पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी- फडणवीस

14 Jun 2022 18:06:29
y

 
 
 
 
पुणे : जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर (शिळा मंदिर) लोकार्पण सोहोळा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झाला. त्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय! असा विठुरायाचा गजर करत अत्यंत उत्साहाने देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
 
 
पवित्र ते कूळ पावन तो देश या तुकोबांच्या अभंगाचा दाखल देत, यादव काळानंतर समाजात एक प्रकारचे नैराश्य आणि अंधःश्रद्धा या मुळे समाजाचे शोषण सुरु होतं. तेव्हा समाजाला भागवतधर्माच्या मार्गावर नेण्याचे काम ज्ञानेश्वर माऊलींनी केले आणि त्यावर कळस चढविण्याचे काम जगदगुरु तुकाराम महाराज यांनी केले. भागवत धर्माला जना-जनापर्यंत पोचवून, सश्रद्ध पण अंधःश्रद्धेपासून दूर ठेवत तुकोबांनी शब्दाचे धन लोकांत वाटले. तुकोबांच्या शब्दांना कोणी मिटवू शकले नाही. इंद्रायणीत डुबवा कि शिळेने बंद करा तरीही तुकोबांचे शब्द वर आले आणि त्यांनी जना-जनाला व्यापून घेतलं, असे म्हणत तुकोबांनी दाखवलेल्या मार्गावरूनच चालण्याचे काम देशाचे नेतृत्त्व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत, असे फडणवीसांनी सांगितले.
 
 
जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ हाच मंत्र पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारला आणि गरीब कल्याणाची मोहीम हाती घेत रंजल्या गांजल्यांसाठी काम करत आहेत. म्हणून आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी आहेत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे.
 
 
 
"कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाला मदत करण्याचे काम मोदीजींच्या नेतृत्त्वात झाले. सबका साथ-सबका विकास, सबका विश्वास-सबका प्रयास! वारकर्‍यांच्याच या ब्रिदावर आज देशाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आज वारकर्‍यांच्या भूमिकेतूनच काम करीत आहेत.", असेही फडणवीस म्हणाले.
 
 
 
त्यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटलं की, “वारकऱ्यांमध्ये कुणी मोठं नसतं, कुणी छोटं नसतं, सगळे वारकरी सेवक असतात, आपले पंतप्रधान ‘प्रधानसेवक’ आहेत. त्यामुळे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हेच तर वारकरी संप्रदाय सर्वांना सांगतो. तेच काम मोदी करत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण जगासाठी जे पसायदान मागितलं, संपूर्ण जग आपलं आहे, हा संदेश दिला. नरेंद्र मोदी यांनी देखील करोना काळात संपूर्ण जगाला लसीकरणाचा पुरवठा केला. मोदी यांनी खऱ्या अर्थाने भागवत धर्माचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवत आहे,” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0