दहशतवादामागील मानसिकता

09 Apr 2022 20:48:21
 
 
gorakhpur
 
 
मंदिरावर नुकताच हल्ला चढवला. या मंदिराचे मुख्य पुजारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. मंदिराच्या सुरक्षा जवानांनी अहमदला पकडले. पण, एका उच्चशिक्षित व्यक्तीने असा दहशतवादी हल्ला चढवल्यामुळे समाजाला धक्का बसला. अर्थात, यामुळे दहशतवाद्यांनी त्यांचे ध्येय गाठण्यात काहीअंशी यश मिळवले आहे. कारण, समाजात आणि प्रसारमाध्यमांत जास्तीत जास्त चर्चा व्हावी, समाजाला मानसिक धक्का बसावा, हेच या दहशतवाद्यांचे उद्दिष्ट. इतकी सुशिक्षित असणारी व्यक्ती अशी दहशतवादी हल्ला कसा करू शकते? काय असते यामागची मानसिकता? स्वत:चा जीव उधळून लावत दुसर्‍याला ठार मारण्याची काळी प्रेरणा येते कुठून? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न...
 
 
दहशतवादामागची काळी प्रेरणा
प्रथमत: हे मान्य करावे लागते की, हे दहशतवादी किंवा आत्मघातकी दहशतवादी हे वेडे नसतात. ते पूर्णपणे सजग असतात आणि जाणीवपूर्वक हिंसा घडवून आणतात. आपला जीव गेला तरीही चालेल, पण समाजातील लोकांना ठार मारलेच पाहिजे, ही काळी प्रेरणा दहशतवादी व्यक्तीच्या मनाचा ताबा हळूहळू घेते. ही एक प्रक्रिया असते, ती एका दिवसात घडत नाही.
दहशतवादामागे प्रामुख्याने दोन कारण आहेत. १) अंतर्गत कारणे- व्यक्तीची विचारसरणी, प्रेरणा, व्यक्तिमत्व, श्रद्धा, आयुष्यातील घटनांचा प्रभाव इ. २) बहिर्गत कारणे - दारिद्य्र, आर्थिक परिस्थिती, दहशतवादी संघटना, राजकारण, समाजाचा प्रभाव इत्यादी.
दहशतवादी संघटना अतिसंवेदनशील व्यक्तीला हेरतात. त्याला धार्मिक मूलतत्त्ववादी कट्टरपंथीय प्रशिक्षण देतात. त्या व्यक्तीचे मरण किंवा दहशतवादी हल्ला हा धर्माच्या रक्षणासाठी किती महत्त्वाचे योगदान आहे, हे त्याच्या मनावर वारंवार बिंबवतात. ते स्वखुशीने आत्मघातासाठी सिद्ध होतात. त्यांचे गांभीर्य सिद्ध करण्यासाठी विविध परीक्षाही ते उत्तीर्ण होतात. कठीण प्रशिक्षण घेतात. प्रसंगी कुटुंबाचा त्याग करतात. महत्त्वाचे म्हणजे, त्या व्यक्तीची अशी तीव्र धारणा बनते की, त्यांचे कृत्य हे पुण्याचे काम आहे. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी ती व्यक्ती निवडली गेली आहे. काफिरांना ठार मारणे आणि धर्माचे रक्षण करणे, ही त्याचीच जबाबदारी असल्याचे त्याला पटवून दिले जाते. इस्लाममध्ये हौतात्म्य पत्करणार्‍या लोकांसाठी मरणोत्तर सुख उपभोगण्याची संकल्पनासुद्धा आहे. लहान किशोरवयीन मुलांनासुद्धा यात गोवले जाते.
यात इस्रायलमध्ये गाजलेले उदाहरण आहे- हुस्साम अब्दो नावाच्या १४ वर्षीय पॅलेस्टिनी मुलाला २००४ मध्ये आठ किलोची स्फोटके बांधून इस्रायलच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी चेकपोस्टवर फतहच्या ‘अल अक्सा मार्टियर ब्रिगेड’ने पाठवून दिले होते. त्याला जीवंत पकडण्यात इस्रायलला यश आले. त्याला स्वर्गात गेल्यावर ७२ हुरी मिळतील, असे आमिष दाखवून आत्मघातकी हल्ला करायला तयार केले गेले होते. अशी प्रेरणा केवळ व्यक्तीच नाही, तर पूर्ण कुटुंबातील सदस्यांनासुद्धा दहशत माजवण्यासाठी प्रवृत्त करू शकते.
इंडोनेशियामध्ये तर दिता सुप्रीयांतो याची पत्नी, चार मुले - १८ आणि १६ वयाची मुले आणि १२ आणि नऊ वर्षांच्या मुली यांनी एकाच वेळी तीन वेगवेगळ्या चर्चवर दि. १३-१४ मे, २०१८ ला आत्मघातकी हल्ला घडवून आणला होता.
उच्च शिक्षित दहशतवादी आणि हल्ले
संपूर्ण जगात जे मोठे दहशतवादी हल्ले झाले, त्यात सामील असणारे बरेच दहशतवादी सुशिक्षित असल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेचे उदाहरण घेऊ.
अमेरिकेच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर १९९३ मध्ये ट्रकमध्ये स्फोटके भरून जो हल्ला केला गेला होता, त्याचे रामजी युसुफ याने त्याचे नियोजन केले होते. तो इंग्लंडमध्ये शिकलेला ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअर’ होता. तसेच, इंग्रजीसाठी ऑक्सफर्ड महाविद्यालयामध्येसुद्धा शिकला होता. दुसरा इयाद इस्मोली हा विचिता स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरिका येथे शिकलेला इंजिनिअर होता. त्याने स्फोटकांनी भरलेला ट्रक धडकवला होता.
अमेरिकेवरील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर दि. ११ सप्टेंबर, २००१च्या हल्ल्यातील काही दहशतवादी
 
१) मुहम्मद अत्ता : कैरो युनिव्हर्सिटीमध्ये आर्किटेक्चर आणि जर्मनीच्या हॅम्बुर्ग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीशी संबंधित.
२) मारवा अल-शेही : जर्मनीच्या युनिव्हर्सिटी ऑफ बॉनमध्ये जर्मन शिकला. तसेच टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ हॅम्बुर्गमध्ये शिक्षण
३) झियाद जराह : एअरो स्पेस इंजिनिअरिंग, हॅम्बुर्गला युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्स येथे शिक्षण अशी अनेक उदाहरण आहे.
या उच्चशिक्षित व्यक्तींचा उपयोग आपल्या मिशनसाठी ‘अल कायदा’ने शिताफीने केला. या उच्चशिक्षित दहशतवाद्यांना स्वत:चा जीव देणे आणि इतरांचा जीव घेणे यात काहीही गैर वाटले नाही. कारण, त्याला धर्मरक्षण आणि हौतात्म्य यांचे तत्त्वज्ञान जोडले गेले. वास्तविक औपचारिक शिक्षणामुळे व्यक्तीच्या ‘स्व’ विषयीच्या जाणीवा रुंदावतात. आपल्या भूमिकेविषयी, जीवनाच्या ध्येयाविषयी व्यक्ती जागरुक होते. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आपण काही तरी केले पाहिजे, अशी भावना त्यात असते. आपला धर्म संकटात आहे, असे वाटू लागताच त्याच्या बचावासाठी उच्चशिक्षित व्यक्ती सक्रिय झाल्याचे आढळते. त्यांचा गैरवापर दहशतवादी संघटना करून घेतात. औपचारिक शिक्षणापेक्षा घरात, समाजात मिळणारे अनौपचारिक शिक्षण जास्त प्रभावी ठरते, असे दिसून येते.
मानसशास्त्रीय कारणे
दहशतवादी व्यक्ती आपल्या मृत्यूसाठी तयार होते. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मोठ्या प्रभावीपणे झालेले ‘ब्रेन वॉश’ हे यामागे महत्त्वाचे कारण आहे. दहशतवादी तयार होताना त्या व्यक्तीची स्वत: तयारी असते म्हणूनच त्याचा फायदा दहशतवादी संघटन घेतात. प्रत्यक्ष हल्ला करण्याआधी या व्यक्ती स्वत:च्या कोशात शिरतात. सामाजिक संबंध कमी करतात, असे बदल त्यांच्यात दिसू शकतात.
१) समाजात दहशत माजवून स्वत:कडे लक्ष वेधणे. २) आपला धर्म आपल्या जिवापेक्षा महत्त्वाचा आहे, हे बिंबवणे. ३) दहशतवादी संघटनेला समाजात प्रसिद्धी मिळवून देणे. ४) व्यक्तीला स्वत: धर्मासाठी तथाकथित बलिदान देऊन प्रसिद्धी मिळवायची असते. ५) नव्या पिढीपुढे तथाकथित धर्म रक्षणाचा आदर्श ठेवणे. ६) कितीही शिक्षण घेतले तरीही ‘धर्मरक्षण’ हेच अंतिम ध्येय आहे, हे बिंबवणे. ७) वैयक्तिक अपयश लपवण्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी. ८) प्रियजनांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी. ९) आपली धर्मनिष्ठा सिद्ध करण्यासाठी. ही कारणे दहशतवादी हल्ल्यांच्या मागे असल्याचे दिसून आले आहे. पॅलेस्टाईनमध्ये तसेच चेचेन दहशतवाद्यांच्या मागेही अशी कारणे आहेत. चेचन्यातील ‘ब्लॅकविडो’ म्हणजेच ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या स्त्रिया, नातेवाईक इत्यादी मागे मानसिक कारणे मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत. ‘अल कायदा’, ‘बोको हराम’, ‘इसिस’, ‘अल शबाब’ अशा किती तरी संघटनांनी आपली कट्टर विचारधारा संवेदनशील तरुण-तरुणींवर बिंबवली आहे. स्त्रिया या प्रामुख्याने भावनेच्या आहारी जाऊन दहशतवादाकडे वळल्याची अनेक उदाहरणे आहेत.
गोरखनाथ मंदिरावर हल्ला
केसस्टडी
गोरखनाथ मंदिरावरचाहल्ला हा ‘लोन वूल्फ अटॅक’ आहे. म्हणजे यात एकटी व्यक्ती स्वत:हून हल्ला चढवते. यात जो तपास झाला, त्यात असे आढळले की, ‘इसिस’ला मिळालेल्या एका मुलीने मुर्तझाला एक मेल केला होता. तेव्हापासून मुर्तझा या ‘हनी ट्रॅप’मध्येफसत गेला. त्याने तिला ४० हजार रुपये पाठवले होते. तिचा तपास चालू आहे. पुढे २०१९ साली त्याचा निकाह एका मुलीशी झाला आणि तीनच महिन्यांत त्याने मोबाईलवर तिला तलाक दिला. जानेवारी २०२० पासून तो ‘हायटेक कम्प्युटर कोडिंग’ शिकला. सीरियाच्या अनेक लोकांच्या संपर्कात तो सोशल मीडिया, इंटरनेटच्या माध्यमातून आला. त्याने आठ लाख रुपये नेपाळी खात्यांच्या माध्यमातून ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया’च्या बँक खात्यात हस्तांतरीत केले आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली आहे.
 
 
इमाम अन्वर अल हालाकी याला तो आपला गुरू मानतो. इस्लामला संपूर्ण जगात त्रास सोसावा लागत आहे, अशी त्याची धारणा झाली. त्यासाठी प्रतिशोध घेणे ही त्याची मानसिकता झाली. काफिरांना ठार करणे हाच अल्लाच्या मार्गावर चालण्याचा मार्ग आहे, अशी त्याची खात्री झाली. मुंबई, जामनगर, नेपाळ आणि कोईम्बतूर याा ठिकाणी जाऊन त्याने समविचारी लोकांच्या भेटी घेतल्याचेही सुरक्षा यंत्रणांच्या तपासात आढळले.
 
 
मुर्तझा हा दहशतवादी संघटनांच्या संकेतस्थळावर सातत्याने पाहत होता.त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये सुद्धा कट्टर, धर्मांधता भडकवणारे व्हिडिओ सापडलेले आहेत. त्यात एका ‘इसिस’च्या व्हिडिओमध्ये अगदी तसाच सुरा आहे, जसा त्याने मंदिरावर हल्ला चढवताना स्वत: वापरला आहे. ‘टेलिग्राम’वर दि. २५ मार्चला ‘आयएस -इंडिया’ याद्वारे एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. ‘इसिस’ने त्याला ‘लोन वूल्फ’ हल्ल्यासाठी वापरले, असे दिसून येते. ‘इसिस’चे अतिशय भडकाऊ व्हिडिओ, तसेच हत्यार इत्यादी त्यात दाखवलेले आहे. ‘इसिस’ला त्याने मोठी रक्कम पाठवली ती कुणाच्या सांगण्यावरून, अकाऊंट नंबर कुणी दिला याचा शोध चालू आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात या रकमेची देवघेव झाली, तेव्हा ‘एटीएस’ची टीम मुर्तझाच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी त्याने मंदिरावर हल्ला चढवला. अभ्यासकांच्या मते, ‘९/११’च्या हल्ल्यानंतर इंटरनेट हे विषारी विचारधारा पसरवण्याचे आणि भरती करण्याचे महत्त्वाचे साधन आहे.
मुळात भारतात सगळ्या धर्मांना स्वातंत्र्य आहे. सगळ्यांना समान अधिकार आहेत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान आले. पाकिस्तानात इमरान खान यांची सत्ता संपुष्टात आली. श्रीलंकेत आणीबाणी लागू झाली होती. पण, तरीही भारतातील खंबीर लोकशाहीमुळे राजकीय-सामाजिक स्थैर्य टिकून आहे. याचा सोयीस्करपणे विसर काहींना पडलेला आहे. मुर्तझासारख्या सुशिक्षित व्यक्तीला वापरले जाते आहे, यातूनच ‘इसिस’ची पाळेमुळे किती खोलवर रुजत चालली आहेत, याचा अंदाज येतो.
‘इसिस’चे मूलतत्त्ववादी शिक्षण
‘इसिस’ने ताबा मिळवला त्या ठिकाणी आपल्याला अनुसरून पुढे पिढी तयार होईल, यासाठी प्रयत्न केल्याचे आढळते. हळूहळू भारतातही आपले समर्थक निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. विशेषतः केरळ -महाराष्ट्रातून ‘इसिस’ला जाऊन मिळणार्‍या अनेक लोकांच्या अनेक केसेस आहेत. इस्लामिक राज्याच्या निर्मितीचे चित्र रंगवून तरुण पिढीला नासवणे चालू आहे. त्यासाठी त्यांचे अनेक ‘मोड्यूल’ उघडकीला आले आहेत. ‘इसिस’ने मोठ्या प्रमाणात स्थानिक भाषा वापरून संकेतस्थळे वाढवली. त्याद्वारे ऑनलाईन भरती करण्यावर भर दिला आहे. आधुनिक जिहाद हा ‘ई-जिहाद’ आहे, असे अनेक अभ्यासक मानतात. चॅटिंग करणे, फाईल शेअर करणे, छुपे गट, वैचारिक देवाणघेवाण, दहशतवादी हल्ल्याचे इंटरनेटवर नियोजन, संशोधन, व्हिडिओ, भाषणे, सोशल मीडिया इत्यादीद्वारे अनेक दहशतवादी संघटना आपल्या जाळ्यात तरुणांना ओढत आहेत.
‘इसिस’ने २०१४ मध्ये सीरियामधील अल बुकामल या भागावर ताबा मिळवला होता. तेथील लहान मुलांना इस्लामिक मूलतत्त्ववादाचे धडे मिळू लागले. मुलांची पुस्तके बदलली. पुस्तकात शस्त्रास्त्रांचे चित्र आणि काळे झेंडे दिसू लागले. बेरजा-वाजाबाक्या शिकवताना पेन, पक्षी, फळे याऐवजी बंदुका, रणगाडे, चाकू ही चित्रे दिसू लागली. या शिक्षणामुळे ‘इसिस’ने आपली मूलततत्ववादी विचारसरणी लहानपणापासून मुलांवर बिंबवली. जेव्हा या भागात ‘युनिसेफ’चे कार्य सुरु झाले, तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी उघड होत गेल्या.
आधुनिक काळात आत्मघातकी दहशतवाद हे फार मोठे आव्हान उभे आहे. यात व्यक्ती स्वतःसह दुसर्‍याचीही हत्या घडवून आणते. यामागे वैयक्तिक, धार्मिक, सामाजिक अशी विविध कारणे आहेत. विचारधारा हा घटकही महत्त्वाचा आहे. हे ‘मानसिक युद्ध’ आहे. त्यामुळे ‘टार्गेट’ अथवा ‘ज्या व्यक्तींना लक्ष्य केले जाते, त्यांच्यासह, समाजातील अन्य लोकांच्या मनातही मोठ्या प्रमाणात भीती उत्पन्न केली जाते. दहशतवादामागची प्रेरणा, त्यामागचा हेतू, त्यामागचे धोरण या सर्व गोष्टी इतक्या टोकाच्या असतात की, दहशतवादी आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घालतो.
ती व्यक्ती स्वतः मरण पत्करण्यासाठी तयार होते. मात्र ‘आत्महत्या’ हा शब्द वापरला जातो असे नाही. धर्माच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करणे ही क्रिया ‘धार्मिक आज्ञेचे पालन करणे’ असे कारण देत समर्थनीय ठरवली जाते. ‘इसिस’सारख्या दहशतवादी संघटनांचा अभ्यास करताना अनेक धक्कादायक धोरणे आढळून येतात. संपूर्ण जागाला इस्लामी राज्यात परिवर्तीत करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यासाठी त्यांना समविचारी मनुष्यबळ हवे आहे. भारतातसुद्धा ते याच शोधात आहेत. देशातील तरुणांनी जागरूक राहाणे अत्यंत गरजेचे आहे.
‘हौतात्म्याचे मार्केटिंग’ करून आपले वैचारिक ‘प्रोडक्ट’ खपवण्याची ‘स्ट्रेटेजी’ ‘इसिस’ची आहे.
रुपाली कुळकर्णी-भुसारी
९९२२४२७५९६
 
Powered By Sangraha 9.0