सावरकरांची कविता

27 May 2022 18:03:23

savarkar
 
 
 
सावरकरांनी इतर बरेचसे लेखन बाकीचे उद्देश ठेवून केले असले तरी, त्यांनी लिहिलेले काव्य हे त्यांच्या संकटाच्या काळात त्यांनी स्वतःचे आत्मबल वाढविण्यासाठी लिहिलेल्या महान कृती होय. पण, एक लक्षात घेणे गरजेचे आहे की, हेच काव्य जेव्हा आपणही वाचतो तेव्हा आपलीही मानसिक शक्ती, सकारात्मक वृत्ती वाढतेच वाढते!
 
 
 
राजा बढे हे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील एक आघाडीचे कवी व गीतकार होते. पण, त्यांचे एक विशेष म्हणजे ते सावरकरांचे निस्सीम भक्त होते. त्यांनी त्यांच्या एका कवितेत सावरकरांचे गुणगौरव गाताना म्हटले आहे,
’मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा,
नवोउन्मेषशाली कवींच्या कवे,
महासाहसी त्यागवीरा उदारा,
किती आळवावे तुला गौरवे!
म्हणजे सावरकर हे ‘कवींच्या कवे’ आहेत.
 
 
 
तुम्ही-आम्ही सगळे लिहितो, वाचतो, रोजच्या जगात वावरतो, काहीतरी करत राहतो. पण, संकट आले की, आपण सैरभैर होतो की नाही? अशा संकटात आपले मन उद्विग्न होऊन आपल्या मूळ आवडीनिवडी, ध्येय इ.पासून दूर जातो व दुःखी कष्टी, व्यथित होते की नाही? सावरकरांचे मग काय झाले असेल? इतक्या कठोर अंदमानसारख्या बंदिवासातही त्यांची कविता फुलून आली, बहरून आली, तरारून तिला धुमारे फुटले! म्हणूनच सावरकरांची कविता ही त्यांच्या ’पारतंत्र्यातून मुक्त होऊ पाहणार्‍या ’वृत्ती’ सारखी स्वतंत्र होती, म्हणूनच ब्रिटिशांनी त्यांच्या शरीराला जरी जखडून टाकले, तेच ब्रिटिश मात्र त्यांच्या मनाला व त्यांच्या कवितेला मात्र जखडू शकले नाही.
 
 
कविता व सावरकर यांना वेगळे करता येणे शक्य नाही. जसा आपण रोज जगण्यासाठी श्वास घेतो, तशी कविता हा सावरकरांचा ’श्वास’ होता. या कवितेने त्यांना आयुष्यभर एखाद्या ‘प्रिय मैत्रीण’ वा ‘प्रिय सखी’सारखी साथ दिली. बहुतेक कवितांमध्ये आपण बघतो की, दुःख, प्रेमातील विफलता, वेदना, विरहाचे गाणे इ. सतत आळवले जाते. पण, सावरकरांची कविता तशी अजिबात नव्हती. त्यांच्या कवितेतून मातृभूमीचे निस्सीम प्रेम, मातृभूमीच्या विरहातून आलेली व्याकुळता, जीवनाचे थोर तत्वज्ञान, जीवनातील दुर्लक्षित झालेली सौंदर्यस्थळे, निसर्गातील रूपके व प्रत्यक्ष जीवन यांची त्यांनी घातलेली अद्भुत सांगड इ. रूपे दिसतात. त्यांना लंडन येथे जेव्हा प्रथम ब्रिटिशांनी पकडले, तेव्हा तिथल्या कारागृहात त्यांनी आपल्या मनास भक्कम बनविण्यासाठी लिहिलेल्या सुप्रसिद्ध ’मूर्ती दुजी ती’ या कवितेत ते आपल्या स्वतःच्याच कवितेला आवाहन करताना म्हणतात,
भाटची तो लंपट तव देवी!
तोही मी आजि अहह इच्छितसे
रूप देखण्या ते दुजेची तव!
तव ती मूर्ती दुजीची!
मूर्ती मधुर ना: परंतु ती भयंकरा
तव दुसरी घोर मूर्ती दावि ती मला!
 
 
कवितेला ते विनवतात की, “अशा भयंकर संकटाच्या प्रसंगी तू मला तुझे ते मनोहर रूप न दाखवता, दुसरे जे भयंकर रूपच मला दाखव म्हणजे, या संकटातून तरून जाण्याची मला शक्ती मिळेल किंवा ते तुझे दुसरे रूप दाखवून तूच माझी शक्ती बन!”दीर्घकाळ सावरकरांची कविता ’दुर्बोध’ म्हणून मुख्य प्रवाहाच्या धारेतून तिला दूर ठेवले गेले. पण, आपण जेव्हा थोडेसे समजून, खोलात उतरून या सावरकरी कवितेच्या महासागरात उतरू लागतो, तेव्हा आपले आपणच स्वतःला भाग्यवान समजू लागतो. मग आपण विचार करतो की, “अरेरे मी आधीच का नाही समजून घेतले वा आधीच मी हे का नाही वाचले?” पण, तसे पाहिले तर ही कविता इतकी बहुविध आहे की, एकाचवेळी ती हिमालयासारखी उत्तुंग आहे, त्याचवेळी ती महासागरासारखी तितकीच खोलही आहे, एकाचवेळी ती नदीच्या खळाळत्या प्रवाहासारखी मुक्त होऊन बेभान सुसाटते, कधी ती एखाद्या विशाल पण बंदिस्त सरोवराच्या पाण्याप्रमाणे आखीव-रेखीवही भासते, तर अचानक एखाद्या कोसळत्या प्रचंड धबधब्याप्रमाणे आपल्या अंगावर येऊन कोसळू लागते, तर कधी पावसाचे ते मंद-मंद तुषार होऊन आपल्याला चिंब भिजवून ही टाकते. अहाहा! अशी ही या कवितेची किती रूपे अन् किती तर्‍हा!
 
मला तरी असे वाटते की, सावरकरांनी इतर बरेचसे लेखन बाकीचे उद्देश ठेवून केले असले तरी, त्यांनी लिहिलेले काव्य हे त्यांच्या संकटाच्या काळात त्यांनी स्वतःचे आत्मबल वाढविण्यासाठी लिहिलेल्या महान कृती होय. पण, एक लक्षात घेणे गरजेचे आहे की, हेच काव्य जेव्हा आपणही वाचतो तेव्हा आपलीही मानसिक शक्ती, सकारात्मक वृत्ती वाढतेच वाढते! मला वाटते की, या एकाच कारणासाठी ही सावरकरांची कविता वाचली व समजून घेतली पाहिजे. कारण, आज आपल्या आजूबाजूला आपण रोज बघतो की, आपली भारतीय तरुणाई छोटेछोटेसे अपयश आले की, आत्महत्या करून रिकामी होते. बेड्यांमध्ये जखडून, कोठडीत ज्या वीराला बंदिस्त केले, त्यांची कविता झडप घालू पाहणार्‍या मृत्यूला उद्देशून काय म्हणते पाहा,
लोटी हिंस्र सिंहांच्या पंजरी मला,
नम्र दाससम चाटील तो पदांगुला
कल्लोळी ज्वालांच्या फेकीशी जरी,
हटूनी भवती रचिल शीत सुप्रभावली
 
 
किती तो सावरकरांचा दांडगा आत्मविश्वास व किती त्यांचे जीवनावरील निस्सीम प्रेम! नाहीतर सध्याच्या काळात तरुण मुले साधा आईबापाने मोबाईल वा लॅपटॉप घेऊन दिला नाही, म्हणून आत्महत्याही करतात. म्हणूनच वाटते की, अजूनही आपल्या तरुण पिढीपुढे त्यांच्या शिक्षणातून खरे आदर्श ठेवणे, ते त्यांना उलगडून दाखवणे सुरूच झालेले नाही.
 
 
अजून एक सावरकरांच्या कवितेचा विशेष आहे. जेव्हा केव्हा आपण ही कविता वाचून, समजून घ्यायला लागतो ना, तेव्हा तेव्हा आपल्यालाही आत्मबल तर मिळतेच; पण आपले सध्याचे आयुष्य हे किती सोप्पे आहे, हे ही उमजू लागते.वयाच्या केवळ १९व्या वर्षी म्हणजे १९०२ साली सावरकरांनी आपण कधीही कशाचाही गर्व बाळगू नये, हे सांगणारी अतिशय अर्थपूर्ण कविता लिहिली, ’विश्वात आजवरी शाश्वत काय झाले?’ त्यात ते किती सुंदर सांगतात पाहा,
हा उन्नती अवनतीस समुद्र जातो,
भास्वान रवीही उदयास्त अखंड घेतो
उत्कर्ष अपकर्ष समान ठेले,
विश्वात आजवरी शाश्वत काय झाले?
किती सुंदर काव्य व काय ती बुद्धीची झेप!!
 
 
सावरकरांनी इतर काहीही न करता नुसती कविताही केली असती तरी ते तितकेच लोकप्रिय व महत्त्वाचे ठरले असते. पण, नियतीने त्यांना क्रांतिकारक व राजकारणी बनवले. लहानपणीच त्यांनी एख लाख ओळींचे महाकाव्य लिहिण्याचा संकल्प सोडला होता. पण, तो काही पूर्ण झाला नाही, तरी त्यांनी जी काही एकूण कविता रचली ती ही १२ हजार ओळींपेक्षा जास्त भरते, जे काही तुम्हा-आम्हाला यातून मिळाले आहे तेही अद्भुत व अपूर्वच! अगदी लहानपणी जेव्हा सावरकर मला वाचनातून सापडले व थोडेफार समजू लागले, तेव्हा त्यांची ‘अज्ञेयाचे रुद्धद्वार’ नावाची कविता वाचली होती. वाचताना त्यातली गेयता, प्रवाहीपणा खूप खूप आवडला होता. देवा शप्पथ सांगतो, तेव्हा अर्थ काही म्हणजे काही कळला नव्हता. अलीकडे थोडे खोलात उतरून तो समजून घेतला तेव्हा मी अक्षरशः भारावून गेलो. ही कविता म्हणजे आपला जन्मापासून मृत्यूकडे जो प्रवास असतो व या काळात आपण सत्याचा वा परमेश्वराचा शोध घेण्याचा अविरत प्रयत्न करतो, त्याचे अतिशय भावपूर्ण व हृदयस्पर्शी वर्णन आहे. मला ही कविता तेव्हाही आवडली होती व आता अर्थ समजल्यावर तर मी अजून हेलावून गेलो आहे.
 
 
 
सावरकरांची ’ने मजसी ने’ व ’जयोस्तुते’ ही तर अजरामर काव्ये आहेतच. पण, त्याशिवाय ’छत्रपती शिवाजी महाराजांची आरती’, ’प्रभो शिवाजी राजा’ ही छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली गीतेही आता खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेली खंडकाव्ये ‘सप्तर्षी’, ’कमला’, ’ महासागर’, ’गोमंतक’ ही देखील मुळातून वाचलीच पाहिजे. ’कमला’ हे महाकाव्य तर त्यांनी अंदमानात असताना खिळे वापरून भिंतींवर लिहून ते पाठ केले व मग सुटका झाल्यावर ते पुन्हा लिहून प्रकाशित केले, असे करणारा जगातील एकमेव कवी म्हणजे वीर सावरकर!
 
 
स्वतः थोर कवी असलेले अटलबिहारी वाजपेयी त्यांच्या सुप्रसिद्ध भाषणात सांगतात की, ’क्रांती आणि कविता’ बरोबरच राहणे जे अगदी दुर्मीळ असते,’ ते सावरकरांच्या कवितेत होते. तेच सांगतात की, सावरकरांच्याकडे एकाचवेळी ’असीम उंची व तितकीच खोली’ या दोन्ही गोष्टी एकाचवेळी नांदत होत्या.तर अशी ही ‘सावरकरांची कविता’ आपल्याला नुसतीच आपले बोट धरून चालवायला शिकवत नाही, तर रोजच्या जीवनात ‘कसे व का जगावे’ हेही शिकवते व शिकवतच राहते!
 
- हेमंत सांबरे
 
 
Powered By Sangraha 9.0