एकट्या कल्याण डोंबिवलीत आहेत ३५०० वटवृक्ष!

13 Jun 2022 17:18:35

KD
 
 
 
 
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आजमितीस वडाची तीन ते साडे तीन हजार झाडे आहेत. दहा वर्षापूर्वी हाच आकडा एक हजार इतकाच होता. गेल्या दहा वर्षात त्यात दोन हजारापेक्षा जास्त वाढ झाली आहे. यावरून वृक्ष संवर्धनासाठी महापालिका सजग असल्याचे दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने वृक्षगणना करण्यासाठी यंदाच्या वर्षी अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. महापालिका दरवर्षी झाडे लावण्यावर भर देत असते. पावसाळ्य़ात ही महापालिकेकडून मोठया प्रमाणावर झाडे लावली जातात. तसेच रिंग रोडमध्ये काही झाडे बाधित होणार असल्याने महापालिकेने आंबिवली येथे ४५ एकर जागेमध्ये वृक्षारोपण केले आहे.
 
 
 
या जागेत वडाची अंदाजे दोन हजार झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत आता अंदाजे तीन ते साडे तीन हजार वडाची झाडे आहेत. रिंग रोडमध्ये झाडे बाधित होण्यापूर्वी आंबिवलीत झाडे लावण्यात आली आहेत. रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यात दोन हजार झाडे बाधित होणार आहेत. ही झाडे बाधित होण्यापूर्वी साधारण एक हजार ते बाराशे झाडे आंबिवली येथे लावण्यात आली आहे. महापालिकेने २००५ साली वृक्षगणना केली होती. त्यावेळी महापालिका क्षेत्रत १०३८ इतकी वडाची झाडे होती.
 
 
 
आता या झाडांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. तसेच पावसाळ्य़ात वडासारखी वृक्ष उन्मळून पडत नाही. त्यामुळे वडाच्या झाडांची संख्या कमी होत नाही. महापालिकेने आंबिवलीला ४५ एकरमध्ये गार्डन तयार करण्यास सुरूवात केली आहे. त्याच जागेच्या बाजूला असलेली २५ एकर जागा महापालिकेने वनविभागाकडे मागितली आहे. कारण महापालिकेकडे आता स्वत: ची वृक्षरोपणासाठी जागा उरलेली नाही. वनविभागाकडून २५ एकर जागा मिळाल्यानंतर आणखी काही झाडे लावण्याचा महापालिकेचा मानस आहे अशी माहिती महापालिकेचे अधिकारी संजय जाधव यांनी दिली.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0