वैदिक परंपरा आणि साधना

16 Jun 2022 11:18:48

kalyavan
 
 
 
 
कालयवन वमुचकुंद
 
 
 
कथा लिहाव्यात भगवान वेदव्यासांनीच आणि त्या कथांना साजेशी नावेसुद्धा योजून काढावी व्यासांनीच! कथेतील प्रत्येक नावात गहन योगज्ञान आहे, हे व्यासकृपा झाल्याशिवाय लक्षात येणे कठीण आहे. कालयवन म्हणजे प्रत्येक जीवनाला दरक्षण कमी करणारा काळ प्रत्येकाला शत्रूसमान म्हणजे दुष्ट यवन वाटतो, म्हणून मृत्यू जवळ आणणार्‍या काळाला भगवान वेदव्यास कालयवन म्हणतात. या कालयवनाची जेव्हा जेव्हा भगवान श्रीकृष्णाची गाठ पडायची तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण कालयवनाच्या समोरून दूर पळून जायचे.
 
 
 
कथा लिहाव्यात भगवान वेदव्यासांनीच आणि त्या कथांना साजेशी नावेसुद्धा योजून काढावी व्यासांनीच! कथेतील प्रत्येक नावात गहन योगज्ञान आहे, हे व्यासकृपा झाल्याशिवाय लक्षात येणे कठीण आहे. कालयवन म्हणजे प्रत्येक जीवनाला दरक्षण कमी करणारा काळ प्रत्येकाला शत्रूसमान म्हणजे दुष्ट यवन वाटतो, म्हणून मृत्यू जवळ आणणार्‍या काळाला भगवान वेदव्यास कालयवन म्हणतात. या कालयवनाची जेव्हा जेव्हा भगवान श्रीकृष्णाची गाठ पडायची तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण कालयवनाच्या समोरून दूर पळून जायचे. कालयवन म्हणजेच मृत्यू सामोरा आल्यावर कोण साधक लगेच मरायला म्हणजे त्यापासून पराभव पत्करायला तयार होईल? यादृष्टीने भगवान श्रीकृष्ण १०० वेळा कालयवनापासून दूर पळून गेले. काळ हा सर्व भक्षक आहे. मोठमोठे योगी वा अवतारसुद्धा काळाच्या तडाख्यातून सुटत नाहीत. १०० वर्षे जगू इच्छिणारा साधक १०० वेळा कालयवनापासून दूर पळून जाणार नाही काय? म्हणून योगी भगवान श्रीकृष्ण कालयवनापासून १०० वेळा दूर पळून गेले. कालचक्राच्या फेर्‍यातून कोण मुक्त वा ‘मुच’ होणार? ज्याने बंदिस्त अशा ‘कुंद’परंतु शेवटी काळाच्या उदरात आज ना उद्या शरीर गडप होणारच! या जडजीवनातून ’मूच’ म्हणजे मुक्ती मिळविली आहे, असाच अमर साधक मुचकुंद होईल ना? आणि अशा मुचकुंद योगावस्थेसमोर कालवयन भस्म होणारच ना? मुचकुंद ऋषींसमोर उभ्या ठाकलेल्या कालवयनाकडे मुचकुंदाने पाहिल्याबरोबर कालयवन जागच्या जागी जळून भस्म झाला, अशी ती मुचकुंद कथा किती यथार्थ आहे, याची आता कल्पना येईल. कथा सर्वांना माहीत आहे. कालयवन कृष्णाला ठार मारण्याकरिता म्हणून युद्धभूमीवर उभा राहिला.
 
 
 
नेहमीप्रमाणे कृष्ण कालवयनापासून पळून गेला. यावेळेस मात्र कालयवनाने (रणछोडदास) श्रीकृष्णाचा पाठपुरावा केला. कालयवनाने श्रीकृष्णाशी १०० वेळा युद्ध केले होते. प्राकृतिक मरण अटळ आहे, असा विचार करून भगवान श्रीकृष्णाने एक चतुर योजना आखली. देवासुरांच्या भीषण युद्धात मुचकुंद राजाने असुरावर विजय मिळविण्यास इंद्राला पूर्ण साहाय्य केले. त्यामुळे प्रसन्न होऊन इंद्राने मुचकुंदाला वर मागण्यास सांगितले, युगे युगे देवासुरांच्या युद्धात लढल्यामुळे आता राजा मुचकुंद भयंकर थकला होता. त्याने इंद्राला वर मागितला की, तो एका गुहेत (सुषुम्ना नाडीत) जाऊन झोपेल, त्याला कोणी उठवू नये. परंतु, कोणी झोपेतून उठविल्यास त्या उठविणार्‍याकडे मुचकुंदाने पाहिल्याबरोबर तो माणूस जळून भस्म व्हावा. इंद्राने इच्छित वर दिला आणि युगायुगापासून राजा मुचकुंद एकसारखा एका अंध:कारमय गुहेत (सुषुम्ना नाडीत) स्वस्थ झोपून पडला होता, म्हणजे मुचकुंदरूप योग्याला चिरसमाधी लागली होती. मुचकुंदाबद्दलची ही कथा कृष्णाला माहीत होती. कालयवनापासून सुटका मिळावी म्हणून कृष्ण पळत पळत मुचकुंद राजा झोपला होता, त्या अंध:कारमय गुहेत शिरला आणि मुचकुंदाच्या मागे अंध:कारातील आतल्या गुहेत लपून बसला म्हणजेच चिरसमाधीत गेला. कृष्णाचा पाठलाग करणारा कालयवन गुहेपाशी आला तो त्याला अंगावर कृष्णाची शाल पांघरून झोपलेला माणूस दिसला. मागे अंध:कारात काळ्या वर्णाचा कृष्ण कालयवनाला दिसला नाही. अंध:कार काळा आणि कृष्ण ही काळा. मग कालयवनाला कृष्ण कसा दिसणार? शाल पांघरलेला माणूस कृष्णच समजून कालयवनाने राजा मुचकुंदाला लाथ मारली. तो काय! मुचकुंद युगायुगाची निद्रा (समाधी) भंग झाल्यामुळे उठून बसला व आपल्याला लत्ताप्रहार करणार्‍या त्या कालयवनाकडे पाहता झाला. मुचकुंदाची अमर दृष्टी पडताच कालयवन भस्म झाला. आजही कृष्ण आहे!
 
 
 
मुचकुंद कोण?
 
 
 
कालयवनाचे ज्ञान आम्हास झाले आहे. आता मुचकुंद ज्ञान पाहू. ’मूच’ म्हणजे मुक्त व ‘कुंद’ म्हणजे बंधन मुचकुंदाचा योगार्थ आम्ही पाहिला. आता हा भूमिपुत्र मुचकुंद स्वर्गात सुरासुर युद्धात इंद्राला साहाय्य करण्यास कसा काय गेला असेल? मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. अशी एक म्हण आहे. मग जीवंतपणी राजा मुचकुंद कसा स्वर्गात गेला? स्वर्गातील सुरासुर म्हणजे काय? इंद्र म्हणजे कोण? प्रथम इंद्राबद्दलची वेदातील कल्पना पाहू.
 
 
 
ये अवञ्चिरताँ पराच आहुर्य पराजस्ताँ उ अर्वाच आहुः ।
इन्द्रश्च या चक्रथु: सोम तानि धुरा न युक्ता रजसो वहन्ति ॥
(ऋग्वेद १.१६४.१९)
 
 
 
आशय असा की, इंद्रियांचा स्वामी इंद्ररूप जीवात्मा जी कर्मे करतो ती कर्मेच त्या जीवात्म्याला बैल ज्याप्रमाणे आपल्या खांद्यावर धुरा घेऊन नांगर एका शेतातून दुसर्‍या शेतात नेतो, तद्वत कर्मरूप धुराच जीवात्म्याला एका जन्मातून दुसर्‍या जन्मात घेऊन जाते. जीवात्मा आपल्याच कर्मभाराने कसा पुन्हा पुन्हा जन्म घेतो, याचे इतके सुंदर उदाहरण जगातील वाड्.मयात नसेल. यावरून इंद्र म्हणजे कोणी स्वर्गातील कल्पित देवता नसून प्रत्येक शरीरातील जीवात्माच होय, यात शंका नाही. आता स्वर्ग म्हणजे काय याबद्दलची कल्पना भगवान वेदव्यास श्रीमद्भागवत कपिलदेवांच्या उक्तीतून सांगतात.
 
 
 
अत्रैव नरकः स्वर्ग इति मातः प्रचक्षते । या यातना नारक्यस्ता इहाप्युपलक्षिताः’ ॥(श्रीमद्भागवत ३/३०/२९)
 
 
 
यावरून स्वर्ग वा नरक ही अन्य स्थाने नसून याच जन्मात भोगण्याच्या अवस्था आहेत, हे यावरून स्पष्ट आहे. अशा या येथीलच इंद्राला म्हणजे जीवाला राजा मुचकुंद सुरासुर युद्धात युगे युगे साहाय्य करून शेवटी इंद्राला त्या युद्धात जय मिळवून देतो. बुद्धिमान अथवा साक्षात्कारी साधकाला हा मुचकुंद कोण आणि त्याचे सुरासुर युद्ध काय आहे, याची कल्पना येऊ शकेल. तुकाराम महाराजांनादेखील या सुरासुर युद्धाची पूर्ण कल्पना होती. ते म्हणतात, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ तुकाराम कोणते युद्ध लढत होते? चांगल्या वाईट वृत्तींचे युद्ध! यावरून साधकाच्या म्हणजे इंद्राच्या स्वर्गातील युद्धात सुर व असुर कोणते याची स्पष्ट कल्पना देऊ शकते. शील, संतोष, शौच, अभयव ज्ञान हे त्या सुरासुर युद्धातील सुर असून काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकारादी दुर्गुण असुर होत. शूर साधक म्हणजे राजा मुचकुंद (ज्याला जन्ममरणाच्या फेर्‍यातून मुक्त व्हायचे आहे.) इंद्राला या युद्धात साहाय्य करतो. युगयुग युद्ध कसे? समर्थ रामदास म्हणतात, ‘अनंत जन्मांचे सार्थक नरदेह सांपडे अवचट’ योग्यांचा देह विनाशी असतो पण ते अविनाशी अमर असतात. ‘मृत्योर्मा अमृतं गमय’ अशी त्यांची धाव असते. अशा मृत्युंजय मुचकुंदासमोर प्रत्यक्ष काळ म्हणजे कालयवन उभा राहिला तरी तो जळून भस्म होणार नाही काय? साधकाच्या जीवनातील मृत्युंजय घटना म्हणजे ‘मुचकुंद कालयवन’ कथा होय. (क्रमशः)
 
 
 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)

९७०२९३७३५७

- योगिराज हरकरे
 
 
 
Powered By Sangraha 9.0