शारीरिक आरोग्य सांभाळण्याचा जेव्हा बुद्धिपुरस्सर व प्रयत्नपूर्वक अभ्यास केला जातो, त्याचबरोबरीने मनाचे आरोग्य सांभाळण्याचा कसोशीने व निष्ठेने प्रयत्न झाला पाहिजे. आपापले शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळून व जपून प्रत्येक जण जगावर एकप्रकारे उपकारच करत असतो. कारण, आजारी झालेला माणूस इतरांवर अवलंबून राहतो. आजारी पडल्यावर आपल्यामुळे इतरांनाच त्रास होत असतो, म्हणूनच आपले आरोग्य सांभाळणे म्हणजे एक प्रकारे ही जगाला केेलेली मदतच होय. आपले शरीर जर निरोगी ठेवायचे असेल, तर सर्वप्रथम आपले मन हे निरोगी राहिले पाहिजे आणि यासाठीच आपण निरोगी मनामध्येे जे गुणधर्म असतात, त्यांचा अभ्यास करत आहोत. निरोगी मनाचा अजून एक महत्त्वाचा गुण म्हणजे ‘दया.’ भूतलावरील प्राणिमात्रांवर दया करणे. दया करणे म्हणजे दुसर्याचे दु:ख किंवा परिस्थिती पाहून मनात कणव उत्पन्न होणे व ते दु:ख दूर करण्यासाठी यथाशक्ती, यथामती प्रयत्न करणे होय. त्यालाच आपण ‘अनुकंपा’ असे म्हणतो.
दया करणे किंवा करुणा करणे हासुद्धा निसर्गाचा व पर्यायाने दैवी असा गुण आहे. निसर्ग हा सर्व प्राणिमात्रांवर सतत दया करत असतो. आपल्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता निसर्ग सतत आपल्याला देत असतो व आपल्यावर दया करत असतो, यालाच निसर्गाचे अकारण कारुण्य किंवा निसर्गाची ‘लाभेविण प्रीती’ असे म्हणतात. हाच गुण जर आपण आपल्या मनामध्ये बाळगला तर मन निरोगी राहते. जगामध्ये कुठल्याही धर्मामध्ये ‘दया’ या गुणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. ‘दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती’ असे म्हटले जाते. या दयेच्या गुणामुळेच माणसामध्ये परोपकाराची भावना निर्माण होते. दयेमुळेच दुसर्याचे दु:ख जाणून घेण्याची इच्छा होते व स्वाभाविकपणे दुसर्यांना आपल्यामुळे दु:ख होऊ नये, याची आपण आपोआपच काळजी घेऊ लागतो. दयेच्या गुणामुळे मग आपोआपच क्षमाशीलता येते व या दोन्ही गुणांमुळे मनामध्ये शांतता येते. शांत असलेले तरंगविरहित मन हे समुद्राच्या आतील पाण्यासारखे लहरीविरहित बनते व असे मन नेहमी सकारात्मक व स्पष्ट विचार मांडत असते. शांत असलेले मन मग फार मोठ्या प्रमाणावर सत्कार्य करु शकते.
दया हा गुण अंगी बाळगण्यासाठी सतत निसर्गाच्या गुणांचा अभ्यास करावा. नेहमी सत्पुरुषांची चरित्रे वाचावीत. पवित्र धर्मग्रंथांचे वाचन करावे, ज्यामध्ये सत्य, प्रेम आणि शांती याबद्दल मार्गदर्शन केलेले असते. जर मनाने हे गुण अंगीकारले, तर मनाची व शरीराची सहजता सहजासहजी निघून जात नाही व त्यामुळे माणूस आजारीही पडत नाही. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी नुसता शारीरिक व्यायाम उपयुक्त नसतो, तर हे चांगले गुण अंगी आणण्यासाठी मनाचा व्यायामही तेवढाच उपयुक्त असतो. निरोगी मन जपण्यासाठी अजून कसे वागावे, हे आता आपण पाहूया.
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
डॉ. मंदार पाटकर