17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी जाहीर करा

14 महापालिकांना राज्य निवडणूक आयोगाचे पत्र महापालिका निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे महत्त्वपूर्ण आदेश

    11-May-2022
Total Views |
sec
मुंबई (प्रतिनिधी): राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, सोलापूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली या मुदत संपलेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. दि. 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना पत्र दिले आहे.
 
 
 
हे आदेश देताना राज्य निवडणूक आयोगाने म्हटले की, महानगरपालिकेने सादर केलेल्या अहवालाची तपासणी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सुरू असताना दि. 11 मार्च रोजी शासनाने प्रभाग रचनेच्या अनुषंगाने अधिनियमात दुरुस्ती केल्यामुळे त्याबाबत आयोगाने पुढील कार्यवाही थांबविली होती. मात्र, दि. 4 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने, आयोगाने दि. 10 मार्च रोजी ज्या टप्प्यावर निवडणुकांची प्रक्रिया स्थगित केली होती, तेथून पुढे सुरुवात करून निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 
 
त्यामुळे वस्तुस्थिती विचारात घेता प्रभाग रचनेची कार्यवाही तत्काळ पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी/कर्मचार्‍यांना राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दि. 6 मे ते दि. 10 मे या कालावधीत उपस्थित राहून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्धीच्या अनुषंगाने उर्वरित कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्राधिकृत अधिकार्‍यांच्या सर्व शिफारशींचा सखोल अभ्यास करून आयोगाने आता वरील 14 महानगरपालिकांच्या प्रभाग रचना अंतिम केल्या आहेत. सदर अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यक्रम राबविण्यात येऊन आयोगास कळवावे, असे आदेशही संबंधित पालिकांना देण्यात आले आहेत.
 
अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण करण्याची तारीख : 11 मे
अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवण्याची तारीख : 12 मे
अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करून त्याचा नकाशा व सर्व परिशिष्टे महानगरपालिकेच्या सूचनाफलक व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची तारीख : 17 मे