्ञान होते - आत्मा. ज्ञेय म्हणजे ज्याविषयीचे ज्ञान प्राप्त केले जाते - पदार्थ. ज्ञान म्हणजे जे ज्ञात्यास होते.
 
 
 
ज्ञानाची पातळी जसजशी उंचावत जाईल, तसतसे अज्ञान कमी होऊन या त्रिपुटीचा लोप होतो व केवळ आत्मतत्त्व म्हणजे ज्ञाता आहे, हेच ज्ञान अस्तित्वात राहते.
 
 
ज्ञानं ज्ञेयं तथा ज्ञाता
त्रितयं नास्ति वास्तवम्।
अज्ञानाद् भाति यत्रेदं
सोऽहमस्मि निरंजन:॥
अष्टावक्र महागीता
 
 
या सर्व विवेचनावरून, प्रपंच व संसारापासून दूर जाऊन ज्ञानयोग साधावा लागतो, असा वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. जागतिक घडामोडीत रस नसणारा, अलिप्त किंवा रुक्ष माणूस म्हणजे ज्ञानयोगी नव्हे.
 
 
नित्यकर्मात नि:संगवृत्ती, चित्तातील निरहंकारिता, विषयांमधील विरक्तता, आप्तेष्टांविषयी अलिप्तता, इष्ट-अनिष्ट लाभाविषयी समचित्तत्व इत्यादींसाठी चित्ताची तयारी करावी लागते. यासाठी मात्र कर्मयोग व काही अंशी भक्तियोग आत्मसात करणे आवश्यक आहे. या सर्व उपायांनी ज्ञानाची पातळी उंचावणे व अज्ञान/अविद्या नष्ट होणे शक्य होते.
सारांश : प्रपंचात राहून सर्व कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करणे व त्यासाठी भक्ती आणि कर्मयोग यांचे परिशीलन करणे, हाच ज्ञानयोग प्राप्त करण्याचा राजमार्ग होय.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0